Home > News Update > #आठवडीबाजार आणि समाज जीवन ....

#आठवडीबाजार आणि समाज जीवन ....

#आठवडीबाजार आणि समाज जीवन ....
X

पाटा वरवंटा, उखळ जाते घडविणारा पाथरवट समाज...

स्वयंपाक घरात मिक्सर आल्यामुळे घरातील उखळ, पाटा-वरवंटा, खलबत्ता या वस्तूंचा वापर कमी झाला आणि हळू हळू या सर्व वस्तू अडगळीत गेल्या! शिवाय अनेक वर्ष टिकणाऱ्या असल्यामुळे एकदा विकत घेतल्या की फुटेपर्यंत पुन्हा नवीन घ्यायची गरजच पडत नाही ! आजही अनेकांच्या घरातील जाते, उखळ, पाटा वरवंटा खलबत्ता हा ३० वर्ष किंवा अगदी त्या पूर्वीचा देखील असू शकेल. यामुळे अशा वस्तूंची मागणी कमी असते ! पण दगडांपासून घडवलेल्या या वस्तूंनी भारतीयाची संस्कृती अनेक अर्थानी घडवली आहे आणि संपन्नही केली आहे!

निर्जीव दगडापासून जाते, उखळ, पाटा, वरवंटा, खलबत्ता आदी वस्तू घडवून मानवाचे जीवन सजीव करून आपला चरितार्थ कसाबसा चालवणारा समाज म्हणजे पाथ्रुड वा पाथरवट म्हणजेच वडार समाज ! उस्मानाबादच्या आठवडी बाजारात या वस्तू विक्रीला नसतात.कारण त्या वजनदार असल्यामुळे त्यांची बाजारात ने आण करणे अवघड ; म्हणून आठवडी बाजाराच्या लागताच असणा-या पाथ्रुड गल्लीत आणि पाथ्रुड चौकात याची दुकाने आहेत. या वस्तू तयार नसतात, मागणी प्रमाणे घडवून त्या विकल्या जातात.

जिजामाता बागेच्या पूर्वेस, जुन्या भारत थिएटर समोर हे लोक अनेक लहान मोठ्या दगडांना आपल्या भोवती घेवून कधी ग्राहकाची वाट पाहत तर कधी छन्नी आणि हातोड्याने दगडांना आकार देत बसलेले दिसतात ! अनेक दिवसांपासून बाजाराच्या या भागात जाऊन दगडांना संजीवनी देणा-या या कलाकारांची भेट घ्यावी असा विचार मनात होता; म्हणून आज आठवडी बाजारात गेल्यावर आवर्जून तीथे गेलो. पिराजी यमपुरे आणि अंबऋषी यमपुरे यांच्यासह तीन चार लोकांशी संवाद साधला.

उस्मानाबादच्या आठवडी बाजाराच्या परिसरातच या वडार समाजाची जवळपास ७०० ते ८०० घरे आहेत. त्यापैकी बहुतांश लोक घरे, इमारती, रस्ते आदीच्या बांधकामात मजुरी करतात आणि कांही मोजकेच म्हणजे बावीस लोक या वस्तू बनविण्याचे काम करतात. वडार आणि पाथरूड एकाच असले तरीही बांधकामाचा दगड घडवणारे आणि खाणी दगड काढून फोडणारे वडार तर दगडापासून अशा वस्तू घडवणारे पाथ्रुड म्हणून ओळखले जातात. याशिवाय या समाजाची देशाच्या विविध भागात ओडू, बेलदार असेही नांवे आहेत. यांच्यात गाडी वडार,माती वडार, घट्टी, गुजराती, सिंधी, परदेशी असेही भेद आहेत.

उस्मानाबादच्या पाथ्रुड समाजाकडे असणारा दगड हा उस्मानाबादच्या जवळ असणाऱ्या पापनाश परीसरातील खाणीतून येतो. खाणीचा परवाना असणा-यासोंबत वर्षभरासाठी करार करून हा दगड मिळवला जातो.

"सायब दगड कितीबी मोठा अन् चांगला असला तर जोस्तर त्यो घडवत नाही तवर त्याला कायबी मोल नाही" सहज बोलण्यातून पिराजींनी खूप मोठे जीवनविषयक तत्व मांडले होते! खाणीतून दगड काढतानाच ते विशिष्ट आकाराचे काढले जातात ; नंतर ते घडविण्यासाठी आल्यावर कोणत्या दगडापासून कोणती वस्तू घडवता यईल याचा अंदाज घेवून दगड निवडले जातात. बेसाल्ट हा अग्निजन्य खडक, दगड वापरला जात असला तरीही दगडाची कठीणता पाहून कोणता दगड योग्य आणि कोणता दगड अयोग्य ठरवले जाते. जो दगड मऊ म्हणजे घडवायला सोपा तो कमजोर तर कडक म्हणजे घडवायला कठीण असणाऱ्या दगडापासून केलेल्या वस्तू अधिक काळ टिकतात अशी माहिती पिराजी यांनी दिली.

पिराजी, अंबऋषी आणि त्यांचे नातेवाईक इथे दगडांना छन्नी आणि हातोड्याने आकार देऊन उखळ, पाटा वरवंटा, खलबत्ता या गृहोपयोगी वस्तूंसोबतच वैष्णवांच्या समाधीचा दोन पावलांचा तर महादेवाची पिंड कोरलेला शैवांच्या समाधीचा दगड, तुळशीसोबच ठेवायचा महादेव, मंदिराच्या प्रवेश दारातील कासव, याशिवाय विठल रखुमाई, खंडोबा, गणपती ,मारुती यांच्या मूर्तीही घडवतात. परंतु हल्ली दगडी मूर्ती पेक्षा सर्व देवाच्या संगमरवरी, गंडकी नदीतील पाषाण आणि ग्रेनाईट यापासून मूर्ती आणि तेही राजस्थानी कारागिराकडून बनवल्या जात असल्यामुळे उस्मानाबादच्या या कलाकारांकडे येणारे ग्राहक केवळ उखळ, पाटा वरवंटा, खलबत्ता, समाधी दगड, महादेव आणि कासव याचीच मागणी करतात!

दगड घडवणे खूप कष्टाचे आणि वेळखाऊ काम असते. एक जाते घडवायला ८ ते १० दिवस लागतात. उखळ आणि खलबत्ता एकदोन दिवसात होतो. दगड घडवताना त्याचे चार टप्पे असतात त्यांना घडी असे म्हणतात आणि प्रत्येक घडीची वेगळी छिन्नी असते. एका विशिष्ट हातोडीने दगड हवा तसा फोडला जातो.त्यानंतर 'पहिली घडी' म्हणजे वस्तूच्या आकारानुसार त्या दगडाचे पहिले ओबडधोबड कोरीवकाम! त्यानंतर दुसरी घडी ; ज्यात वस्तू आकार घेते. तिसरी घडी म्हणजे वस्तू ओबडधोबड स्वरुपात तयार होते आणि अंतिम म्हणजे चौथी घडी म्हणजे वस्तूला सुबक आणि आकर्षक केले जाते. जेंव्हा चौथी घडी चालू असते , तेंव्हा वस्तूच्या कोरीवकामाचे चार प्रकार असून त्यांना 'माठ' म्हणतात. त्यांची खूपच नावे सुचक आहेत! पहिला हरभरा माठ, त्यानंतर जवारी माठ , त्यानंतर सजगुरी माठ आणि चौथा माटेव माठ ! प्रत्येक माठाची छन्नी वेगळी असते. 'हरभरा माठ' म्हणजे छन्नीने एका घावात दगडाला पडलेली खोंक ही हरभऱ्याच्या आकाराची असते! 'जवारीच्या माठात ती ज्वारी एवढी आणि 'सजगुरी माठात' ती बाजरी एवढी असते. म्हणजे वस्तू अधिक अधिक सुबक केली जाते. माटेव म्हणजे ती वस्तू अगदी गुळगुळीत अशी केली जाते. देवदेवतांच्या मूर्ती अशा 'माटेव माठात' बनवल्या जातात. एखादी वस्तू तुम्हाला कोणत्या माठात हवी आहे त्यावर तिची किंमत ठरते. कारण सजगुरी आणि माटेव माठास खूप श्रम लागतात, साहजिकच या मठातील वस्तूंची किंमत जास्त असते! हरभरा मठातील उखळ स्वस्त तर सजगुरी माठात महाग मिळते. एका जात्याची किंमत रु १००० पासून २००० पर्यंत, उखळाची रू. १००० पर्यंत तर खलबत्ता रु. ४०० तर समाधी दगडाला रू. ५०० ते १००० आणि मूर्तीची रू.१०००० ते २०००० एवढी किंमत असते अशी माहिती अंबऋषी यांनी दिली.

"सायब आजकाल प्रत्येकाच्या घरात मिक्सर हाय,म्हणून आमच्या वस्तूला तेवढी मागणी नाय. पण एक सांगू वरवंट्यावर वाटलेला मसाला ,उखळातली चटणी आन् दगडी खलबत्त्यातला ठेचा याचे लै लोक दिवाने हायत बघा " पिराजीचं हे वाक्य एकदम सत्य आहे कारण आजही माझ्या घरी शेंगदाण्याची चटणी उखळातच केली जाते आणि कांद्याची चटणी खलबत्त्यात ! कित्येकवेळा मी सुद्धा चटणी अशी चटणी स्वत: केलेली आहे!

आज या वस्तू वापरून खाद्यपदार्थ बनवताना श्रम पडतात हे खरे पण एकेकाळी स्त्रियांना घरात किती कष्ट करावे लागत असत याची या वस्तुंच्या वापरातून येते. स्त्रीपुरूष समानता म्हणणा-यांनी या वास्तवाची जाणीव करून द्यायला ही साधने उपयुक्त आहेत हे मान्यच करावे लागेल! आजच्या शहरातील flat संस्कृतीत खलबत्ता, उखळ यांचा वापर करता येणे अशक्यच आहे. कारण कोणी खलबत्त्यात कांडायला सुरुवात केली की पूर्ण आपार्टमेंटमधील जनता जीव मुठीत धरून नक्कीच तुमच्या दारात येईल !

जाते ,वरवंटा,उखळ या सर्व वस्तूंनी साहित्य,कला काव्य संस्कृती आणि धार्मिक क्षेत्रात देखील आपले एक वेगळे भावविश्व निर्माण केले आहे. या प्रत्येक वस्तूला आपल्या संस्कृतीत पावित्र्य दिले गेले असून लोक श्रद्धेने त्यांची पूजा देखील करतात. यावर खरे तर मी स्वतंत्रपणे लिहीणार आहे, पण वस्तूंनी जे सांस्कृतीक भावविश्व घडवले आहे, ते शब्दांत पकडणे कठीण आहे. या सर्व वस्तूंनी आपली भाषाही समृद्ध केली आहे ! वरवंटा फिरवणे, उखळ पांढरे होणे, आदी म्हणींनी भाषेतील संवादाला नेमका अर्थ दिला आहे. वरवंटा अडवा धरून रगडून खाद्य पदार्थ बारीक केले तर बत्ता हा कुटण्यासाठी वापरतात. उखळासाठी लोखंडी पहार वा लाकडी मुसळ असते !

आजच्या पिढीला माहीत नसेल पण या दगडी वस्तुंपैकी वरवंट्याची आणि आपल्या प्रत्येकाची साथ जन्माच्या बाराव्या दिवसापासूनच झालेली असते हे विशेष! बारशाच्या वेळी आपण केवळ बारा दिवसाचे असताना आपल्यासोबत बळीराणा दुसरं तिसरं कांही नसतं तर तो सुरके घालून सजलेला वरवंटाच असतो! बलराम दगडाप्रमाणे कठीण होता म्हणे तर कृष्ण मेणासारखा मऊ! आपलं बाळ कृष्ण आणि बळीराम दोघांसारखं जीवनात कठोर आणि मृदू रहावं हीच भावना प्रत्येक मातेची असणार!

पाथ्रुडाच्या घामातून कष्टातून बनलेल्या वरवंट्याने, खलबत्त्याने,उखळाने वा जात्याने अनादी काळापासून आजच्या आधुनिक काळापर्यंत जगातील समस्त मानवजातीला विविध प्रकारे घास भरवून विविधांगी पोषण केले आहे.त्याच पाथरवटांच्या हातांनी कित्येक देवालयातील लाखो लोक ज्यासमोर नतमस्तक होतात असे देवही घडवले! ज्यांना पुढे दुधातुपाचे अभिषेकही होत राहिले ! पाथरवटांच्या श्रमाने बनविलेले दगड ज्यांच्या समाध्यांवर सजून त्यांना मोक्षही मिळाला असेल कदाचित ! परंतु त्याच पाथरवटांच्या अवती भोवती मात्र, आजही दगड धोंडेच आहेत.

Updated : 22 July 2019 7:32 PM IST
Next Story
Share it
Top