Home > मॅक्स ब्लॉग्ज > उद्धवसाहेब फक्त इतकंच करा .... अँड. विश्वास कश्यप

उद्धवसाहेब फक्त इतकंच करा .... अँड. विश्वास कश्यप

उद्धवसाहेब फक्त इतकंच करा .... अँड. विश्वास कश्यप
X

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे अस्तित्व संपवलं.. पक्ष गेला चिन्ह गेलं.. आता उद्धव ठाकरेंनी नेमकं काय करायला हवं असं सांगणारं अँड. विश्वास कश्यप यांचं उद्धव ठाकरेंसाठी कळकळीने लिहिलेलं पत्र...

आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब,
माजी मुख्यमंत्री ,
महाराष्ट्र राज्य .

महोदय ,
प्रथमतः आपणास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा .

आपण सध्या प्रचंड वाईट मानसिक अवस्थेतून जात आहात याची आम्हाला कल्पना आहे . आपली प्रकृती सुद्धा ठीक नाही .

मोघलांच्या नादी लागलेले ....

दिल्लीतील मोघलांच्या नादी लागून आपल्यातल्या काही लोकांनी आपल्याला दगा दिला हे सर्वश्रुत आहे . घाबरू नका साहेब यातला एकही पुढच्या निवडणुकीत निवडून येणार नाही ही खात्रीच नव्हे तर विश्वास आहे आम्हाला .

पुणेरी नव्हे नागपुरी पेशवे ...

साहेब , आम्ही शिवसैनिक नाही . परंतु उद्धव ठाकरे नावाच्या पुरोगामी विचारांच्या व्यक्तीवर आम्ही प्रेम करायला लागलोय हे तुम्हाला आम्ही मागेही सांगितले होते . आपल्या तोंडी प्रबोधनकारांची भाषा येऊ लागली त्याचवेळेस आरएसएसच्या पेशव्यांनी आपल्याला दगा देण्याचा प्लॅन सुरू केला . पूर्वी पेशवे पुण्यात राहायचे आता ते नागपूर मुक्कामी राहतात .

लोकशाही ? छे ही तर हुकूमशाही ...

साहेब आपल्याला माहीत आहे की , आरएसएस संपूर्ण भारतात पसरले आहे . प्रशासकीय विभाग , शिक्षण , उद्योग , सांस्कृतिक क्षेत्र , दृक्श्राव्य माध्यमे , न्यायालये , पोलीस अशा कित्येक अगणित क्षेत्रात या लोकांनी घुसखोरी केली आहे . त्यांची माणसं त्यांनी प्रत्येक जागेत जाणीवपूर्वक पेरली आहेत . आणि हे काम ते इतके बिनबोभाट करतात की सर्वसामान्य बहुजनांना ते समजत सुद्धा नाही . सर्वोच्च न्यायालय , निवडणूक आयोग , आरबीआय अशा सगळ्या संविधानिक संस्था त्यांनी नासवल्या आहेत . संविधान फक्त दाखवायला आणि संविधान दिनी साजरा करायला ठेवले आहे . अघोषित कसली ही तर उघड उघड हुकूमशाही चालली आहे .

तुम्ही घाबरू नका ...

आजूबाजूला इतकी आणीबाणीची परिस्थिती असताना सुद्धा साहेब तुम्ही घाबरू नका . सर्वसामान्य शिवसैनिक आणि आमच्यासारखी मराठी माणसं जोपर्यंत तुमच्या सोबत आहेत तोपर्यंत तुमचे कोणीही वाकडे करू शकत नाही . साहेब हे अमित शहा फक्त मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून सगळी आखणी करीत आहेत . आणि त्या आखणीचे नियोजन करण्याचं काम देवेंद्रभाई करीत आहेत . कुठल्याही परिस्थितीत त्यांना मुंबई पाहिजे आणि तुम्हाला सांगतो कोणत्याही परिस्थितीत आम्ही मराठी माणसं त्यांना ती मिळू देणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा .

परप्रांतीय आपले नाहीत ....

साहेब मुंबईतील गुजराती मारवाडी ही मोदीलाच मत देणार . त्यांचा धंदा कितीही गाळात जाऊ द्या ते मोदीलाच मत देणार . त्यामुळे त्यांच्या भरवशावर तर बिलकुलच राहू नका . परप्रांतीय भैये हे सुद्धा आजकाल योगी योगी आणि मोदी मोदी करतात त्यामुळे ते सुद्धा बेभरवशाचे आहेत . मुंबईत प्रत्येक भैयाची एस आर ए प्लॅनमध्ये मिळालेले पाच सहा फ्लॅट आणि पुन्हा नवीन तयार झालेल्या झोपडपट्टीत दोन दोन झोपड्या आहेत . याला आपल्या पक्षाचेच जुने धोरण कारणीभूत आहे . परंतु जुन्या उखाळ्या पाखाळ्या काढून काहीही उपयोग नाही . कारण रात्र "भाजपा" ची आहे .

मराठी माणूस ....

मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झालेला आहे . तरीसुद्धा तुम्हाला मराठी माणसांवरच अवलंबून रहावे लागणार आहे . कारण तीच तुमची खरी माणसं आणि शक्ती आहे . यावेळी भाजपामधील मराठी माणसं सुद्धा तुम्हालाच साथ देणार आहेत . काही गुजराती मराठी पेशवे सोडले तर .

सध्या फक्त मुंबई आणि मुंबई ....

साहेब , सध्या तुम्ही फक्त मुंबईवरच लक्ष द्या . विधानसभेच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्र पाहू . नाहीतरी आदित्य महाराष्ट्र पाहतोच आहे . कुठल्याही परिस्थितीत मोदी शहा यांना देवेंद्रभाईच्या हस्ते शिवसेना संपवायची आहे . त्यांनी तसा अफजलखानी विडाच उचललेला आहे . परंतु प्रतापगडाचा इतिहास त्यांना माहित नाही .

महाविकास आघाडीबाबत तुम्हीच पुढाकार घ्या ...

साहेब , तुम्ही जाणीवपूर्वक महाविकास आघाडी सांभाळा . थोडासा कमीपणा घ्यावा लागला तरी चालेल . काँग्रेस स्वबळावर लढू असे म्हणून फुकटचे आव्हान देतात आणि भाजपाला मदत करतात . ते स्वतःच बेडूक फुगवतात आणि स्वतःच फोडतात सुद्धा . त्यांच्या पक्षात अतिशय छोटा आणि मर्यादित विचार करणारी काही गल्लीतील मंडळी आहेत . त्यांना बीजेपीची ताकद माहिती नाही . मुंबईत राष्ट्रवादीची ताकद नगण्य आहे आणि ते त्यांना माहित आहे . त्यामुळे ते जास्त आडेवेढे घेणार नाहीत .

वंचितमुळे तुफान फायदा होणार ...

साहेब , वंचितचा मोठा फायदा तुम्हाला आणि त्यांना होणार आहे . त्यामुळे प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजेत . दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे संयुक्त मेळावे झाले पाहिजेत . एकदा का त्यांचे मनोमिलन झाले की मग पहा बीजेपीचे २० नगरसेवक सुद्धा निवडून येणार नाहीत .

नवीन पक्ष आणि पक्षचिन्ह तयार करा...

साहेब , त्या निवडणूक आयोगाला काही सिरीयस घेऊ नका . कागदपत्रे तयार करणे , सादर करणे इत्यादी कामे त्या त्या तज्ञांकडे सोपवा . नवीन पक्ष आणि पक्षचिन्ह रजिस्टर करून घ्या . पक्षाचे काहीही नाव द्या . त्यात "महाराष्ट्र "आला पाहिजे साहेब . सध्या व्हाट्सअप आणि इतर समाज माध्यमे इतकी शक्तिशाली झाली आहेत की दोन तासात तुमचा नवीन पक्ष आणि पक्षचिन्ह संपूर्ण भारताला समजेल .

सुप्रीम कोर्टातही तोच निकाल ...

साहेब निवडणूक आयोगासारखाच निकाल सुप्रीम कोर्टात सुद्धा लागणार आहे लिहून ठेवा . निकालाबाबत नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना विचारा . ते अगोदरच निकालातील ओळ न ओळ तुम्हाला समजावून सांगतील .

प्रत्येक वॉर्ड पिंजून काढा ...

साहेब यांच्या नादी लागू नका .तुम्हाला ते जाणीवपूर्वक बिझी ठेवत आहेत . तुम्ही मुंबईतील प्रत्येक वॉर्ड पिंजून काढा . महाविकास आघाडी अधिक वंचित या सूत्रानुसारच २२७ वॉर्डामध्ये फिरा आणि झंजावात सुरू करा . देशातील सर्व संविधानिक आयोग हे भाजपा आयोग झाल्याने त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार आहात तुम्ही ? त्यांच्याकडून कोणता न्याय मिळणार आहे ? मग कशाला उगाचच वेळेचा अपव्यय करताय ?

खणखणीत बोला ....

साहेब आता तुमची भाषा अधिक धारदार करा . बोलताना उगाच देवेंद्रजी , अमितभाई असे शब्द वापरू नका . आपले इतके प्रचंड नुकसान करून सुद्धा जी आणि भाई हे शब्द आपण कसे वापरू शकता ? बोलताना देवेंद्र , मोदी-शाह असेच शब्द वापरा . सगळा शब्दांचा खेळ आहे . सुप्रीम कोर्टाच्या बाबत बोलताना न्यायालयाचा आम्हाला आदर आहे वगैरे वगैरे असे काही बोलू नका . कोर्टाकडून न्याय मिळणारच नाही असेच खणखणीत बोला . साहेब एक लक्षात ठेवा सगळ्याच पक्षाचे मराठी माणसं आपल्यावर प्रेम करत आहेत . मराठी भाषा बोलून गुजरातचे गोडवे गाणारे मराठी सोडून सर्व तुमच्या सोबत आहेत .

डरो मत ....

मराठीचा मुद्दा हाच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मुद्दा झाला पाहिजे . तुम्हीच जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे . फक्त त्यासाठी दरबारी राजकारणासोबतच रस्त्यावर येऊन राजकारण करा. मतदार यादी आत्ताच तयार करायला घ्या . शाखे- शाखेतून रात्रंदिवस लोकं कामाला लावा . मुंबई महापालिका मराठी माणसांच्याच हाती राहिली पाहिजे आणि ती राहणारच हा प्रचंड विश्वास आहे आम्हाला . राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतील एक प्रसिद्ध नारा होता " डरो मत " . हाच नारा आहाला हुकूमशाहीतून लोकशाहीकडे घेऊन जाईल .

जय भीम ! जय महाराष्ट्र !! जय भारत !!!

आपला चाहता ,

ऍड . विश्वास काश्यप ,

माजी पोलीस अधिकारी ,

मुंबई .

Updated : 19 Feb 2023 1:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top