खरात प्रकरणाच्या निमित्ताने
X
भोंदूगिरी नवीन नाही की भोंदू बाबा नवीन नाही. खरा प्रश्न हा आहे की, ही भोंदूगिरी बाबाची पैदास का होते ? याचा शोध घेतला पाहिजे. देव, धर्म यासंकल्पना अगदी आदिमानवा पासून आपल्याला पाहायला मिळतात. त्याकाळातही व्यक्ती हतबल झाला की, आपल्या बुद्धीची हत्यारे खाली टाकून कुठल्या तरी अद्भुत, अलौकिक, अचाट अश्या शक्तीची कल्पना करून त्याची करुणा भाकत असे. त्याचा त्याला किती फायदा होत असे की, होत नसे हा वेगळा मुद्दा मात्र त्याचे एक समाधान होत असे की, मी सर्व प्रयत्न केले, आता मला काही सुचत नाही, आता मी या निसर्गातील सर्वशक्तिमान शक्तीला सांगितलं आहे, आता तोच काय करायचा असेल तर चमत्कार करेल. त्याच्या १०० प्रयत्नातून १०/१५ प्रकरणात जरी यश मिळाले असेल तर तशी त्याची त्या प्रार्थना आणि शक्तीवर विश्वास बसू लागला, ज्यात यश नाही मिळाले त्यात ईश्वराची मर्जी नव्हती असे मानून तो प्रार्थना, पूजा करीतच राहिला. त्यात जस जसा त्याला निसर्गाचे नियम, उमजू लागले, नवे नवे शोध लागू लागले , तो त्याचा उपयोग तो आपल्या समस्या सोडविण्यासाठी करत असे आणि ज्या नाही उमजल्या त्यासाठी तो ईश्वर किंवा ईश्वराचा माध्यम म्हणून बाबा, बुवा किंवा साधू कडे तरी जात असे. यातूनच भोंदूगिरीचा उदय झाला. मात्र सोबत मनुष्याच्या ज्ञानाच्या विज्ञानाच्या कक्षा विस्तारत होत्या तस तसे हे बाबा बुवा त्याच्या जीवनातून कमी कमी होत जात होते. पूर्वी कुठलाही आजार झाला की लोक कुठल्या तरी मंदिर किंवा देवऋषी कडे जात, तो जे पाणी, अंगारा धुपारा देत असे, काही मंत्र सांगत असे त्याचा येऊन व्यक्ती उपयोग करत असे. मात्र यातून आजारी व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती दांडगट असे तो वाचत असे आणि त्याला देवाचा किंवा देवऋषीचा चमत्कार म्हणून प्रचारित केले जाई, मी असे १९७० ते ८० च्या काळात अनेक हिंदू आणि मुस्लिम बाबाचे दरबार पाहिले आहेत, त्यात असणारी शेकडो लोकांची गर्दी देखील पाहिली आहे. मात्र ज्ञानाचा जसा विस्फोट होत गेला त्या पद्धतीने भोंदूगिरीचे देखील नवी नवी आधुनिक रूपे समोर येऊ लागली. तुम्हाला आठवत असेल की सत्तरच्या दशकात तुम्ही अनेकांना भूतबाधा झाल्याचे, करणी केल्याची, जादू टोना केल्याची उदाहरणे गावोगावी आणि शहरात देखील असत, आजकाल अशी प्रकरणे दिसत नाहीत ? भूत गायब झाले की भूत हा आपला भ्रम होता हे लोकांना उमजले.
तर मी आधुनिक भोंदूगिरी बद्दल बोलत होतो. नव्या भोंदूगिरने परस्पर फायद्यासाठी राजकारणासोबत युती केली त्यामुळे ही भोंदूगिरी कुठे कथा वाचकाच्या माध्यमातून, कुठे सहस्र कुंडिय यज्ञ, रुद्र, महारुद्र पूजा, भविष्य कुंडली च्या माध्यमातून कालसर्प योग, ग्रहपूजा असे नवे आणि आधुनिक फंडे आले. पूर्वी सारखे बाबा भयंकर दिसत नव्हते तर अतिशय सुंदर डेकोरेटीव्ह पेहराव, हातात आधुनिक यंत्र, वातानुकूलित कक्ष किंवा दरबार यात भोंदू बाबा बसू लागले.
त्यात भारता सारख्या महाकाय लोकसंख्या असणाऱ्या देशात मागणी प्रचंड पण पुरवठा अतिशय कमी अशा परिस्थिती मनुष्य आपल्याला फायदा मिळवा, संधी मिळावी यासाठी भ्रष्टाचारी आणि दैववादी झाला नाही तरच नवल . त्यात प्रस्थ वाढणाऱ्या कथा वाचक, भोंदू बाबा, कथा वाचक, तीर्थक्षेत्र, दरबार जिथे हजारो लोकांची गर्दी असते तिथे स्थानिक राजकारणी जाऊ लागले. राजकारणी गेले मग अधिकारी आणि इतर उद्योगी जाऊ लागले त्यातून एक बाबाच्या मठाभोवती समांतर सरकार सुरू झाले. तुम्ही छोट्या मोठ्या गावात, तालुक्यात, शहराच्या ठराविक वस्तीत गेलात तर असे धार्मिक केंद्र तुम्हाला सहज सापडेल. याने राजकारणी लोकांचे आयते फावले, त्यांचे काम सोपे झाले. त्याचे मतदार बाबाच्या पाठी आणि हा नेता बाबाच्या सेवेत. यातून राजकारणाचे लोकशाहीकरण होण्या ऐवजी धार्मिकीकरण झाले, राजकारणाचे गुन्हेगारीकरण आधी झालेच होते, त्यात धार्मिकदाबावाचे नवे हत्यार राजकारणाच्या हातात आले. नेत्याच्या एका हाताला धार्मिक गुंड तर दुसऱ्या हाताला सामाजिक गुंड असे चित्र आज समाजात आहे. कोट्यवधीचे भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना आणखी काय हवे होते. फक्त गुंडांना कुठल्या तरी एरियात हप्ता वसुली. किंवा कसला तरी गैर उद्योग करण्याची मुभा आणि भोंदू बाबाला काय हवे तर त्याच्या दरबारात बडे अधिकारी, राजकारणी आले की सामान्य मूर्ख लोक त्याच्याकडे येणार म्हणजे येणार. यातून तिघांच्या वेगवेगळ्या गरजा तर पूर्ण होतच शिवाय अनेक प्रकरणात राजकारणी लोकांना आपली मांडवली करण्यासाठी या सभ्य चेहऱ्याच्या बाबा, बुवांचा तर दम देण्यासाठी गुंडांचा फायदा होत आला. त्यामुळे अर्धवट, नाक्यावरचे भाई, टपोरी हे नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्री, मुख्यमंत्री बनू लागले, उत्तर प्रदेश मध्ये आणि अनेक राज्यात चक्क एकेकाळी बाबा असलेलेच मुख्यमंत्री झाले, गेल्या ४/५ निवडणुका पहिल्या तर अनेक बाबा निवडणुकीला उभे राहिल्याचे आपल्याला दिसेल.
याचा परिणाम असा झाला की, अभ्यासक, विचारवंत, संशोधक, वैज्ञानिक, विवेकवादी विचारधारा मागे पडली. त्यांना कुठलाही वाव सध्याच्या राजकारण आणि समाजकारणात उरला नाही . उलट याचा विपरीत परिणाम असा झाला की, फायद्यासाठी विचारवंत, अभ्यासक यांनी आपली वैचारिक सुंता करून घेऊन दीड दमडीच्या राजकारणी दादा, भाई, अण्णा यांचे प्रतिमा उंचावण्याचा सुपाऱ्या घेऊन सत्तेच्या ताटातील मलई आपल्या ताटात घेण्याचा मार्ग अवलंबला. त्यामुळे समोर जरी दिसत नसले तरी अशा शेकडो लाचार, पत्रकार, विचारवंत, आयडियाबाज लोकांची फौज दीडदमडीच्या नेत्यांचे प्रतिमा उंचावण करीत असतात. त्यांचे रिल्स, फ्लेक्स, त्यांना भाषणाचे मुद्दे, डायलॉग, वेशभूषा, केशभूषा असे सर्व टिप्स ते देत असतात.
मी जे सांगतो आहे ते संत, महापुरुष हजारो वर्षापासून सांगत आले आहे, पण आपण त्याच्याकडून अक्कल घेतली नाही, भक्ती घेतली पण भक्ती च्या आधी मानवी मूल्याची जी शक्ती सांगितली ती घेतली नाही.
लेक हात में भगवी झेंडी रे क्या करम करे पाखंडी.....
नवसे कन्या पुत्र होती , तर का करणे लागे पती,
जत्रा मे बिठाया फत्रा, तीरथ बनाया पाणी, दुनिया भई दिवानी, पैसे की, धुलधानी .....
अशी हजारो उदाहरणे मी देऊ शकतो..
त्यामुळे ही आताची परिस्थिती अशीच राहिली तर कॅप्टन खरात हे आता ताजे प्रकरण आहे ते थोडे दिवस रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या नंतर थंड पडेल, जर यात चाकणकर नसत्या तर एवढे चर्चेत हे प्रकरण आले नसते, प्रसार माध्यमे इतक्या मोठ्या प्रमाणात ते उचलत आहेत याचा अर्थ सरकारचा देखील यामागे काही अजेंडा असू शकतो. नाहीतर शहरातील अनेक धार्मिक केंद्रात महिलांचे शोषण हे संमतीने फायद्यासाठी किंवा मजबुरीचा फायदा उचलत किंवा ब्लॅक मेल करत सुरूच असते. आज मोठ्या बिल्डर, उद्योगपती यांना कोट्यवधीचे कर्ज देणारे कोण आहेत याचा शोध घेतला तर कर्ज आणि त्यावर व्याज वसूल करणे हा धार्मिक बाबांचा मोठा धंदा आहे. मी ज्या शहरात रहातो त्या ठिकाणचा हा माझ्या माहितीतील प्रकार आहे, काही वर्षापूर्वी तर हे कथा वाचक बाबा ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा उद्योग करीत असल्याचा भांडा फोड स्टार प्लस या वृत् वहिनीने केला होता त्यात किरीटभाईजी पासून अनेक धार्मिक चेहऱ्यामागील भामटे समोर आले होते.
यावर उपाय काय ? यावर उपाय म्हणजे ज्यांचा ज्यांचा नैतिक मूल्यावर विश्वास आहे अशा सर्व जाती धर्माच्या लोकांनी सर्वात पहिली गोष्ट केली पाहिजे म्हणजे अशा कुठल्या देवस्थान, धार्मिक स्थळ, बुवा, ज्योतिष , मुल्ला यांच्याकडे जाणे बंद केले पाहिजे, त्यांना देणगी देणे,कुठल्याही धर्माच्या दानपेटीत पैसे टाकणं बंद करणे ही पहिली पायरी. कारण देव जर सर्व शक्तिमान आहे तर आपण त्याला पैसे देऊन त्याचा अपमान करत असतो. देवाला तुमची दैवी मूल्यावर असणारी श्रद्धा आणि भक्ती हवी असते, ही दैवी मूल्य कुठली तर सत्य, अहिंसा, करुणा, प्रेम, बंधुत्व, शीलवान असणे त्याच्यासाठी महत्वाचे असते. तुम्ही कसाही नंगा नाच कराल आणि देव तुम्हाला पावेल , हा तुमचा भ्रम आहे. त्यामुळे घरातील देव्हाऱ्यात जो कुणी तुमचा देव असेल त्याची तुमची जशी श्रद्धा असेल तशी पूजा करा
दुसरे म्हणजे धार्मिक सप्ताह हे बाबा लोकांचे उत्पन्नाचे मोठे साधन असते, यातून ते आपली शक्ती आपल्या राजकीय आका (बॉस) दाखवीत असतात आणि त्यातून त्याच्याकडून लाखो रुपये उकळून तुम्हाला भंडारा देत असतात, त्यामुळे अशा सप्ताह मध्ये जाण्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या परिसरात व्याख्यानमाला सुरू करून विचारवंत, वैज्ञानिक, अभ्यासक यांना बोलावून त्यांच्याकडून जग नेमके कुठे जाते आहे, नव्या युगात आपल्यासमोर कुठली आव्हाने आहेत ? देशाची आर्थिक व्यवस्था कशी आहे ? नवे शोध आणि तंत्रज्ञान कुठले आले आहे ? याबाबत व्याख्याने आयोजित केली तर नव्या मुलांच्या मेंदून नव्या कल्पना आणि विवेकवादी दृष्टिकोन रुजला जाईल
तिसरे म्हणजे चित्रपट, नाटक आणि मालिका मधून मोठ्या प्रमाणात दैववाद पोसला जातो. अशा सिरियल पाहणे बंद करा या एवजी एपिक चॅनेल, डिस्कवरी चॅनेल पाहण्याची सवय आपल्या मुलाना आणि स्वतःला लावा. कारण साधे समीकरण आहे, तुमच्यात दैववाद पेरला की, तुमच्या मेंदूचे पाकीट अलगदपणे मारता येते, एकदा का तुम्हाला बुद्धीबधीर केले की, एखाद्या कळसूत्री बाहुली प्रमाणे तुमच्याकडून हवे ते करून घेता येऊ शकते, मग तुमच्या मुली, बायको, बहीण हिच्याशी शरीर संबंध करायचे ठरवले तरी भोंदू बाबा सहज करू शकतो हे खरात प्रकरणा पूर्वीही हजारो प्रकरणात उघडकीस आले आहे.
त्यामुळे तुमचा देव आणि धर्म हा तुम्हाला अधिक शहाणे करणारा, अधिक चांगला माणूस करणार असला पाहिजे. कुठल्याही देवाला देव पण हे कष्ट आणि तप केल्याशिवाय आणि कठीण परीक्षा दिल्याशिवाय मिळत नसेल तर तो देव आणि त्याचा भामटा भक्त तुम्ही काही कष्ट मेहनत तप न करता कुठल्या तरी मंत्र तंत्राने, पूजेने, जादूने तुमच्या पेक्षा लायक व्यक्तीला सोडून तुम्हाला ते देईल, माझा तरी विश्वास नाही, तुम्ही अंध विश्वासू आणि मूर्ख असाल तर तुम्ही अशा व्यवस्थेचे ग्राहक आणि पोशिंदे आहात, नव्या पिढी साठी तुम्ही आणखी नवा आणि मजबुत ट्रॅप निर्माण करत आहात, इतके लक्षात ठेवा मग यात तुमची पत्नी, लेक, बहीण, सून कुणीही बळी जाऊ शकते. कारण बुद्धी बधिरता ही असतेच तशी. पुण्यातील एका दांपत्याने चक्क दोन कोटीची मालमत्ता अश्याच भोंदू पती पत्नीच्या नावे करून स्वतः आता भाड्याच्या घरात राहून पोलिस स्टेशनच्या चकरा मारतो आहे.
सर्वात शेवटचे म्हणजे खरात नालायक होता, त्याला देवाने शिक्षा केली मात्र माझे गुरू, माझा बाबा, माझा ज्योतिषी, माझी बैठक अशी कशी नाही असे बोलून याच चरकात मान घालून पिळत रहाणारे ही व्यवस्था चालवत असतात...
मी जे मनापासून सांगितलं ते तुम्ही इथ पर्यंत वाचले , आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद, मी जे सांगितलं त्यावर अंधतेने विश्वास ठेवू नका, तुमच्याही धडावर तुमचे डोके आहे, विचार करा, चिंतन करा, योग्य वाटले तर इतराना सांगा कारण आपण जोक्स, चुघल्या सर्वांना आवडीने सांगतो त्या असे काही सांगा.
किरण सोनावणे
९९२२६६६६०७






