Home > मॅक्स ब्लॉग्ज > सोपी उत्तरे देणारे जादुगार...

सोपी उत्तरे देणारे जादुगार...

सध्या नदीकाठी मोठ्या भिंतीचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. मात्र, अशी सोपी उत्तर कोण शोधतं. आणि अशा सोप्या उत्तराने खरंच जनतेचं भलं होत का? एन डी पाटील यांनी सांगितलेला एक किस्सा नक्की वाचा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या शब्दात…

सोपी उत्तरे देणारे जादुगार...
X

पूर येऊ नयेत. म्हणून नदीकाठी मोठ्या भिंती बांधण्याच्या कल्पनेची सोशल मीडियात आक्षेप आणि काहीशी खिल्लीही उडवली जात आहे. कोणत्याही कठीण प्रश्नावर सोपी उत्तरे शोधण्याकडे अनेकांचा कल असतो व फार विचार न करणाऱ्या समूहवर्गाला ती उत्तरे खूप भावतात. त्यावर राजकारणही उभे राहते.

ज्येष्ठ पुरोगामी नेते एन डी पाटील यांना एकदा भेटायला गेलो. तेव्हा अशी सोपी उत्तरे सर्वांनाच आवडतात. कारण दीर्घकालीन काम करण्याची आपली तयारी नसते. हे सांगताना त्यांनी गंमत म्हणून एक गोष्ट सांगितली…

ते म्हणाले "एकदा एक माणूस पोलीस आयुक्तांकडे गेला व म्हणाला मला संरक्षणाची गरज आहे. कारण मी जे संशोधन केले आहे. ते संशोधन प्रत्यक्षात येऊ नये. म्हणून रेल्वे कंपन्या माझा खून करण्याची शक्यता आहे. तेव्हा पोलीस आयुक्तांनी त्याला विचारले की संशोधन कोणते आहे? तो सांगायला तयारच होईना. शेवटी त्याने सर्वांना बाहेर जायला सांगितले व तो आयुक्तांना म्हणाला… मी अशी रेल्वे शोधली आहे की, ज्या रेल्वेला कोळसा किंवा वीज काहीच लागत नाही. ती आपोआप चालते''. ते म्हटल्यानंतर पोलीस आयुक्त ही थक्क झाले "म्हणजे कशी ?"

तो माणूस म्हणाला की रेल्वे रुळावर उभी करायची. एक अत्यंत मोठा लोहचुंबक तिथून अर्ध्या किलोमीटरवर रुळावर ठेवायचा व रेल्वे समोर मोठा लाकूड ठोकळा ठेवायचा. रेल्वे सुरू करायची असेल तेव्हा ती तर लाकडी ठोकळा बाजूला काढला की लोहचुंबक रेल्वेला आपल्याकडे ओढून घेईल. पोलीस आयुक्तांनी विचारले इथंपर्यंत समजले पण रेल्वे पुढे कसे जाईल? तो म्हणाला

"रेल्वे जोरात येऊन त्या लोहचुंबकला इतक्या जोरात धडक मारेल की पुन्हा लोहचुंबक पुढील अर्धा किलोमीटर वर ढकलले जाईल व परत रेल्वेला आपल्याकडे खेचून घेईल व रेल्वे परत धडक मारून पुढे जाईल. त्यामुळे रेल्वेला कोळसा किंवा विजेची अजिबात गरज उरणार नाही...!!!

एन डी पाटील म्हणाले की, अशा सोप्या उत्तरानेच समाज भुलत असतो. व मिश्कीलपणे म्हणाले "आपल्या सर्वच क्षेत्रात अशी सोपी उत्तरे देणारे जादुगार असतात आणि आपल्या मनालाही ताण नको असतो,अशीच सोपी उत्तरे हवी असतात..."

(हेरंबकुलकर्णी)

Updated : 28 July 2021 5:20 AM GMT
Next Story
Share it
Top