Home > मॅक्स ब्लॉग्ज > मी धारकरी कसा झालो?

मी धारकरी कसा झालो?

भीमा कोरेगाव दंगलीनंतर संभाजी उर्फ मनोहर भिडे हे नाव चांगलेच चर्चेत आलेले होते. संभाजी भिडेंच्या संघटनेचे काम कसे चालते, युवकांमध्ये भिडे धर्म द्वेष कसा पेरतात, त्यांच्या संघटनेला मोठे करण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनीदेखील कसा हातभार लावला, याविषयी पूर्वाश्रमीचे धारकरी असलेल्या वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांनी संभाजी भिडे यांच्या कामाचा केलेला पर्दापाश....

मी धारकरी कसा झालो?
X

वय वर्ष चौदा. मनावरती शिवरायांच्या विचारांचा मोठा पगडा. गड किल्ले आणि शिवरायांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणांची प्रचंड आवड. स्वातंत्र्य लढा वाचतानाच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यातून देशभक्तीचा विचार मनात ठासून भरलेला. याच काळात शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे यांचे विचार वर्तमानपत्रातून वाचायला मिळायचे. शिवरायांच्या विचाराची भाषणे या भागात ऐकायला मिळायची. यातूनच गडकोट मोहिमेच्या माध्यमातून आणि संभाजी भिडे यांची भाषणे ऐकून शिवप्रतिष्ठान या संघटनेकडे खेचलो गेलो. या काळात अनेक गडकोट मोहिमा केल्या. शिवराय आपले वाटायचे हा माणूस शिवरायांविषयी बोलत आहे. देशभक्ती सांगत आहे. राष्ट्रप्रेम देशप्रेम याविषयी बोलत आहे. या प्रभावातून त्यांच्या संघटनेचा सक्रीय धारकरी बनलो.

पूर्वी संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठान या संघटनेचे सक्रीय धारकरी आणि सध्या महाराष्ट्रातील वज्रधारी या आघाडीच्या साप्ताहिक तसेच वृत्तवाहिनीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांची हि प्रतिक्रिया आहे. त्यांना आलेले अनुभव max maharashtra वर व्यक्त केले आहेत.





शिवप्रतिष्ठान संघटनेशी कसे जोडले गेलो?

ज्या काळात ते या संघटनेशी जोडले गेलो त्यावेळी पुरोगामी विचार सांगायला महात्मा फुले सांगायला बाबासाहेब आंबेडकर सांगायला कुणीही भेटले नाही. पण या काळात भिडे गावागावात बैठका घ्यायचे. त्यातून देशभक्ती, देव धर्म यासह मुख्य म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचे. सुरवात शिवरायांच्यापासून करायचे पण यामागुन हळू हळू वैदिक धर्माचा विषय रेटला जायचा. दर महिन्याच्या ठरलेल्या वेगवेगळ्या रवीवारी दिवशी त्यांच्या प्रत्येक तालुक्यात बैठका व्हायच्या. दुर्गमोहीम दुर्गा उत्सवाच्या काळात दुर्गादौड आणि संभाजी महाराजांचा मृत्यू ज्या महिन्यात झाला. तो महिना बलिदान मास म्हणून पाळला जायचा. हे शिवप्रतीष्ठानचे मुख्य तीन कार्यक्रम असायचे. ते राबविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची असायची.

तरुणांना चिकित्सा करण्याचे मार्ग बंद करण्यात येतात

शिवप्रतिष्ठान हे संघटन हे केवळ तरुणांचे संघटन आहे. यामध्ये एखाद्या कार्यक्रमात केवळ ओवाळण्याशीच मुलींचा सहभाग असायचा. या व्यतिरिक्त मुलींना या संघटनेत नाहीत. प्रभावात आलेल्या मुलांना बैठकीतून आपला धर्म वाचला पाहिजे, आपला देश वाचला पाहिजे, तो वाचवायचा असेल तर मोहिमेला गेल पाहिजे. देश वाचवायचा असेल तर बलिदान मास पाळला पाहिजे. दुर्गा दौडीला गेले पाहिजे.या कार्यक्रमात जी पुस्तके दिली जायची ती बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर यांचीच असायची. या सर्व कार्यक्रमातून कळत नकळत आमच्यामध्ये मुस्लीम द्वेष पेरला जायचा. मुस्लीम या संघटनेच्या आसपासदेखील फिरकायचा नाही. कट्टर मुस्लीम द्वेष करणारी संघटना असल्याने मुस्लीम या संघटनेत येण्याचा प्रश्नच येत नव्हता.

ज्या वयात तरुण या संघटनेत यायचे या काळात त्यांचे वाचन नसायचं. अभ्यास नसायचा. यामुळे हे जी भाषणे देतील हे जे पुस्तके देतील तेवढच ऐकल आणि वाचल जायचं. तोच इतिहास हा इतिहास आहे . महाराजांचा इतिहास म्हणजे केवळ अफजल खानाचा कोथळा काढला, शाहिस्तेखानाची बोटे तोडली. असा मर्यादित इतिहास या युवकांना सांगितला जायचा. या गोष्टींची चिकित्सा करण्याची सोयच नव्हती. कारण या बैठकांमध्ये प्रश्न न विचारण्याचा अलिखित नियम होता. प्रश्न विचारणाऱ्या युवकाचा भिडे गुरुजी असा अपमान करायचे की त्यापुढे प्रश्न विचारायचे धाडसच कोण करायचे नाही.





मुस्लीम द्वेषाचा ब्रान्ड म्हणून शिवाजी महाराजांना पुढे आणले

भिडे म्हणायचे कि त्यांना शिवराय आणि संभाजी महाराजांच्या रक्तगटाची पिढी निर्माण करायची आहे. पण लोकांच्या प्रश्नावर त्यांनी कधीही काम केलेले नाही. शेतीचा प्रश्न हाती घेतलेला नाही. वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला नाही. रक्तदान घेतलेले नाही. गुरुजी कधीही म्हणाले नाहीत वाचनालये काढूया. इतक्या मोठ्या संख्येने मागे असलेल्या तरुणांच्या रोजगारावर गुरुजी बोलत नव्हते. त्या बहुसंख्य तरुणांची कुटुंबे शेतकरी आहेत. गुरुजी या विषयांवर कधीही बोलत नव्हते. मुलांनी प्रशासकीय सेवेत जाऊन शिवरायांचे विचार अमलात आणले पाहिजेत हे मुलाना शिकविले जात नव्हते. या उलट केवळ मुस्लीम द्वेष आणि धार्मिक भावना भडकल्या जातील एवढच काम केलं जाते. केवळ धार्मिक द्वेषाचा दारुगोळा या संघटनेत दिला जातो. या संघटनेने मुस्लीम द्वेषाचा ब्रान्ड म्हणून शिवाजी महाराजांना पुढे आणले. धर्मांतर्गत जातीयवाद त्यांनी मांडला नाही.

जसजसे महात्मा फुले वाचत गेलो तसतसा भिडेंचा कावा समजत गेला.

भिडे गुरुजींचा पायात चप्पल न घालण्याचा त्याग, त्यांची धडपड, हा माणूस संसाराचा त्याग करू धडपडत फिरत आहे. हे एका बाजूला मनाला अपील करत होत. दुसऱ्या बाजूला ते महात्मा फुलेंचा द्वेष करायचे महात्मा फुलेना माकड म्हणायचे. गांधीजींचा द्वेष करायचे. या काळात मी महात्मा फुलेंची पुस्तके वाचत होतो. मग मनात प्रश्न येत होते महात्मा फुलेंचे विचार इतके चांगले आहेत. मग हा माणूस फुलेंचा इतका तिरस्कार का करतो. मी जसजसा महात्मा फुलेना वाचत गेलो तसतसे मला भिडे समजत गेले. त्यांचा कावा समजायला लागला आणि त्यांच्यापासून लांब जाण्याची माझी प्रोसेस सुरु झाली. लोकांच्या मुलभूत प्रश्नावर भिडे कधीही भाष्य करत नाहीत. मी दहा वर्ष त्यांच्यासोबत काम केले पण तुझ्या घरात चूल पेटते का? हे कधीही कुणाला विचारले नाही. केवळ आणि केवळ मुस्लीम द्वेष पेरण्याचे काम त्यांनी केले. त्या काळात दुष्काळाची स्थिती होती. पाण्याचा प्रश्न होता यावर ते कधीही बोलले नाहीत. यासाठी त्यांनी काम केले नाही. ते कधी भ्रष्टाचारावर बोलले नाहीत. सामाजिक प्रश्नावर बोलले नाहीत.

संघ कॉंग्रेस बरोबरच भिडेना कॉंग्रेस राष्ट्रवादिची साथ

भिडे गुरुजी जिथे जिथे बैठका घ्यायचे ती सगळी ठिकाणी संघाची होती. त्या भागातील स्थानिक संघाचे कार्यकर्ते त्यांची सोय करायचे. या पक्षांची संघटनांची त्यांना मदत होतीच. पण यानंतर त्यांना राजकीय ताकद दिवंगत आर. आर. पाटील यांची होती. दिवंगत पतंगराव कदम यांची होती. कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील तर त्यांच्या मोहिमेला जायचे. पतंगराव कदम यांनी त्यांच्या भारती विद्यापीठाच्या माध्यमातून सभेला जागा उपलब्ध करून दिली आर्थिक ताकद दिली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या मागे असलेली तरुणांची झुंड दिसायची. गुरुजीना जवळ केलं तर त्यांच्या मागे असलेली ही डोकी आपलीशी होतील. हा त्यांचा भ्रम होता. इतकच नाही तर भिडे गुरुजींच्या एका कार्यक्रमाला शरद पवार हे देखील उपस्थित होते. पतंगराव कदम आणि शरद पवार हे त्यांच्या एका कार्यक्रमात एका व्यासपीठावर होते. या सभेत संभाजी भिडे यांनी पतंगराव कदम धनाजी तर शरद पवार संताजी असे उद्गार काढले होते. या सर्व नेत्यांनी पक्षांनी दिलेल्या ताकदीच्या जोरावर शिवप्रतिष्ठान आणि भिडे हे महाराष्ट्रभर पसरले आहेत.





भिडे गुरुजी गांधीजीवर टीका करायचे परंतु याच्यावर बोलण्याचे धारिष्ट्य कॉंग्रेसच्या नेत्यांनी दाखवले नाही. याला अपवाद म्हणून २०१४ च्या लाटेत कॉंग्रेसच्या प्रतिक पाटील यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी एका वाक्यात त्यांच्यावर टीका केली. राज्यातील पुरोगामी राजकारणाचे क्रेडीट शरद पवार घेतात पण त्यांचे राजकारण हे सोयीचे आहे. ते भिडेंच्या व्यासपीठावर येतात. केंद्रात भाजपाधार्जीनी भूमिका घेतात. अनेकदा संघाच्या लोकांशी तडजोडी करतात. मुख्यमंत्री झाले त्यावेळी जनसंघाचा पाठींबा त्यांनी घेतला. वाजपेयींच्या काळात कॅबिनेट दर्जाचे पद घेतले. आतासुद्धा त्यांनी फडणवीस सरकारला न मागता पाठींबा दिला. मात्र त्यांनी एकदा छगन भुजबळ यांना पुणेरी पगडी काढून फुलेंची पगडी घातली. माझ्या मते पवार साहेबांनी फुलेंच्या पगड्या घालण्यापेक्षा फुलेंचा विचार पेरावा.

भारती विद्यापीठाच्या प्रांगणातील कार्यक्रम मोहिमेतच खरा धर्म उमगला

वडू बुद्रुक ते रायगड मोहीम होती. आम्ही रस्ता चुकलो. त्या जंगलात भटकलो. संध्याकाळ झाली तरी आम्हाला रस्ता सापडला नाही. रात्री नऊच्या सुमारास आम्हाला एक आदिवासी पाडा दिसला. आम्ही तेथे मुक्काम करायचं ठरवलं. दिवसभर फिरून तहान लागली होती म्हणून त्या घरातील व्यक्तीला आम्ही पाणी मागितलं.तेथे पाण्याची टंचाई त्याच्या घरात दोन तीन माणसे त्यांच्यासाठी छोट्या भांड्यात ठेवलेले पाणी होते. आमचा पंचवीस मुलांचा समूह होता. दगडू कचरे नावाच्या त्या माणसाने अंधारात दरीत उतरून आमच्यासाठी पाणी आणले. त्यासाठी त्याला पुन्हा हेलपाटे मारावे लागले. यावर त्यांना मी म्हणालो "दादा! आता बास झाल तुम्हाला त्रास होतोय". यावर त्या माणसाने उत्तर दिले, तुम्ही पुन्हा कशाला माझ्या घरी येताय तेवढाच माझा धर्म". त्याचे ते वाक्य माझ्या कानातून हृदयात पोहचल. मी ज्या धर्माच्या घोषणा देतोय, ज्या धर्माचा झेंडा घेऊन दुसऱ्या धर्माला शिव्या देतोय. नेमका तो धर्म कुठला आणि हा अडाणी आदिवासी जो म्हणतोय माझा धर्म तो धर्म कुठला? या विचाराने मला झोप लागली नाही. मला त्यावेळी. पोळी पळवून घेऊन गेलेल्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन पळणारे एकनाथ महाराज आठवले. या रात्री माझ्या डोक्यातला धर्माचा माज उतरला.

दंगलींची पार्श्वभूमी

धार्मिक भावना भडकाविण्याचे या संघटनांचे काम सातत्याने सुरु आहे. १९८० पासून सांगली जिल्ह्यात त्यांनी काम सुरु केले. याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया २००९ च्या मिरज दंगलीत दिसली. कोरेगाव भीमा परिसरातदेखील घडलेल्या दंगलीमागे हि पार्श्वभूमी आहे. या संघटनांचे काम मिशन म्हणून सुरु आहे. पण पुरोगामी संघटना शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचे विचार घेऊन तरुणांच्या दारापर्यंत पोहचत नाहीत. भिडेंचा विचार विषारी आहे. विघातक आहे. पण तो तरुणांच्या डोक्यात पेरण्यासाठी वयाच्या ऐंशीव्या वर्षी ते पायाला भिंगरी लाऊन फिरत आहेत. त्या गतीने त्या नियोजनाने पुरोगामी विचार पोहचवणारी मंडळी घराघरापर्यंत पोहचताना दिसतं नाहीत. यामध्ये काही अपवाद आहेत. पण पुरोगामी संघटनांतील कार्यकर्त्यांची निष्क्रियता संभाजी भिडे यांच्यासारख्या लोकाना अनुकूल ठरत आहे. माझ्या वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत भिडे माझ्या पर्यंत पोहचले. पण माझ्यापर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा विचार सांगणारी मंडळी माझ्यापर्यंत पोहचली नाहीत. मला ते स्वत: वाचावे लागले. पण जे चिकित्सा करत नाहीत. वाचत नाहीत ते अशा जाळ्यात अलगद अडकत जातात.

होय मी पण गांधीना शिव्या घातल्या

मी ज्यावेळी भिडेंच्या विचाराचा सोगा धरून चालायचो त्या काळात मी सुद्धा त्या कालीचरण महाराजासारख्याच शिव्या घातल्या. स्टेजवर कालीचरण महाराज गांधीजीबद्दल अनुद्गार काढतो. पोंक्षे आपले विचार व्यक्त करतो याचे लोकांना आश्चर्य वाटते पण भिडेंच्या संघटनेत काम करणारी अशी हजारो लोक आहेत ते गांधीजींना शिव्या घालतात. ज्यावेळी गांधी वाचले त्यावेळी मला ते कळले. त्या आधी गांधीजींना टकल्या म्हणून मी सुद्धा त्यांची अवहेलना केलेली आहे. आज मला याचा पश्चाताप होतो.





हिंदू धर्माच्या नावाखाली वैदिक धर्माचा अजेंडा रेटला जातो.

हिंदू धर्माची परंपरा सर्व समावेशक आहे. इथे अनेक धर्म आहेत. या सगळ्यांना आपलेसे मानणारी विचारधारा हि भारताची आहे. ज्ञानेश्वरांची विश्वात्मक देवाची संकल्पना मांडली. भिडे जो धर्म सांगतात तिथे विश्व कुठे आहे ? त्यांच्या विचारांशी हिंदू धर्माचा काही संबंध नाही. हिंदू धर्माच्या आडून ते वैदिक धर्माचा अजेंडा रेटत आहेत. आज शेतकरी मरत आहेत ते हिंदू नाहीत का ? या देशातील करोडो युवक बेरोजगार आहे तो हिंदू नाही का ? अनेक दलितांवर अत्याचार होत आहेत, लोकाना प्यायला पाणी नाही. हि सगळी लोकं हिंदू नाहीत का ? या लोकांसाठी काम करायला भिडेनी युवकांना प्रेरीत का केलेले नाही?

तरुणांनो वेळीच सावध व्हा

तरुणांच्या आयुष्यातला उमेदीचा काळात या संघटनेत तरुण येतात. वयाच्या तिशीनंतर ते संघटनेपासून दुरावतात. आयुष्य उभारण्याचा जो काळ आहे, कर्तुत्वाचा जो काळ आहे या काळात त्यांचा वेळ वाया घालवला जातो. विशिष्ठ अजेंड्यासाठी त्यांना वापरले जाते. भरकटवले जाते. यानंतर डिप्रेशन येण्याची वेळ येते. मुलांचे करियर बरबाद होते. त्यामुळे करियर बरबाद होण्याच्या अगोदरच तरुणांनी वेळीच सावध होऊन चिकित्सा करणे गरजेचे आहे.

Updated : 25 Jan 2022 4:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top