नीला सत्यनारायण… माझी पहिली बॉस: रश्मी करंदीकर
X
आज चा दिवस वाईट बातमी घेऊन आला. काही वैयक्तिक कामा साठी आज सेव्हन हिल हॉस्पिटल ला पोहोचले. माझ्या समोर च्या ऍम्ब्युलन्स मध्ये एक बॉडी नेत होते. बाजूच्या सुरक्षा रक्षकाला विचारले तर बोलला ‘कोई IAS ऑफिसर लेडी थी’ म्हणाला. आणि माझ्या पोटात तत्क्षणी कालावकालाव झाली.
त्या नीला सत्यनारायण मॅडम होत्या! सकाळी टीव्ही वर ऐकून पचवू न शकलेली बातमी. नियती ने किमान हॉस्पिटल च्या दारात तरी माझी भेट घडवली. माझ्या पहिल्या "बॉस" शी... Post-graduation संपवून नुकतीच लागलेली डेस्क ऑफिसर म्हणून मंत्रालयात नोकरी. बहुधा आमची दुसरी डायरेक्ट डेस्क ऑफिसर ची batch असावी.
त्यामुळे सर्व 50 शी नंतर च्या ऑफिसर मध्ये पोरसवदया पोरी. अन्न व नागरी पुरवठा विभागात. सुरवाती च्या 2-3 महिन्यातच त्या आमच्या कडे principal सेक्रेटरी म्हणून बदलून आल्या. सर्व स्टाफ ची ओळख परेड झाली. त्यात माझी ही परेड झालीच...
आणि आमचे सूर जुळले ...
पुढची 2 वर्ष मी त्यांची special ऑफिसर होते. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात त्यांच्या सोबत असलेली अगदी करवली प्रमाणे... आयुष्यात नाशिक पासून औरंगाबाद पर्यंत किती तरी दौरे केले. त्यांच्या कविता, गाणी सर्व मनापासून त्यांनी ऐकवले आणि मी ऐकलंय.
तुमच्या आयुष्यात जसे पहिली इयत्ता, पहिले प्रेम, तुमच्या कायम स्मरणात राहते. तसाच तुमचा पहिला बॉस असतो. त्याची जागा तुमच्या आयुष्यात कायम special असते. आणि ती व्यक्ती खूप रिस्पेक्ट आणि प्रेमाची असेल तर ती नेहमीच मानाची राहते.
माझ्या सुदैवाने माझी पहिली बॉस खूप प्रेमळ, संवेदनशील आणि चांगली माणूस होती. सर्व्हिस च्या सुरुवातीला तुमच्या वर जे "footprints" पडतात ते फार महत्वाचे असतात. तुम्ही कळत नकळत शिकता. मी ही त्यांच्याकडून खूप शिकले. त्यांच्याही नकळत...
एक ज्युनिअर डेस्क ऑफिसर आणि एक principle secretary. खरं तर टोकाचा फरक आहे. या दोन पोस्ट मध्ये. पण मला त्यांनी कधी ही तो जाणवू दिला नाही. त्यांच्या घरी जायला लागल्यापासून आणि चैतन्य शी ओळख झाल्यावर तर आमचे नातं अजून घट्ट झाले.
चैतन्य special child! त्याच्यावर मॅडम चा खूप जीव. तो आजारी असताना रात्र रात्र जागून दुसऱ्या दिवशी प्रसन्न चेहेऱ्यांनी कामावर हजर असलेले किती वेळा मी पाहिलंय. दुपारी हळूच चेम्बर मध्ये जाऊन "मॅडम डोकं दुखतंय का? दाबून देऊ? असे विचारलं की. काही नको ग, बस इथे चहा पिऊ या"
मग बोलता बोलता सांगत राहायच्या... चैतन्य बद्दल ची त्यांची काळजी सतत जाणवायची. आज लिहिताना पण मन भरून येतंय. त्यांच्या घरी किती वेळा त्यांच्या हातचे प्रेमाने खाऊ घातलाय. एकदा assembly होती पावसात भिजत भिजत सकाळी पोहचले होते.
आम्हाला बहुतेक विधानसभेत मिनिस्टर कडे जायचे होते. मला भिजलेली पाहून आधी ये घरात बैस, काही खाल्लं नसशील ना? मॅडम असेम्ब्ली आहे, निघू या...
थांब आधी डोसे खा, असे म्हणून त्यांनी स्वतः डोसे करून मला गरम खायला घातले. आज च्या जमान्यात कोणी हे इमॅजिन देखील करू शकणार नाही. की एका junior most डेस्क ऑफिसर ला त्या विभागाची principal सेक्रेटरी स्वतःच्या हाताने डोसे बनवून खाऊ घालते.
पण त्या तशाच होत्या. आई ची माया करणाऱ्या... त्यांचे दालन नेहेमी प्रसन्न असायचे. छान छान पेटिंग्स , मुर्त्या, प्रत्येक पोस्टिंग ला त्यांचे दालनाची सजावट अगदी बघण्यासारखी असायची. तशाच त्यांच्या साड्या आणि ज्वेलरी. अतिशय elegant, रेशमी साड्या. तेव्हा मला फारशी साड्याची आवड नव्हती. पण त्यांनी नेसलेल्या साड्या बघत राहाव्या अशा असायच्या. सुंदर सिल्क च्या त्यावर मोत्याची नाहीतर सोन्याचे गळ्यातलं कधी कधी तर मला त्या अन्नपूर्णेचं रूप वाटायच्या...
त्यांची फुल माळण्याची आवड देखील अशीच... तेव्हा किंवा आताही कोणी IAS महिला मला अशी गजरा माळून दिसली नाही. त्यांना तेव्हा मी त्यांच्या गजऱ्याबद्दल विचारले होते. त्या मला म्हणाल्या की केसात माळलेल्या फुलाचा सुगंध त्यांना दिवसभर ताजेतवाने ठेवतो.
सोनचाफा, मोगरा त्यांना विशेष आवडायचा. त्यांच्या टेबलावर अशा फुलाचा bowl दिसायचा. यथावकाश मी पोलिस खात्यात डीवायएसपी झाले.
मॅडम ला कोण आनंद झाला, त्यांचे वडील पोलीस खात्यात होते. त्या खूप खुश झाल्या. मी मंत्रालय सोडून पोलीस मध्ये जाते म्हणून त्यांना खूप आनंद झाला. त्यांची देखील ACS म्हणून पदोन्नती झाली.
मी MPA असताना नाशिक ला ट्रैनिंग दरम्यान माझा पाय fracture झाला. त्यावेळी चक्क मला भेटण्यासाठी मॅडम ने MPa चा दौरा आखला. मला अजून आठवतंय आमच्या पोलीस fraternity मध्ये काही जणांना. एक IAS ऑफिसर अकादमी ला visit देणार ही बाब काही फारशी रुचली नव्हती. पण त्या आल्या आणि मला माहिती होते त्या माझ्यासाठी आल्यात फक्त ....
त्यानंतर माझ्या ट्रान्सफर होत गेल्या. पोलीस खात्याची ही एक बाजू आहे. तुम्ही एवढे व्यस्त होऊन जाता की, तुम्हाला तुमच्यासाठी वेळ काढणं मुश्किल करत हे खातं. या खात्यात दिवस कसे भराभर निघून जातात. ते कळत नाही आणि मग सर्वाशी भेटी गाठी राहून जातात.
मध्यंतरी जवळपास एका तपाहून जास्त मुंबई बाहेर असल्याने मुंबई ला येणं फार कमी झालेले होतं. तरी फेसबुक आणि phone वर बोलणे होते. फेब्रुवारी मध्ये त्यांचा फोन आला. एका पुस्तकाचे प्रकाशन आहे. तुला नक्की यायचं आणि बोलायचं, आपल्या नात्या विषयी...
माय लेकी च्या नात्यावर ते पुस्तक होतं. मी promise केले. त्यांना मी नक्की येते. त्या दरम्यान अजून दोनदा बोलणं झाले. खूप हळवी झाले होते मी... त्यांच्या कडून काय काय शिकले हे सांगताना... आज ही जेव्हा मला कोणी माझ्या चेंबर मध्ये आल्यावर फ्रेश वाटतं. पोलीस चे चेंबर आहे असे बिल्कुल वाटत नाही. अशी कॉम्प्लिमेंट देतात. तेव्हा मनात कुठेतरी त्यांची आठवण असते.
त्याच्या त्या पुस्तक प्रकाशन मध्ये मी त्यांच्या आठवणी share करणार होते. पण दुर्दैवाने सत्यनारायण सर ची तब्येत बिघडल्याने कार्यक्रम postpone झाला आणि नंतर corvid चे थैमान सुरु झाले. आज अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी समजली. मन खूप सैरभैर झाले. एवढा वर्षाचा प्रवास डोळ्यासमोर आला.
त्या खूप भरभरून जगल्या. कविता, संगीत, कथा, कादंबऱ्या आणि अतिशय समृद्ध प्रशासकीय कारकीर्द. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त...
...आणि त्याहून मोठं चैतन्य, अनुराधा आणि माझ्या सारख्या असंख्य मानस कन्या ची आई... मला खात्री आहे. देवाघरी देखील देव बाप्पा या आई सोबत गप्पा मारत लाड करून घेत असेल.
मॅडम rest in peace
Wil miss u
डॉ. रश्मी करंदीकर
लेखिका महाराष्ट्र सायबर विभागाच्या उपायुक्त आहेत.