Home > Election 2020 > बहुजनांच्या समर्थनावर हिंदूराष्ट्राची निर्मिती होतेय – रवीशकुमार

बहुजनांच्या समर्थनावर हिंदूराष्ट्राची निर्मिती होतेय – रवीशकुमार

बहुजनांच्या समर्थनावर हिंदूराष्ट्राची निर्मिती होतेय – रवीशकुमार
X

23 मे 2019 ला जेव्हा लोकसभा निवडणूकांचे निकाल येत होते, माझ्या व्हाट्सएपवर तीन प्रकारचे मेसेज येत होते. आता दोन प्रकारच्या मेसेजविषयी बोलणार आहे आणि शेवटी तिसऱ्या प्रकारच्या मेसेजविषयी. बहुतांश मेसेज असे होते की

‘’आज देखते हैं रवीशकुमार की सूजी है या नहीं, उसका चेहरा मुरझाया है या नहीं” एकानं तर लिहिलं की त्याला रवीशकुमारला अपमानित होतांना पाहायचं, बुडतांना मरतांना पाहायचं, पंक्चर काढतांना पाहायचंय, कुणीतरी विचारलं की बरनॉल ची ट्युब आहे की पाठवू, कुणी म्हटलं की तुमचा चेहरा पाहायचाय, तेव्हा तुमचा फोटो पाठवून द्या. मी पण सगळ्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. एवढचं नाही तर मी लाईव्ह कव्हरेज करत होतो. तेव्हाही अशा प्रकारच्या मेसेजचा उल्लेखही केला आणि स्वतःवरच हसलो. दुसऱ्या प्रकारच्या मेसेजमध्ये असं लिहिलं होतं की, आजपासून तुम्ही नोकरीच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पाण्याची समस्या दाखवणं बंद करा. जनता याच लायकीची आहे, बोलणं बंद करा. तुम्हांला वाटत नाही तुम्हीही रिजेक्ट झाला आहात, तुम्हांला विचार केला पाहिजे की, तुमची पत्रकारिताही मोदींना हरवू शकली नाही. मी पूर्वग्रहदूषितपणा ठेवतच नाही. यावरही माझं लिहून झालंय.

2019 चा जनादेश माझ्या विरोधात कसा आला ? मी गेल्या पाच वर्षांत जे लिहिलंय, बोललोय त्याचीही कसोटी लागली होती का ? ज्या लोकांचं दुःख आम्ही दाखवलं, ते चुकीचं होतं का ? मला माहिती होतं की युवक, शेतकरी आणि बँकांमध्ये गुलामासारखं काम करणारी लोकं ही भाजपचे समर्थक आहेत. ते ही माझ्याशी कधी खोटं बोलले नाहीत. सर्वात पहिले किंवा नंतरही नरेंद्र मोदींचे समर्थक असल्याचंच ते सांगत होते. मी याच आधारावर त्यांच्या समस्या नाकारल्या नाहीत के ते मोदी समर्थक आहेत. त्या दाखवल्या यासाठी की त्या समस्या वास्तविक होत्या. आज एकही खासदार सांगू शकत नाही की त्यांनी पन्नास हजार पेक्षा अधिक लोकांना नोकरीचं नियुक्तीपत्र मिळवून दिलंय. मी चालवलेली ‘’नोकरी सीरीज’’ च्या मालिकेमुळे दिल्लीपासून ते बिहारपर्यंत लोकांना नोकरीची नियुक्तीपत्रं मिळालीत. कित्येक परीक्षांचा निकाल लागू शकला. नियुक्तीपत्र मिळालेल्यांपैकी अनेकांनी माझी माफी मागितली, की त्यांनी मला शिव्या दिल्या होत्या. माझ्याकडे शेकडो पत्रं आणि मेसेजचे स्क्रीन शॉट्स आहेत ज्यामध्ये लोकांनी मला शिव्या दिल्या होत्या, त्याविषयी त्यांनी माफीही मागितली आहे. यापैकी कुणीही हा पुरावा देऊ शकत नाही की मी कुणालाही मोदींना मत देऊ नका, असं सांगितल्याचा. हा हे नक्की सांगितलं होतं की, तुम्ही मनापासून मत द्या, मत दिल्यानंतर नागरिक बना.

पन्नास हजार पेक्षा अधिक लोकांना नोकरीचं नियुक्ती पत्र मिळवून दिल्याचं जे यश आहे, ते मी माझ्या छातीवर लावून ठेवेल की, मोदी समर्थकांनी मला अपमानित केल्याचं ते प्रतिक आहे. कारण ते मला नाही तर त्या मोदी समर्थकांना अपमानित करतील ज्यांनी मला त्यांच्या समस्यांसाठी संपर्क केला होता. नोकरी मालिकेचाच परिणाम म्हणून प्रचंड बहुमतातील मोदी सरकारलाही रेल्वेमध्ये लाखो पदांसाठी नोकरीची जाहिरात काढावी लागली. त्याला मुद्दा बनवण्यात आला. तुम्ही बघा की, गेल्या पाच वर्षांत रेल्वेमध्ये किती पदांसाठी नोकरीची जाहिरात आली आणि शेवटच्या वर्षात किती जागांसाठी जाहिरात आली. नोकरीची मागणी गोदी मीडिया करत होता का की, रवीशकुमार करत होता ? प्राईम टाईम मध्ये मी हा विषय दाखवला. रेल्वेविषयक मालिकेमध्ये स्वांतत्र्य सेनानी एक्सप्रेस सारख्या रेल्वे या काही वेळेसाठी का होईना वेळेवर धावण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे मोदींना विरोध होता का ? बिहारमधील महाविद्यालयात तीन वर्षांच्या कला शाखेच्या पदवीसाठी पाच वर्ष संघर्ष करणाऱ्या युवकांच्या प्रश्नावर बोलणं म्हणजे मोदींना विरोध होता का ?

या पाच वर्षात मला कोट्यवधी लोकांनी वाचलं. हजारोंच्या संख्येनं ऐकलं. टीव्हीवर पाहिलं. बाहेर भेटले तर गळाभेट घेतली. प्रेम-स्नेह दिलं. त्यात मोदी समर्थकही होते, संघाचे लोकंही होते आणि विरोधी पक्षाचीही लोकं होते. त्यात भाजपचीही लोकं होती ते चुपचाप येऊन माझं अभिनंदन करत होते. मला एक गोष्ट समजली ती अशी की, मोदी समर्थक असो की मोदी विरोधक गोदी मीडिया आणि पत्रकारितेतला फरक त्याला समजतो. कारण ...

गोदी मीडियाचे अँकर मोदींच्या लोकप्रियतेच्या आडून माझ्यावर टीका करतात, त्यामुळं मोदी समर्थकाकडे गप्प बसण्याशिवाय पर्याय नसतो. भारतासारख्या देशात प्रामाणिक आणि नैतिक होण्यासाठी सामाजिक आणि संस्थात्मक अशी व्यवस्थाच नाहीये. इथं प्रामाणिक होण्यासाठीची लढाई ही एकट्याचीच आहे आणि ती पराभूतच होते. लोकं उपहासानं विचारतात की कुठं गेला सत्यवादी रवीशकुमार. कुठं गेले पत्रकारितेवर बोलणारे रवीशकुमार. माझ्यात कमतरता आहे. मी आदर्श नाहीये, तसा दावाही कधी केला नाही. मात्र, जेव्हा तुम्ही म्हणता की, तुम्हीही त्याच पत्रकारितेचं तत्त्व, महत्त्व पुन्हा सांगत असता, मी किंवा माझ्यासारखे पत्रकार तेच तर सांगतात.

मला माहिती होतं की मी ज्या व्यवसायात आहे तिथं मी पराभूत होण्यासाठीची लढाई लढतोय. इतक्या मोठ्या सत्तेविरोधात, भांडवलशाही कॉर्पोरेटविरोधात लढण्याची ताकद फक्त महात्मा गांधींमध्ये होती. मात्र, जेव्हा मला वाटलं की, माझ्यासारखे कित्येक पत्रकार स्वतंत्रपणे कमी आर्थिक मोबदल्यामध्ये पत्रकारिता करत आहेत, तेव्हा मला वाटलं की मला आणखी जास्त काम करावं लागेल. मी हिंदीभाषिक वाचकांसाठी दररोज सकाळी इंग्रजीतून अनुवादित मजकूर लिहायचो तो मोदी विरोधासाठी नाही तर हिंदीचा वाचक सक्षम व्हावा यासाठी तो प्रपंच होता. त्यात कित्येक तास गेले. मला नेमकं माहित होतं की, मी हे फार काळ एकटा करू शकत नाही. त्यात मोदी विरोधाचा गंध नव्हता तर माझ्या व्यवसायाविषयी असलेलं अधिकची प्रेमभावना त्यामागे म्हणूनच सर्वस्व पणाला लावलं होतं. आपल्याच व्यवसायावर प्रश्न उपस्थित करण्याची मोठी जोखीम होती, ती म्हणजे स्वतःसाठी रोजगाराच्या संधी गमावणं. तरीही आयुष्यात काही वेळेसाठी ते ही करून बघितलं. अशा गोष्टींचं स्वतःचं असं एक टेन्शन असतं, जोखीम असते, मात्र यातून जे शिकायला मिळतं ते दुर्मिळच. गुडीगुडी प्रश्न विचारून मी मोदी समर्थकांमध्ये लपू शकतो, मात्र तुम्हा वाचकांसमोर मी येऊ शकत नाही.

मी धर्मांशक्तींविरोधात सर्वांसमोर बोललो. आजही बोलणार. तुमच्यामध्ये धार्मिक आणि जातीयतेचा पूर्वग्रदूषितपणा आहे. तुम्ही मशीन होत चाललात. मी पुन्हा सांगतोय की धार्मिक आणि जातीयतेचा पूर्वाग्रहाचा प्रभाव असलेली धार्मिकता तुम्हांला एक दिवस मानवी बॉम्ब बनवेल. स्टुडिओमध्ये नाचणाऱ्या अँकरला पाहून तुम्हांलाही वाटत असेल की ही पत्रकारिता नाहीये. बँकांमध्ये गुलामासारखं काम करणाऱ्या शेकडो महिला अधिकाऱ्यांनाही त्यांचा गर्भ पडण्यापासून ते शौचालयाची भीती दाखवून काम करण्यासंदर्भातलं पत्र काय मला मोदींचा विरोध करण्यासाठी त्यांनी लिहिलं होतं का ? त्यांची पत्रं आजही माझ्याजवळ आहेत. मी त्यांच्या प्रश्नांना आवाज दिला आणि कित्येक बँकांच्या शाखांमध्ये महिलांसाठी स्वतंत्रपणे शौचालयं बनवण्यात आली. मी मोदींचा अजेंडा नाही चालवला. ते माझं कामंही नव्हतं. जर तुम्ही माझ्याकडून याच अपेक्षा ठेवत असाल तर तेव्हाही मी हेच सांगेल की एक वेळ नाहीतर शंभर वेळा विचार करा.

पत्रकारितेतही गतकाळातील गुन्ह्यांच्या स्मृती आहेत. त्या स्मृतींना मोदींकडून कुठल्याही क्षणी उजाळा दिला जातो. मात्र, ते हे विसरतात की त्यांच्या काळातील पत्रकारितेचं मॉडेल हे गतकाळातील गुन्ह्यांवरच आधारित आहे. मला वाटत नाही की पत्रकारिता हरलीय. पत्रकारिता संपून जाईल ही गोष्ट वेगळी आहे. जेव्हा पत्रकारितेचा शिल्लक राहिलेली नाही, तर मग तुम्ही पत्रकारितेसाठी माझ्याकडे का पाहत आहात ? तुम्ही काय संपूर्ण संपवण्याचा संकल्प केलाय ? जेव्हा मी स्वतःची गोष्ट बोलतो तेव्हा त्यात सर्व पत्रकारांचा समावेश असतो. जे सध्या संघर्ष करत आहेत. खरंय की मीडिया हाऊसेसमध्ये काही ठराविक अनैतिक शक्तींमुळं पत्रकारिता संपलेली आहे. त्याचं संरक्षण एकटा माणूस करू शकत नाही. अशा परिस्थितीत आमच्यासारखी लोकं काय करू शकतील ? तरीही अशा कार्याला केवळ मोदी विरोधातल्या चश्म्यातून पाहणं योग्य नाही. आपल्याच व्यवसायात घसरत चाललेल्या गोष्टींना विरोध हा जास्त आहे. हीच गोष्ट मोदी समर्थकांना या काळात समजली पाहिजे. मोदींचं समर्थन ही वेगळी गोष्ट आहे. चांगल्या पत्रकारितेचं समर्थन ही वेगळी गोष्ट आहे. मोदी समर्थकांनाही आवाहन करतो की, तुम्ही गोदी मीडिया चॅनेल पाहणं बंद करा. वर्तमानपत्र वाचणं बंद करा. याशिवायही मोदींचं समर्थन करणं शक्य आहे.

असो, 23 मे 2019 रोजीचं वादळ आता गेलेलं आहे, मात्र अजूनही हवा वेगानं वाहतेय. नरेंद्र मोदी यांनी भारतीयांच्या मन-मेंदूवर एकछत्री राज्य प्रस्थापित केलंय. 2014 मध्ये मोदींना मनापासून मतं मिळाली होती. 2019 मध्ये तन-मन मिळून मतं मिळाली आहेत. शरीरावर आलेली अनेक संकट झेलून लोकांनी मनापासून मतदान केलंय. त्यांच्या या विजयाला मोठ्या मनानं स्विकारलं पाहिजे. मी पण स्विकार केलाय. लोकांना डावलून लोकशाही होऊ शकत नाही. याच आनंदात भविष्यातील धोके बघता येऊ शकतात. मात्र, ते धोके पाहण्यासाठी तुम्हांलाही सहभागी व्हावं लागेल. की अशी कुठली गोष्ट आहे जी लोकांना मोदी बनवते. लोकांना मोदी बनवणं म्हणजे आपल्या नेत्याशी एकरूप होणं. एकप्रकारे व्हिलन होणं. याला अंधभक्तीही म्हणू शकता, मात्र याला भक्तीच्या श्रेष्ठ अवस्थेच्या रूपातही बघणं गरजेचं आहे. मोदींसाठी लोकांनीच मोदी होणं हे त्या श्रेष्ठ अवस्थेचं प्रतिक आहे. घर-घर मोदी ऐवजी तुम्ही जन-जन मोदी म्हणू शकता.

मी नेहमीच म्हणतो की, 2014 पासून या देशाचा भूतकाळ आणि भविष्य समजून घेण्याचे संदर्भ बिंदू बदलले आहेत. निवडणूकांच्या आधीच पंतप्रधान मोदी हे नव भारताची गोष्ट करू लागले होते. तो नवा भारत त्यांच्या विचारातील भारत बनलाय. प्रत्येक जनादेशामध्ये शक्यता आणि शंका असतात, याशिवाय कुठलाच जनादेश नसतो. लोकांनी या सर्व शंकांमध्ये शक्येतला निवडलंय. याचाच अर्थ असा की या सर्व शंकांचं निरसन करण्याचं सामर्थ्य हे मोदींमध्ये आहे. ते भयभीत नाहीत. हा भय असलेला जनादेश आहे आणि या जनादेशाला घाबरण्याचं कारणही नाही. ऐतिहासिक कारणांमुळं जनतेमध्ये अनेक गोष्टींविषयी असंतोष होता. कित्येक दशकं हा असंतोष त्यांच्या मनात होता. बऱ्याच काळानंतर ते या अदल-बदलाला कंटाळले होते. लोकांनी त्या गोष्टीसोबत जाणं पसंत केलं. ज्यांनी भूतकाळातील अनैतिक गोष्टींवर प्रश्न विचारायला सुरूवात केली. लोकं भूतकाळातील असंतोषाच्या स्मृतींमधून बाहेर आले नव्हते. यावेळी असंतोषाच्या त्याच स्मृती विचारधारेच्या नावाखाली बाहेर आल्या आहेत, त्याला नवीन भारत म्हटलं जाऊ लागलंय.

मी नेहमी सांगतोय, की नरेंद्र मोदींचा पर्याय तोच होऊ शकतो ज्याच्यामध्ये नैतिक शक्ती असेल. तुम्ही माझ्या लेखांमध्ये नैतिक शक्तीसंदर्भात लिहिलेलं वाचू शकाल. यात शंकाच नाही की, मोदींच्या बाजूनं अनैतिक शक्ती आणि साधनांचं भरपूर भांडार आहे. मात्र, लोकं त्यांना भूतकाळातील असंतोषाच्या स्मृतीमधील गुणदोषाप्रमाणे पाहत आहेत, ते सहनही करत आहेत. नरेंद्र मोदी हे त्या स्मृतींना जिवंतही ठेवतात. तुम्ही बघा की, ते क्षणोक्षणी त्या स्मृतींना अधोरेखित करत असतात. जनतेला ते भूतकाळातील वर्तमानात ठेवतात. लोकांना माहित आहे की, विरोधी पक्षांमध्येही अऩैतिक शक्ती आहेत ज्या मोदींच्या बाजूनं आहेत. मात्र, विरोधकांना वाटलं की लोकं दोन समान अनैतिक शक्तींमध्येही लोकं त्यांनाच निवडतील. त्यामुळं विरोधकांनी शिल्लक राहिलेल्या अनैतिक शक्तींचा आधार घेतला. मोदींनी त्या अनैतिक शक्तींना कमजोर करून टाकलं. विरोधी पक्षातले नेते भाजपमध्ये जाऊ लागले. विरोधी पक्ष मनुष्यबळ आणि आर्थिक बाजूनं रिकामा होऊ लागला. या दोघांचा आधार अनैतिक शक्तीच होता. मात्र, अशा परिस्थितीनंच विरोधकांसाठी नवीन संधी उपलब्ध केली. त्याला निवडणूकीची चिंता सोडून आपल्या राजकीय आणि वैचारिक पुनरूज्जीवनाचं पुनर्वसन करण्याची मात्र विरोधकांनी ती केली नाही.

विरोधकांनी भूतकाळातील असंतोषासाठी माफी मागायला पाहिजे होती. नव्यानं विश्वास द्यायला पाहिजे होता की आता असं होणार नाही. ही गोष्ट लोकांपर्यंत आणणं म्हणजे कडक उन्हात पायी चालल्यासारखं होतं. मात्र, विरोधकांनी ते ही केलं नाही. 2014 नंतर विरोधक चार वर्ष घरीच बसून राहिले. लोकांमध्ये लोकांसारखं ते गेलेच नाहीत. त्यांच्या समस्यानुरूप विरोधक बोलत राहिले आणि घरी जाऊन बसले. 2019 च्या सुरूवातीला आले आणि उरलीसुरली अनैतिक शक्तीच्या समीकरणातून एक विशाल अनैतिक शक्तीविरोधात संघर्षांची अपेक्षा बाळगूनच. विरोधकांना हे समजलं पाहिजे होतं की, वेगवेगळ्या राजकीय पक्षांची राजकीय प्रासंगिकता संपलेली आहे. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी किंवा राष्ट्रीय जनता दल यांच्या सोबतीनं लोकशाहीमध्ये जे सामाजिक संतुलन आलं होतं, त्याची आज कुठलीच भूमिका नाहीये.

या छोट्या-छोट्या गटांनी समाजातील मागास आणि वंचित घटकांना सत्तेची चक्र फिरवून पुढे आणण्याचं ऐतिहासिक काम केलंय यात काहीच शंका नाही. मात्र, हे करताना त्यांनी याच वर्गातील दुसऱ्या आणि इतर वंचित घटकांकडे दुर्लक्ष केलं. आता या गटातील प्रासंगिकताच शिल्लक नाही, अशा परिस्थितीत या गटांना भंग करण्याचं साहस पण असायलाच हवं. आपल्या जुन्या महत्वाकांक्षाना भंग करून दिलं पाहिजे होतं. भारतीय आता नवा विचार आणि नवीन गटांचं स्वागत करतीलच, पण तोपर्यंत नरेंद्र मोदी यांच्या विचारांवरच ते चालतील.

समाज आणि राजकारणाचं हिंदूकरण झालंय. हे स्थायी रूपात झालं असं मी मानत नाही. जसं बहुजन शक्तींचा उभार हा स्थायी नव्हता त्याचप्रमाणे हे ही स्थायी नाहीये. हे इतिहासाचं एक चक्र आहे जे फिरलंय. जसं मायावती सवर्णांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाल्या होत्या. त्याचप्रमाणे आज आरएसएस बहुजनांच्या समर्थनावर हिंदूराष्ट्र बनतोय. जे सवर्ण होते ते आपापल्या जातींच्या आधारावर कधी सपा-बसपा कधी राष्ट्रीय जनता दलाच्या व्यासपीठावर आपला आधार शोधत होते. जेव्हा त्यांचं तिथं वर्चस्व वाढलं तेव्हा उरलेला बहुजन हा सर्वजनच्या मंचावर निघून गेला.

बहुजनांच्या राजकारणानं कधी जातींच्या विरोधात राजकीय अभियान चालवलं होतं, जातींवर आधारित राजकारण होतं तेव्हा आरएसएसनंही जातीवर आधारित राजकारणाला सुरूवात केली. हे ही खरंय की नंतर प्रादेशिक पक्षांनीही विकासाचं राजकारण करायला सुरूवात केली, मात्र दुर्देवानं त्यांना राष्ट्रीय स्तरावर स्वतःला उभं करण्यात अपयश आलंय. चंद्रभान प्रसाद यांची एक गोष्ट आठवली. ते म्हणायचे, मायावती आर्थिक मुद्द्यांवर का बोलत नाहीत, परकीय धोरणांवर बोलत नाहीत, हीच परिस्थिती इतर प्रादेशिक पक्षांचीही आहे. हेच पक्ष आपापल्या राज्यांमध्ये राजकारण तर करतात मात्र देशाचं राजकारण करू शकत नाहीत.

बहुजनांचे म्हणून जे पक्ष पुढे आले त्यांनी नंतर विचारधारेचं पुस्तकचं फेकून दिलंय. त्यांच्याकडे आंबेडकरांसारखे सर्वात तार्किक व्यक्तिमत्व आहे, मात्र आंबेडकर आता प्रतिक आणि अहंकारचं कारण झाले आहेत. छोटे-छोटे पक्ष चालवण्याइतपतच आंबेडकर आता बंदिस्त झालेत. आमचे मित्र राकेश पासवान बरोबर बोलतात की, दलितांच्या राजकारणाच्या नावावर आथा राष्ट्रीय अध्यक्ष मिळू लागलेत, मात्र राजकारण होत नाही. बहुजनांचं राजकारण एक दुकान झालंय, जसं गांधीवाद नावाचं एक दुकान आहे. त्यात विचारधारेवर चालणारा कुणीही आजपर्यंत राष्ट्रीय स्तरावर एखादा राजकीय पर्याय म्हणून पुढे येऊ शकलेला नाही. तो पक्ष नाही तयार करत, स्वतःच्या हितासाठी तो संघटना काढतो. आपल्या जातीचं दुकान घेऊन तो एका पक्षातून दुसऱ्या पक्षात ये-जा करतो. त्याच्यामध्येही आता अहंकार आलाय. तो बसपा किंवा इतर बहुजन विचारधारेच्या पक्षांच्या कमकुवत बाजूंवर बोलतच नाही.

होय, तो अहंकारच होता की माझ्यासारख्याच्या लिखाणालाही जातीच्या आधारावर डावललं जाऊ लागलं. मी आपल्या प्रतिबद्धतेपासून विचलित झालो नाही. मात्र, प्रतिबद्धतेचं दुकान चालवणाऱ्यांनी आंबेडकरांच्या नावाचं वापर शस्त्रांसारखा करायला सुरूवात केलीय. ते लोकांना आदेश द्यायला लागलेत, की कुणी काय लिहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे भाजप समर्थक राष्ट्रवादाचं प्रमाणपत्र वाटतात, तसंच काही आंबेडकरवादी सुद्धा प्रमाणपत्र वाटू लागलेत.

आम्हांला हे लक्षात घेतलं पाहिजे की, बहुजनांच्या पक्षात आता कोणी कांशीराम नाहीये. कांशीराम यांच्या प्रतिबद्धतेला तोड नव्हती. ती वैचारिक प्रतिबद्धता होती. आता आपल्याकडे प्रकाश आंबेडकर आहेत जे आंबेडकरांच्या नावावर छोटी उद्दिष्ट ठेवून राजकारण करत आहेत. हीच परिस्थिती लोहियांचीही झाली होती. अशीच परिस्थिती जे आंबेडकरांप्रति प्रतिबद्ध आहेत त्यांचीही परिस्थिती ही गांधीप्रति प्रतिबद्ध असलेल्या गांधीवाद्यांसारखीच झालीय. त्याला पर्याय हा आघाडी-युती नाही तर पुनर्जीवन हाच आहे, तो आगामी निवडणुकांसाठी नाहीये तर भारताच्या वैकल्पिक भविष्यासाठी आहे.

तुम्ही बघितलं असेल की या पाच वर्षांत मी या पक्षांवर कमी लिहिलेलं नाही. डाव्यांबाबत तर बिल्कुल नाही लिहिलंय. मला वाटतं की, डाव्या पक्षांची विचारधारा आजही प्रासंगिक आहे. मात्र, त्यांचे पक्ष आणि पक्षात काम करणारं मनुष्यबळ हे प्रासंगिक नाहीये. त्यांची भूमिका संपलेली आहे. ती सडतेय. डाव्यांकडे फक्त कार्यालयं शिल्लक राहिलेली आहेत. काम करण्यासाठी काहीच शिल्लक राहिलेलं नाही. डाव्या विचारसरणीला मानणारी लोकंचं म्हणतात की, डाव्या पक्षांच्या कार्यक्रमातच डावा विचार दिसत नाही. कारण पक्ष म्हणून डाव्यांची भूमिका संपलीय. हे ही खरंय की महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन उभारण्यासाठी बीजू कृष्णन सारख्या लोकांनी मोठं काम केलं होतं. हे त्या विचारधारेचं यश होतं, त्या पक्षाचं नाही. आता या पक्षांना भंग करायची वेळ आलीय. नवीन विचार करण्याची वेळ आलीय. मी पक्षांच्या विविधतेचा समर्थक आहे, मात्र अशा विविधतेचा उपयोग नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. या सर्व गोष्टी काँग्रेसलाही लागू होतात. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही भाजप दिसते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेस सोडून बाकी सगळं दिसतं. काँग्रेसनं एकतर निवडणूका लढणं बंद करावं किंवा निवडणूकांना जीवन-मरणाच्या प्रश्नांप्रमाणे लढू नये, त्यांनी काँग्रेस व्हावं.

काँग्रेस नेहरूंचा बचाव करू शकली नाही. काँग्रेस पटेलांपासून ते बोस यांचासुद्धा बचाव करू शकलेली नाही. स्वातंत्र्य संग्रामातील विविधता, संग्रामातील सौंदर्य यांच्याशी निगडीत भूतकाळातील स्मृतीही काँग्रेस जिवंत करू शकलेली नाही. गांधींच्या विचारांनाही काँग्रेस उभी करू शकली नाही. आज तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यासोबत दीनद्याल उपाध्याय यांच्यासंदर्भात चूकीचं वक्तव्य करा, तो उत्तरात त्यांच्याविषयी शंभर गोष्टी तुम्हांला सांगेल. पाच वर्षात काँग्रेस नेहरूंसाठी तसं करू शकलेली नाही. मी याच एका निकषावर काँग्रेसचा गड ढासळतांना पाहतोय. राजकारण हे विचारधारेच्या जमिनीवर उभं राहतं, ते नेत्यांच्या शक्यतांवर उभं राहत नाही. आता एकच मार्ग राहिलाय. तो म्हणजे भारतातील वेगवेगळ्या राजकीय पक्षात जे मनुष्यबळ शिल्लक राहिलंय त्यांना आपापले पक्ष सोडून कुठल्या तरी एकाच पक्षात गेलं पाहिजे. जिथं विचारांचा पुनर्जन्म होतो, नैतिक बळ आहे आणि मनुष्यबळाचं हस्तांतरण आहे. हीच गोष्ट मी 2014 मध्येही लोकांना सांगितली होती. मग नंतर मलाच माझं हसू आलं की मी कुठला विचारवंत लागून गेलोय, जो हे सगळं सांगतोय. आज लिहितोय.

इतकं झाल्यावरही विरोधकांबाबत सहानुभूती का आहे ? विरोधकांच्या राजकीय भूमिकेला कमी प्रमाणात दाखवलं आणि त्यावर लिहिलं बोललं गेलं. कारण 2014 नंतर प्रत्येक पातळीवर नरेंद्र मोदीचं प्रमुख झाले होते. फक्त सरकारी पातळीवरच नाही, सांस्कृतिक ते धार्मिक पातळीपर्यंत मोदींशिवाय काहीच दिसलं नाही आणि दुसरं काही नव्हतंही. जेव्हा भारतातील 99 टक्के मीडिया लोकशाहीच्या मूळ भावनेलाच तुडवत होता तेव्हा मी त्यात एक संतुलन आणण्याचा प्रयत्न केला. असहमती आणि विरोधीपक्षांच्या प्रत्येक गोष्टींचा सन्मान केला, त्याची टर उडवली नाही. हे मी विरोधी पक्षांसाठी करत नव्हतो तर माझ्या कुवतीनुसार भारतीय लोकशाहीला अपमानित होण्यापासून वाचवण्यासाठी करत होतो. मला इतकं मोठं टेन्शन घ्यायला नको होतं, कारण हे माझं टेन्शन नव्हतं. तरीही वाटलं की, प्रत्येक नागरिकामध्ये विरोधक आणि लोकशाहीमध्ये विरोधक नसतील तर सर्व पोकळ होऊन जाईल. माझ्या या विचारात भारताचं भलं करण्याचीच भावना होती.

मुझे अच्छा लगा कि कई मोदी समर्थकों ने लिखा कि हम आपसे असहमत हैं मगर आपकी पत्रकारिता के कायल हैं। आप अपना काम उसी तरह से करते रहिएगा। ऐसे सभी समर्थकों का मुझ में यकीन करने के लिए आभार। मेरे कई सहयोगी जब चुनावी कवरेज के दौरान अलग-अलग इलाकों में गए तो यही कहा कि मोदी फैन भी तुम्हीं को पढ़ते और लिखते हैं। संघ के लोग भी एक बार चेक करते हैं कि मैंने क्या बोला। मुझे पता है कि रवीश नहीं रहेगा तो वे रवीश को मिस करेंगे।

नरेंद्र मोदींचा प्रचंड मोठा विजय झालाय. मीडिया पराभूत झालाय. प्रत्येक विजयात एक पराभव असतोच. तोच पराभव या विजयात मीडियाचा झालेला आहे. मीडियानं लोकशाहीच्या मर्यादांचं पालन केलेलं नाही. आज गोदी मीडिया चे लोक मोदींना मिळालेला विजय हा स्वतःचा समजत आहेत. प्रत्यक्षात आता त्यांच्याकडे फक्त मोदीच शिल्लक राहिलेत. पत्रकारिता शिल्लकच राहिलेली नाही. पत्रकारितेचा धर्मच संपलाय. भारतीयांनी पत्रकारितेला नाकारलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी हा पण जनादेश असेल की आम्हांला मोदी हवे आहेत पत्रकारिता नकोय. यानंतरही माझा विश्वास त्या मोदी समर्थकांवरच आहे. ते मीडिया आणि मोदी यांच्या भूमिकेतील फरक ओळखतात, तो समजून घेतात. त्यांनाही कदाचित असा भारत नको असेल जनतेचा प्रतिनिधी म्हणून पत्रकार आपला पत्रकारितेचा धर्म सोडून नेत्यांच्या पायांमध्ये दिसू लागलाय.

दोन वर्षांपुर्वी दिल्लीत राहणाऱ्या एका 80 वर्षांच्या जेष्ठानं मला गीतेची छोटी आवृत्ती पाठवली. लांबलचक पत्रही लिहिलं आणि माझ्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. त्यांनी ही गीता मी स्वतःसोबत ठेवावं असा आग्रह धरला. मी त्यांचा आग्रह मान्य केला. मी ती गीता माझ्या बॅगेत ठेवलीय. जेव्हा लोकांनी सांगितलं की, तुम्ही आता सुरक्षित नाही, स्वतःची काऴजी घ्या...मी आज तीच गीता चाळत होतो. त्यात एक सूत्र आहे, जे मी तुमच्यासोबत शेअर करतोय.

अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि, तत: स्वधर्मं कीर्ति च हित्वा पापमवाप्स्यसि।।

याचा अर्थ असा की तुम्ही माझ्यावर प्रेम करत राहा. मला अपमानित करून तुम्हांला काय मिळणार आहे. तुमचाच स्वाभिमान मोडेल की, या महान भारतात तुम्ही एका पत्रकाराचा साथही देऊ शकले नाही. माझ्यासारख्यानं तुम्हांला या अपराध बोधपासून मुक्त होण्याची संधी दिली आहे. हा अपराध बोध तुमच्यावरही तसाच उलटेल जसा सध्या तो विरोधी पक्षांवर त्यांच्या भूतकाळातील अनैतिकतांमुळे पडतोय. त्यामुळंच तुम्ही मला मजबूत करा. माझ्यासारख्यांसोबत उभे राहा. तुम्ही मोदींना मजबूत केलं. आता तुमचा हा नैतिक धर्म आहे की तुम्ही पत्रकारितेला मजबूत करा. आमच्याकडे जीवनाचा दुसरा पर्यायच नाही, जर दुसरा पर्याय असता तर पत्रकारिताच सोडून दिली असती. याचा अर्थ असा नाही की मी हारलोय. कारण की, मी आता थकलोय. काहीतरी नवीन करू इच्छितोय. मात्र, जोपर्यंत आहे तोपर्यंत अशाच प्रकारे काम करणार. कारण लोकांनी मला नाही हरवलंय. मोदींना विजयी केलंय. पंतप्रधान मोदींना शुभेच्छा.

नोट- या दीर्घ लेखासाठी क्षमस्व.

Updated : 25 May 2019 3:32 PM GMT
Next Story
Share it
Top