Home > मॅक्स ब्लॉग्ज > आभासी जगण्यात वास्तवातले गुंते - विजय चोरमारे

आभासी जगण्यात वास्तवातले गुंते - विजय चोरमारे

आभासी जगण्यात वास्तवातले गुंते - विजय चोरमारे
X

'जिंदगी में अगर कुछ सबसे ज्यादा इंपोर्टेंट है तो वो है खुद की जिंदगी'

आज दुपारपासून या डॉयलॉगची चर्चा सुरू आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनं सगळ्यांनाच चटका लावला. इरफान खानचं जाणंही असंच चटका लावणारं होतं. अशी एखादी घटना घडते तेव्हा सोशल मीडियावर भावनेचा पूर येतो. लोक भरभरून व्यक्त व्हायला लागतात. खरंतर सुशांतसिंह हा काही सलमान, आमीर, शाहरूख, अक्षयकुमार, अजय देवगण, रणबीर कपूर, रणवीर सिंग नव्हे. म्हणजे कालपर्यंत तुमचा आवडता हिरो कोणता असा प्रश्न शंभर लोकांना विचारला असता तर कदाचित शंभरातल्या एकाही माणसानं सुशांतसिंह राजपूतचं नाव घेतलं नसतं.

तरीसुद्धा सुशांतसिंह अनेकांना आवडत होता. त्याचं व्यक्तिमत्त्व भुरळ पाडणारं होतं. त्यानं आपल्या वाट्याला आलेली जी काही कामं केली ती त्याला ओळख मिळवून देणारी होती. कुणाला कमी मिळालं किंवा जास्ती मिळालं याचं मोजमाप करता येत नाही. परंतु टीव्हीच्या पडद्यामार्गे मोठ्या पडद्यावर येऊन इथं यश मिळवणा-या भाग्यवानांपैकी सुशांतसिंह राजपूत होता. त्याच्या आधी शाहरूख खाननं ते मिळवून दाखवलं होतं. सुशांतसिंह शाहरूखएवढा मोठा सुपरस्टार बनू शकला नाही तरी बॉलीवूडमध्ये त्यानं आपली ओळख निर्माण केली होती.

हे ही वाचा..

आत्महत्या का?

#Breaking – अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

मुद्दा आहे सुशांतसिंहच्या जाण्यानंतर जो शोकाचा पूर आला त्याचा. कोणत्याही धक्कादायक घटनेनंतरचं व्यक्त होणं असंच असतं. आजच्या काळात जिथं एखाद्या विषयावर कुणाशी बोलायचं असा प्रश्न असतो तेव्हा अनेकांना सोशल मीडियाचा आधार वाटतो. सोशल मीडियाचं जग आभासी असलं तरी तिथं प्रत्येकाला त्याची स्पेस मिळत असते. जे मनात आलं ते पट्कन बोलून टाकल्यासारखं व्यक्त होऊन मोकळं होता येतं. आज सुशांतसिंहच्या निमित्तानं जे व्यक्त झालेत त्यातील अनेकांचं एका मुद्याबाबत एकमत होतं, ते म्हणजे माणसाचं एकटेपण. व्यक्त होण्यासाठी कुणी जवळचं नसणं वगैरे. व्यक्त होणा-या सगळ्यांच्या भावनांचा आदर राखून एक प्रश्न सगळ्यांसाठी विचारावासा वाटतो, तो म्हणजे आपण कुणाला किती स्पेस देतो? सोशल मीडियावरच्या पोस्ट लाइक करणं म्हणजे संपर्कात राहणं नव्हे. पुन्हा हे आभासी जग आभासीच असतं. तिथं मुखवट्याशिवाय वावरणारी आणि आभासी जगाच्या पलीकडं माणूस म्हणून वागणारी-बोलणारी माणसं खूप कमी असतात. इतर कुणासंदर्भात न बोलता स्वतःपासून तपासणी सुरू केली तर काय दिसतं बघा. फार लांब नाही, आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह असलेले नंबर बघा. आपण कधीच फोन केला नाही, असे किती लोक आहेत किंवा आपल्याला ज्यांनी कधी फोन केला नाही असे किती लोक आहेत? परवा एका मित्रानं एका नामवंत साहित्यिकाचा नंबर माझ्याकडं मागितला. माझ्याकडं नसल्यामुळं मी रामदास फुटाणेनानांच्याकडं विचारणा केली. तर ते म्हणाले, गेल्याच आठवड्यात मी त्याचा नंबर डिलीट केला.

why sushant singh committed suicide, analysis by director mahesh tilekar

आपण वेगवेगळ्या निमित्तांनी काहीवेळा फोन केला असतानाही ज्यांनी तीन वर्षांत एकदाही फोन केला नाही असे नंबर डिलीट करून टाकल्याचे त्यांनी सांगितले. रामदास फुटाणे हे सातत्यानं लोकांशी बोलणारे, संपर्कातल्या लोकांना फोन करणा-या व्यक्तिंपैकी आहेत. तसे आणखीही बरेच लोक आहेत, मुद्दाम फोन करणारे, बोलणारे. पण अनेकजण असे असतात की कारणाशिवाय कधी कुणाला फोन करत नाहीत. त्यांची प्रत्येक कृती हेतूपूर्ण आणि राजकीय असते. आपण कारणाशिवाय कधी कुणाला फोन केला होता का, याची सहज स्वतःपुरती उलटतपासणी घेतली तरी स्वतःची नव्यानं ओळख होऊ शकेल.

आणखी एक स्वतःची उलटतपासणी घेता येऊ शकेल. जवळपास तीन महिने अनेकजण घरातून काम करताहेत. किंवा कामधंदे बंद असल्यामळे घरात बसून आहेत. आपल्या कार्यालयातील सहका-यांशी किंवा नेहमीच्या संपर्कातील लोकांशी आपण कारणाशिवाय कधी बोललो का? अनेकांच्या नोक-या गेल्यात त्यांच्याशी कधी बोलण्याचा प्रयत्न केला का? प्रत्येकवेळी मदत करण्याची आवश्यकता नसते, किंबहुना कुणाला मदतीची अपेक्षाही नसते, परंतु मी आहे... एवढा दिलासा समोरच्याला देण्याची आवश्यकता असते. तसा प्रयत्न आपण कधी केला का?

हे ही वाचा..

आत्महत्या का?

#Breaking – अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. बराच काळ एका नातेवाईकांच्याकडं गेलो नव्हतो. मुद्दाम वेळ काढून त्यांच्याकडं गेलो. त्यांना आनंद झाला. पण मी कोणत्याही कारणाशिवाय आलोय हे त्यांना काही पटेना. बराच वेळ थांबून निघाल्यानंतरही सोडायला आल्यावर ते पुन्हा पुन्हा विचारत होते, काही काम नव्हतं ना? दुस-या दिवशी त्यांनी फोन करून विचारलं, की खरंच काही काम नव्हतं ना ? कदाचित त्यांना वाटलं असेल की पैसे उसने मागायला वगैरे आलो असणार आणि ऐनवेळी बेत बदलला असणार. मुद्दा असा आहे की, सख्खे नातेवाईकसुद्धा एकमेकांकडं कारणाशिवाय जात नाहीत. लॉकडाऊनचा काळ सोडून द्या. त्याआधीची परिस्थिती वेगळी नव्हती. आणि लॉक डाऊन उठल्यानंतरही परिस्थिती फारशी वेगळी असेल असं नाही. सोशल मीडियाच्या आभासी जगात जगायला हरकत नाही, परंतु वास्तव जगातल्या माणसांपासून तुटत जाणं धोकादायक ठरू शकतं. आभासी जगण्यातून वास्तवातल्या गुंत्यांची उत्तरं मिळत नाहीत.

वीसेक वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या एका नामवंत कवीचा मृत्यू झाला. ती आत्महत्या असावी. त्याचं मित्रवर्तुळ खूप मोठं होतं. शहरातली नाटक, कवितेच्या क्षेत्रातली उच्च मध्यमवर्गीय म्हणता येईल अशी मंडळी त्यात होती. त्या कवीच्या शोकसभेत सगळ्यांचा एकच सूर होता तो म्हणजे, आपण त्याला समजून घेऊ शकलो नाही. खरंतर तो जिवंत होता तेव्हा यातले बहुतेकजण तो कसा वाया गेला आहे, तो कसा विक्षिप्तासारखा वागतोय याचे किस्से एकमेकांना सांगत होते. आणि मेल्यावर आपण त्याला समजून घेण्यात कमी पडल्याचा पश्चात्ताप! याला पश्चात्तापाची कबुली नव्हे तर दांभिकपणा म्हणतात. आजकाल हा दांभिकपणा समाजाचा स्थायीभाव बनलाय.

Sushant singh rajput social media

आजकाल मुखवटे घालून वावरण्याचं प्रमाण वाढलंय. ते खूप धोकादायक आहे. हे मुखवटेच माणसाचा घात करतात. माणूस म्हणून नीट जगायचं असेल तर मुखवटे फेकून देऊन जगाला फाट्यावर मारून जगायला शिकलं पाहिजे. कुणीतरी जवळचं असायला पाहिजे वगैरे ठीक. ते असायलाच पाहिजे. परंतु आपलं कुणीतरी जवळचं असायला पाहिजे असं म्हणताना आपल्याला कुणी जवळचं मानतं का, ते मानावं असा आपला वर्तनव्यवहार असतो का याचाही विचार करायला पाहिजे. बाकी नटनट्यांना, झगमगाटी क्षेत्रातल्या लोकांना नैराश्यानं, अस्थिरतेनं, भविष्याच्या चिंतेनं ग्रासलंय आणि दरमहा महिनाअखेर साजरी करणारी,पगारकपात झाल्यानंतर हप्ते भरताना ओढाताण होणारी कनिष्ठ मध्यमवर्गीय नोकरदार मंडळी आनंदात जगताहेत अशातला भाग नाही. दुःख छोटं किंवा मोठं नसतं. ज्याचं दुःख असतं त्यालाच ते छोटं की मोठं कळत असतं. प्रत्येक माणसाची ते सहन करण्याची क्षमता वेगळी असते. करोडो रुपयांना चुना लावून नीरव मोदीपासून विजय मल्ल्यापर्यंतचे लोक विदेशात जाऊन ऐशोरामी जगतात. आणि बँकेचा हजारपाचशेचा हप्ता थकलेला शेतकरी एंड्रीन पिऊन आत्महत्या करतो. संवेदनशीलतेत असासुद्धा फरक असतो. दुःख, विवंचना सगळ्यांनाच असतात. पण माणूस आतून तुटत जाणं डेंजर असतं. परस्परांना समजून घ्यायला पाहिजे. संवाद वाढवायला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची सुरुवात स्वतःपासून करायला पाहिजे. स्वतःचं जगणं महत्त्वाचं असतंच, परंतु ते जर इतरांसाठी महत्त्वाचं बनलं तर त्याला अर्थ प्राप्त होईल!

- विजय चोरमारे

Updated : 15 Jun 2020 2:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top