३० वर्षांपूर्वी ऐकलेलं स्वामी अग्निवेश यांच भाषण...
X
तरुण वयात झालेला संस्कार खूप प्रभावी असतो. स्वामी अग्निवेश यांच्या एका भाषणाने कॉलेजच्या वयात किती अंतर्मुख झालो. त्या स्मृती अजूनही ताज्या आहेत. NSS च्या दिल्लीच्या 26 जानेवारीचे परेडसाठी माझी निवड झाली होती. तिथे रोज दुपारी एक दिल्लीतील वक्ता यायचा व आमच्या समोर बोलायचा. त्या शासकीय चौकटीतून भगव्या कपड्यातील स्वामी अग्निवेश आमच्याशी बोलायला एकदा दुपारी आले. सुरुवातीला त्यांचे भगवे कपडे बघून हे बाबा आता काहीतरी धार्मिक बोलणार आहे अशी समजूत होती.
मात्र, ते बोलायला लागले आणि त्यांनी हृदयाच्या तळाला स्पर्श केला. हा त्यात वीट भट्टीतील शोषणावर त्यांच्या प्रयत्नांबद्दल ते सांगत होते. त्यांचे एक वाक्य आजही तीस वर्षानंतर लक्षात आहे. ते म्हणाले "विटेचा रंग लाल असतो, कारण वीटभट्टी मजुराचे रक्त शोषून ती बनलेली असते" त्या वाक्याने आम्ही हललो.
अग्निवेश यांची नजर खूपच भेदक होती. आपल्या आत डोकावून बघत आहेत. असं वाटत राहायचं. मनाच्या तळाशी थेट आपल्यात अपराधी भावना निर्माण करून सामाजिक जाणीव विकसित करत होते. विषमतेचे त्यांनी सांगितलेलं चित्र अनेक वर्षे मनात ठासून राहीले. ज्यातून कृतिशीलता आली... त्यांची उत्कट आणि तळमळीने बोललेली वाक्य आजही मनाच्या तळाशी अजून तशीच रुतून आहेत. एक भाषण ही पुरेसे असायचे त्यांचे..