Home > Top News > राहुल गांधींनी युद्धात उतरायला हवे!

राहुल गांधींनी युद्धात उतरायला हवे!

राहुल गांधींनी युद्धात उतरायला हवे!
X

एखाद्या विद्यापीठातही नसतील, असे स्कॉलर आज कॉंग्रेस (congress) पक्षात आहेत. आणि, हे आज नाही. अगदी पूर्वीपासून आहे. स्थापनेपासूनच्या इतिहासात जात नाही. पण, नेहरू, मौलाना आझाद, डॉ. राजेंद्रप्रसाद, (dr rajendra prasad) डॉ. राधाकृष्णन, राजगोपालचारी असे अत्यंत अभ्यासू आणि स्कॉलर नेते कॉंग्रेसकडे होते. डॉ. आंबेडकरांच्या बुद्धिवैभवाचे तेजही त्यामुळेच कॉंग्रेसला समजले.

आज कॉंग्रेसकडे प्रतिभावान विद्वानांची मांदियाळी आहे, हे विरोधकही मान्य करतील. डॉ. मनमोहनसिंग, प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम, शशी थरूर, जयराम रमेश, कपिल सिब्बल, पृथ्वीराज चव्हाण असे एकाहून एक विद्वान नेते कॉंग्रेसकडे आहेत. त्यापैकी काहींना कॉंग्रेस नेतृत्वाने खास बोलावून पक्षात स्थान दिले आहे. कारण, बुद्धिवैभवाचे तेज समजण्याइतके कॉंग्रेस नेतृत्व प्रगल्भ आहे.

महात्मा गांधी हे त्या अर्थाने स्कॉलर नव्हते, पण 'ओरिजिनल थिंकर' होते. अंगभूत शहाणपण त्यांच्याकडे होते. माणसांच्या गोतावळ्यातून ते समृद्ध झाले होते. बुद्धिमान नेत्यांना सोबत घेत गांधींनी राष्ट्रीय चळवळ उभी केली. नवा देश घडवला.

आज कॉंग्रेस संकटात असताना, पुन्हा अशी देशव्यापी चळवळ उभी करण्याचे, नवी कॉंग्रेस उभारण्याचे आणि नव्याने देशाची घडण करण्याचे आव्हान कॉंग्रेससमोर आहे. विद्वान नेत्यांची फौज असली, तरी यापैकी कोणीही नेता ते करू शकणार नाही. हे फक्त सोनियाच करू शकतात. त्यांनी ते काही प्रमाणात केलेही. विरोधकांनी राजकारणाचा अवकाश व्यापलेला असताना, तडफेने त्या आल्या आणि गलितगात्र कॉंग्रेसला सोनियाचे दिवस आले. मूळ आणि कूळ काढून त्यांच्यावर प्रहार करणाऱ्या पवार आणि ठाकरेंनाही सोनियांमुळेच 'अच्छे दिन' आले!

पण, त्यांचे वय लक्षात घेता, उद्या हे काम राहुल करू शकतात. इथे प्रश्न क्षमतेचा आहे. कमिटमेंटचा आहे. गांधी नसलेल्या पंतप्रधानांनी १९९१ ते १९९६ आणि २००४ ते २०१४ अशी पंधरा वर्षे देश चालवला आहे. त्यामुळे घराणेशाहीच्या आरोपाला काही अर्थ नाही. आणि, 'गांधी' असणे ही काही अपात्रता नाही.

'आयडिया ऑफ इंडिया'साठी सर्वस्व देण्याची तयारी असलेले, एकाकी किल्ला लढवणारे आणि सत्तेचा मोह नसलेले राहुल गांधीच कॉंग्रेसचे नेतृत्व करू शकतात. राहुल यांना पप्पू करणारे कितीही अपप्रचार करोत, पण राहुल यांच्याकडेच तो 'आतला आवाज' आहे, जो कॉंग्रेसला आज हवा आहे. राहुल यांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद घ्यावे आणि नव्या लढाईसाठी सज्ज व्हावे.

ही लढाई निवडणुकीपुरती मर्यादित नाही. उद्या राहुल अध्यक्ष झाल्यावर बिहार वा बंगालमध्ये कॉंग्रेस हरली, तरी फार फरक पडत नाही. २०२४ ला लोकसभा निवडणुकीत पराभूत झाली, तरी बिघडत नाही. १८८५ ला स्थापन झालेल्या कॉंग्रेसने, त्यानंतर साठ वर्षांनी देश स्वतंत्र केला. म्हणून काही रोज उठून टिळक वा गांधींना कोणी दूषणे दिली नाहीत.

हा लढा वेगळा आहे.

हा देश कोणाचा, याचा फैसला करणारा हा लढा आहे. हा देश गांधींचा की गांधींचा खून करणा-यांचा, असा हा फैसला आहे. हा देश आयआयटी उभ्या करणा-या नेहरूंचा की जिओ विद्यापीठांचा, असा हा फैसला आहे. हा देश माझ्या भीमाचा की 'कोरेगाव भीमा' घडवणा-यांचा, असा हा फैसला आहे. बुद्धांचा हा देश निर्बुद्धांच्या हातात गेलेला असताना आणि हतबुद्ध होण्याची वेळ सामान्य माणसावर आलेली असताना, नवे युद्ध लढावे लागणार आहे. राहुल गांधींनी हे आव्हान ओळखायला हवे. आणि, नव्या उमेदीने रिंगणात उतरायला हवे.

Updated : 25 Aug 2020 4:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top