दलित समाजाच्या बदनामी विरोधात न्यायालयात लढा देणारे वकील शंकरराव खरात
Special series on Dr. Shankarrao kharat’s social and literary work - ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात यांचं यंदा जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी व्हिब्लॉग सीरिज मॅक्स महाराष्ट्र सादर करत आहे.
X
ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात यांचं यंदा जन्मशताब्दी वर्ष. (11 जुलै 1921 ते 9 एप्रिल 2001). त्यानिमित्ताने डॉ. शंकरराव खरात यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी विशेष व्हिडीओंची सीरिज मॅक्स महाराष्ट्र सादर करत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्यानंतरही दलित समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत होते. त्या काळात शिक्षण हे ठराविक समाजाची मक्तेदारी होती. अशावेळी डॉ. बाबासाहेबांच्या प्रेरणेने फाटके कपडे घालणारा विटासारख्या सांगली जिल्ह्यातील गावातील शंकर खरात नावाचा मुलगा वकील झाला. त्या काळात दलितांना अक्षर ज्ञान असणं ही मोठी बाब मानली जायची. त्यात जर कोणी कायद्याचं ज्ञान घेतलं असेल तर विचारायलाच नको. पूर्वी ‘महार वतन कायद्या अंतर्गत’ दलित समाजातील अनेकांवर गुन्हे दाखल केले जात होते. अशावेळी ज्या लोकांकडे जगण्यासाठी पैसे नाहीत, ते केस कशी लढणार? असा प्रश्न निर्माण व्हायचा..
आजही लोकांना न्यायालयात काय चालते ते कळत नाही. तेव्हा काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा. अशा परिस्थितीत मागासवर्गीय समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी शंकरराव खरात न्यायालयात उभे राहिले. लोकांना न्याय मिळवून दिला.
लोखंडी दिव्यावर अभ्यास करुन शंकरराव खरात यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्ररेणेने आटपाडी या गावात शिक्षण घेतले. त्यांची शिकण्याची जिद्द पाहून शिक्षकांनी त्यांना खूप मदत केली. पुढे त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण घेतले. परिस्थितीवर मात करत एल.एल.बी.चं शिक्षण पूर्ण केले.
डॉ. शंकरराव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभला. “मी स्वत: महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे’ असं ते नेहमी म्हणत. डॉ. बाबासाहेबांच्या सहवासात आल्यानंतर त्यांना अधिक गती मिळाली.
बॅंक ऑफ इंडियाचे संचालक, ऑफिसर्स सिलेक्श न कमिटीचे चेअरमन आणि मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू अशी अनेक सन्मानाची पदं तर त्यांनी भूषवलीच. पण त्यांनी इ. स. 1958 ते 1961 या काळात “प्रबुद्ध भारत” या नियतकालिकाचं संपादनही केलं. इ. स. 1984मध्ये जळगाव इथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.
शंकरराव खरात यांचे साहित्य
बारा बलुतेदार, तडीपार, सांगावा, गाव-शीव इ. लिखाण. ‘तराळ-अंतराळ; हे आत्मचरित्र. ‘आज इथं तर उद्या तिथं’ हा ललितलेखसंग्रह. टिटवीचा फेरा, सुटका, दौण्डी, आडगावचे पाणी इ. कथासंग्रह. हातभट्टी, गावचा टिनपोल गुरुजी, झोपडपट्टी, मसालेदार गेस्ट हाऊस, फूटपाथ नंबर 1, माझं नाव इ. कादंबऱ्या प्रकाशित आहेत.