हिंदू-मुस्लीम : अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करेल – संजीव चांदोरकर
X
“हिंदूंनी मुसलमानांच्या दुकानातून / कारागिराकडून वस्तुमाल-सेवा विकत घेऊ नये, मुसलमानांनी हिंदूंच्या दुकानातून / कारागिराकडून माल-सेवा घेऊ नये; एकमेकांच्या धार्मिक पर्यटनस्थळांवर जाऊ नये”
अशी आवाहन आपल्या देशाला परवडणारी नाहीत. देशात “आम्ही विरुद्ध तुम्ही”, “आमचे विरुद्ध तुमचे” अशा मांडण्यानी विवेकी सीमारेषा केव्हाच ओलांडली आहे. त्याची परिणीती आता अशा प्रकारच्या आवाहनात होऊ लागली आहे; अनेक सोशल मीडिया ग्रुप्सवर तशी आवाहने फिरू लागली आहेत. हे सामाजिक दृष्ट्या वाईट आहेच पण अर्थव्यस्वस्थेवर दूरगामी व गंभीर परिणाम करणारे ठरेल. हे तर्कट कोठे जाऊन भिडेल ?
पक्का माल बनवणाऱ्यानी कच्चा माल परधर्मियांकडून घेऊ नये ? परधर्मीय कामगाराला कामावर ठेवू नये ? परधर्मीय कडून वाहतूक सेवा घेऊ नये ? ज्या व्यक्तींना आधुनिक औद्योगिक भांडवली अर्थव्यवस्था नक्की कशी चालते हे माहित नाही; जगाचा गेल्या काही शतकांचा आर्थिक विकास कसा झाला ते माहित नाही. अशा लोकांकडून हे भावनिक उचकवणे होत आहे हे उघड आहे; यात कोणत्या विशिष्ट धर्मातील व्यक्तींना दोष देण्याचा भाग नाहीये.
पण देशातील भांडवलदार, बँकर्स, भांडवली बाजारातील गुंतवणूकदार, अर्थतज्ञ यांना नक्कीच कळते की अर्थव्यवस्था ही एकमेकात गुंफलेल्या लाखो छोट्या मोठ्या चाकांमुळे फिरत असते. आणि अशा बिगर आर्थिक निकषांमुळे एक चाक नाही सारा गिअर बॉक्स मंदावू शकतो.
त्यांच्या राजकीय भूमिका काहीही असल्या तरी त्यांनी देशाच्या अर्थव्यस्वस्थेला मंदावू शकणाऱ्या या मांडणीविरुद्ध भूमिका घेण्याची गरज आहे. गंभीर पेचप्रसंगातून जाणाऱ्या आपल्या देशाच्या अर्थव्यस्वस्थेला हे परवडणारे नाहीय.