Home > मॅक्स ब्लॉग्ज > महाराष्ट्राचा महानायकः निळू फुले

महाराष्ट्राचा महानायकः निळू फुले

महाराष्ट्राचा महानायकः निळू फुले
X

महाराष्ट्रात अनेक मोठे कलावंत होऊन गेले, पण दुर्गमातल्या दुर्गम खेडय़ापर्यंत आणि तिथल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेली जी काही मोजकी नावे असतील, त्यात निळू फुले यांचे नाव अग्रक्रमाने येते. चित्रपटसृष्टीपुरती तुलना करायची तर फक्त दादा कोंडके आणि अशोक सराफ यांची लोकप्रियता निळूभाऊंच्या जवळपास पोहोचते. त्यातही पुन्हा हे दोघे फक्त लोकप्रियतेच्या बाबतीत निळूभाऊंच्या जवळपास जातात. निळूभाऊ लोकप्रियतेच्या पलीकडे जाऊन कलाक्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रातही खूप काही करणारे होते.

व्यावसायिकतेच्या पलीकडे जाऊन मानवी पातळीवर व्यवहार करणारे संवेदनशील कलावंत होते. विचारवंत कलावंत होते. गेल्या पंधरा वर्षात चित्रपट संन्यास घेण्याची इच्छा त्यांनी अनेकदा व्यक्त केली. काही मुलाखतींमधून तशी घोषणाही केली. पण या माणसाचा स्वभाव इतका भिडस्त की, कुणाला नाही म्हणणं त्यांना जमलं नाही.

विश्वसुंदरीनं अनाथ मुलांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त करणं, शाहरूख खानसारख्या नटानं उपेक्षितांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची घोषणा करणं किंवा आणखी कुठल्या नट-नटीनं कुठल्या तरी शाळेत जाऊन सामाजिक जाणीवेचं प्रदर्शन करणं ही फॅशन बनलीय. पण निळूभाऊंना असं करण्याची कधी गरज भासली नाही. कारण सुरुवातीपासूनच चे राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होते.

मेधा पाटकरांच्या आंदोलनापासून क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कष्टक-यांच्या चळवळीपर्यंत त्यांनी स्वत:ला जोडून घेतले होते. निवडणुकीच्या काळात डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी जात होते. सामाजिक कृतज्ञता निधीच्या माध्यमातून डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत कार्यरत होते. अशा ठिकाणी त्यांच्यातला नट कधीच अस्तित्वात नसायचा. विनम्रता आणि भिडस्तपणा एवढा की, आजूबाजूच्या माणसांना संकोच वाटावा.

सार्वजनिक जीवनात काम करताना कार्यकर्त्यांनं कसं वागावं, यासाठी निळू फुले यांचं उदाहरण देता येईल. राम नगरकर यांनी ‘रामनगरी’मध्ये त्या संदर्भातली आठवण लिहिलीय. १९७२च्या दुष्काळातली ही घटना आहे. त्या काळात राम नगरकरही निळूभाऊंच्या घरी राहायला, जेवायला होते. निळूभाऊ त्यांच्याकडून काहीही घेत नव्हते. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सेवादलानं गोळा केलेलं धान्य निळूभाऊंच्या घरी ठेवलं होतं.

एके दिवशी संध्याकाळच्या वेळेस निळूभाऊ आणि राम नगरकर बाहेर जायला निघतात, तेवढय़ात निळूभाऊंची आई त्यांना हाक मारून बोलावते. म्हणते, थोडे पैसे दे. निळूभाऊ म्हणतात, माझ्याकडं पैसे नाहीत. आई म्हणते, घरात धान्याचा कण नाही, काय करायचं? त्यावर ते म्हणतात, काहीही कर. त्या माऊलीला साहजिकच घरातल्या धान्याच्या पोत्यांची आठवण येते. ती सहज म्हणते, यातलं पायलीभर धान्य घेऊ का, दोन दिवसांनी पैसे आल्यावर त्यात ते परत टाकूया. त्यावर निळूभाऊ तिला सांगतात, ‘ते लोकांचं आहे. उपाशी मेलो तरी चालेल, पण त्यातल्या दाण्यालाही हात लावायचा नाही.’

निळूभाऊंच्या ठायी सामाजिक कार्यातील सचोटी, पारदर्शकता किती होती, याचंच दर्शन यावरून घडतं.

निळूभाऊंची विनम्रता अनेकांनी अनुभवलीय, पण त्यांच्यातला आक्रमक कार्यकर्ताही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी उसळून येतो. प्रसंग आहे, कराडला झालेल्या नाटय़संमेलनातला. लोकसभेचे त्या वेळचे सभापती मनोहर जोशी नाटय़संमेलनाचे उद्घाटक होते. उद्घाटकांचं भाषण छापील स्वरूपातलं होतं. ते कुणी लिहिलं होतं कुणास ठाऊक, पण त्यातला अंतर्विरोध लिहिणाऱ्याच्याही लक्षात आला नसावा. जोशी सरांनी मराठी नाटय़सृष्टीचा आढावा घेताना विजय तेंडुलकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’ यांसारखी चांगली नाटकं त्यांनी लिहिल्याचा उल्लेख केला. अगदी आपल्या खास स्टाईलमध्ये पॉझ घेऊन सरांनी ते वाचून दाखवलं. मी त्यावेळी लोकमतमध्ये होतो. जोशीसरांच्या तेंडुलकर गौरवाची मुद्दाम चौकट छापली.

संमेलनात दुस-या दिवशी निळूभाऊंची प्रकट मुलाखत होती. मुलाखतीत बाईंडरसंदर्भातला प्रश्न आला, तेव्हा निळूभाऊंनी जोशीसरांवर थेट हल्ला केला. ‘काल लोकसभेचे सभापती माननीय मनोहर जोशी म्हणाले की, तेंडुलकर हे मोठे नाटककार होते. पण याच जोशींना मी पंचवीस वर्षापूर्वी निदर्शनं करताना आणि नाटय़गृहातल्या खुर्च्यांची, लाइटची मोडतोड करताना पाहिलंय. कलावंतांना स्टेजवर शॉक बसायचे म्हणून कलावंत घाबरायचे. आणि आज हे सांगताहेत तेंडुलकर थोर नाटककार होते म्हणून. तेंडुलकर मोठे होते, हे समजायला यांना पंचवीस वर्षे लागली. म्हणून म्हणतो, अहो जरा वाचत जा. विचार करीत जा. समजत नसेल ते समजून घेत जा...’ निळूभाऊंनी मनोहर जोशींवर थेट हल्ला केला होता. या हल्ल्याबरोबरच त्या वेळी निळूभाऊंनी बाईंडरचा थरार मुलाखतीतून उभा केला होता.

निळूभाऊंनी काही वर्षापूर्वी आणखी एक बॉम्बगोळा टाकला होता, तो समाजवादी परिवारावर. ते त्यांच्या अनेक निकटवर्तीयांनाही रुचले नव्हते. ‘साधनाचे सगळे संपादक ब्राह्मण कसे?’ असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रसेवादलात असताना कुणी आम्हाला फुले-शाहू-आंबेडकरांबद्दल काहीच सांगितलं नाही, असं सांगून त्यांनी समाजवादी चळवळीच्या मर्यादाही उघड केल्या होत्या.

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक प्रवाह आले. नटांच्या पिढय़ा बदलल्या. पण सगळ्या प्रवाहांमध्ये निळूभाऊंची जागा टिकून राहिली. चित्रपट पाहायला येणा-या बायकांच्या शिव्या निळू फुले यांच्याइतक्या कुणाला मिळाल्या नसतील. दिग्दर्शक भास्कर जाधव यांनी सांगितलेला किस्सा असा की, एका मराठी तंत्रज्ञानं निळूभाऊंना घरी जेवायला बोलावलं होतं. त्या वेळी त्या कलावंताच्या आईनं, असल्या नालायक माणसाला मी जेवायला वाढणार नाही, असं म्हणून त्यांना जेवणही नाकारलं होतं. ही त्यांच्यातल्या कलावंताची ताकद होती.

डॉ. श्रीराम लागू आणि निळूभाऊ या दोघांच्याही अभिनयक्षमतेबद्दल काय बोलावं? तुलना करण्याचा प्रश्न नाही, निळूभाऊ आणि डॉ. लागू आपापल्या ठिकाणी मोठेच कलावंत आहेत. तरीही एक निरीक्षण नोंदवल्यावाचून राहावत नाही. जब्बार पटेल यांच्या ‘मुक्ता’मध्ये डॉ. श्रीराम लागू यांनी कणसे-पाटलांची भूमिका साकारली आहे. डॉ. लागूंनी ती चांगली केलीय. पण चित्रपट पाहताना अगदी सुरुवातीपासून एक गोष्ट मला सतत जाणवत होती, ती म्हणजे डॉ. लागूंच्या ठिकाणी निळूभाऊ असते तर त्या भूमिकेला वेगळे परिमाण लाभले असते.

कलाक्षेत्रातली अनेक शिखरं सर करूनही निळूभाऊंनी आपली लोककलेशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. लोककलावंतांच्या समारंभात ते मनस्वी रममाण व्हायचे. तिथल्या आठवणीत हरवून जायचे. लोककलेला आयुष्य वाहिलेल्या आणि भिकेकंगाल बनलेल्या कलावंतांच्या आठवणी सांगताना गहिवरून जायचे.

नाटय़-चित्रपटसृष्टीतल्या अनेक कलावंतांनी आत्मचरित्रे लिहिली. आपल्या लफड्यांची समर्थनं केली. खोटे-नाटे लिहून आत्मसमर्थन केले. त्या पार्श्वभूमीवर निळूभाऊंना अनेकदा आत्मचरित्र लिहिण्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्या वेळी त्यांनी निक्षून सांगितलं की, ‘खरं लिहायचं धाडस आपल्याकडं नाही. म्हणून आपण आत्मचरित्र लिहिण्याच्या फंदात पडणार नाही.’ इतका प्रांजळपणा कलावंतांकडं अपवादानंच आढळतो.

प्रस्थापित बनल्यानंतरही त्यांनी अनेक सुमार भूमिका स्वीकारल्या. त्या निर्माता-दिग्दर्शकांच्या भिडेखातर. नवी माणसं या व्यवसायात उभी राहिली पाहिजेत, अशी त्यांची त्यामागची धारणा असायची. अलीकडच्या काळात त्यांनी जे काही नाटकांचे प्रयोग केले, त्यात नवीन असं काहीच नव्हतं. त्यामागंही पडद्यामागच्या तंत्रज्ञांना रोजगार मिळावा, अशी त्यांची भूमिका असायची. बाजारीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली असताना एवढय़ा व्यापक हेतूनं कलाक्षेत्रात काम करणारी माणसं खूप अपवादानंच भेटतात. म्हणूनच निळूभाऊंचं मोठेपणही ठसल्यावाचून राहात नाही. ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे महानायक ठरतात.

विजय चोरमारे यांच्या फेसबूक वॉलवरुन साभार

Updated : 13 July 2020 6:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top