Home > मॅक्स ब्लॉग्ज > डिसले गुरुजींचा 'मॅटर' नेमका आहे काय?

डिसले गुरुजींचा 'मॅटर' नेमका आहे काय?

सतत प्रसिद्धी आणि वादाच्या भोवऱ्यात असलेले रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आले. ग्लोबल टीचर डिसले गुरुजींच्या प्रेमात बहुतांश मीडिया आणि लोक वेडे झाले असताना दीड वर्ष आधी विनय काटे यांनी लिहिलेला एक लेख

डिसले गुरुजींचा मॅटर नेमका आहे काय?
X

गेल्या काही दिवसात महाराष्ट्र आणि देशातील मीडियात रणजितसिंह डिसले गुरुजींचं नाव गाजत आहे. कारण त्यांना मिळालेला "ग्लोबल टीचर अवार्ड 2020". अगदी अलीकडेच म्हणजे 2015 साली वरक्के (Varkey) फाउंडेशन या ब्रिटनमध्ये ऑफिस असणाऱ्या संस्थेने हे अवार्ड सुरू केले आणि त्याची रक्कम 1 मिलियन डॉलर इतकी ठेवली. भारतीय चलनात ही रक्कम 7 कोटींपेक्षाही जास्त असल्याने या रक्कमेकडे पाहूनच भारतीय लोकांचे डोळे विस्फारले. मग डिसले गुरुजींना महाराष्ट्रभूषण द्या, राज्यपालनियुक्त आमदार बनवा वगैरे मागण्या राजकीय क्षेत्रातून आल्या. जणू काही तसे केल्याने राज्याचे, देशाचे शैक्षणिक धोरण आणि शिक्षणाचा दर्जा आमूलाग्र बदलणार आहे. Varkey Foundation हे सनी वरक्के या दुबईत स्थायिक असणाऱ्या अनिवासी भारतीय उद्योजकाने सुरू केलेले आहे. जे स्वतः शिक्षणाच्या व्यवसायात आहेत आणि अब्जाधीश आहेत. त्यांच्या GEMS Education या संस्थेच्या दुबई, ब्रिटन, भारत, आफ्रिका अशा अनेक ठिकाणी 70 च्या आसपास उच्चभ्रू शाळा आहेत आणि साहजिकच कुठलाही उद्योगपती जेव्हा अशी पारितोषिके देतो तेव्हा तो त्याच्या व्यवसायास अनुरूप अशा गोष्टींना आणि बाजारपेठांनाच जवळ करतो. त्यामुळे फक्त पारितोषिकाच्या रक्कमेकडे न पाहता, ते पारितोषिक देणारी संस्था नेमकी काय उद्देशाने हे देत आहे आणि मुळात त्या संस्थेची विश्वासार्हता आणि निष्पक्षता किती हा विचार करणे महत्वाचे ठरते.

डिसले गुरुजींच्या काही मुलाखती पाहिल्यावर हे कळलं की ते ज्या शाळेत रुजू झाले तिथे मुले शाळेतच येत नव्हती. कारण शाळेत अगदी साध्या सोयीही नव्हत्या. मग गुरुजींनी मुलांना रोज बोलावून शाळेत आणायला सुरूवात केली. शाळेतल्या मुलांना घरचा अभ्यास करण्यासाठी संध्याकाळी 7 वाजता मोठ्याने अलार्म लावण्याची सोय करण्यात आली. घरी अभ्यास काय करून घ्यायचा यासाठी पालकांना SMS पाठवले गेले. मुलांना वर्गात लॅपटॉपवर सिनेमे दाखवण्यापासून आवड निर्माण करून मग हळूहळू त्यावरच अभ्यास सुरू केला गेला. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मुलांना virtual trip करून आणल्या गेल्या. डिसले गुरुजींनी गेल्या 3-4 वर्षात पाठ्यपुस्तकात QR कोड छापले, ज्यांना मोबाईलने स्कॅन करून मुले त्या अभ्यासाशी संबंधित व्हिडीओ मोबाईलवर पाहायला लागली.

डिसले गुरुजींच्या या गेल्या 5-7 वर्षातील कार्याला मीडियात आलेल्या मुलाखतीतून पाहताना लोक भारावून जातायत, पण थोडा विचार केला तर ह्यातले बहुतांश उपक्रम ह्या उच्चभ्रू आणि शहरी शाळांत फार आधीपासून अस्तित्वात आहेत. QR कोडला स्कॅन करून जो काही व्हिडीओ-ऑडिओ मुलांना मोबाईलवर दाखवला जातो त्यासाठी content development, app development आदी खर्चिक आणि तांत्रिक गोष्टी कराव्या लागतील, ज्या प्रत्येक शिक्षकाला वैयक्तिक पातळीवर करणे शक्य नाही. यासाठी डिसले गुरुजींना नक्कीच काही संस्था आणि व्यक्तींनी मदत केली असणार. हे कंटेंट पाहायला डिसले गुरुजींच्या शाळेत दिसते तसे internet connectivity आणि मोबाईल/टॅबलेट वगैरेही असलेच पाहिजे, जेही या देशातल्या किंवा जगातल्या बहुतांश सामान्य घरातल्या मुलांकडे उपलब्ध नाहीयेत. डिसले गुरुजींचं लोकांनी कौतुक करण्यात मला काहीही आक्षेप नाही, पण ते जे काम करत आहेत त्यात नावीन्य खूप कमी आहे आणि सोबतच भारतासारख्या टोकाच्या आर्थिक विषमतेने भरलेल्या देशात त्यांची पद्धती available, sustainable आणि scalable व्हायला जो खर्च लागेल तो करणार कोण हा मोठा प्रश्न आहे.

डिसले गुरुजींनी ज्या Information & Communication Technology (ICT) चा पुरस्कार करत शिक्षण Hi-Fi करायचे जे स्वप्न पाहिले आहे, त्यासाठी लागणाऱ्या इंटरनेट उप्लब्धतेत भारत खूप मागे आहे. भारतात इंटरनेटचा प्रसार 40% लोकांपर्यंत झाला आहे, जिथे अमेरिकेत हाच आकडा ८८% आणि चीनमध्ये ६१% आहे. भारतात स्मार्टफोन वापरणारे लोक फक्त 50 कोटीच्या आसपास आहेत, त्यातही 77% लोक मोबाईल इंटरनेट वापरतात ज्यावर डेटा वापरण्याची विशिष्ट मर्यादा आहे. कोरोनाच्या साथीत शाळा बंद पडल्या तेव्हा महागड्या खाजगी शाळांनी online शिकवणे सुरू केले. त्याचे अनुकरण नंतर सरकारी शाळांनाही करायची वेळ आली तेव्हा काही मुलांनी घरात स्मार्टफोन नाही म्हणून आत्महत्यासुद्धा केल्या. यावर उपाय म्हणून चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात नव्या दमाच्या शिक्षक, तंत्रज्ञ लोकांना हाताशी घेऊन प्रशासकीय यंत्रणेने गावातील भिंतीवर अभ्यासाचे धडे रंगवले की जेणेकरून सगळ्या मुलांना अभ्यास करता येईल आणि मुले एकमेकांसोबत त्यावर चर्चा करून शिकतील. दुर्दैवाने या तळमळीला मात्र कुठेही पुरस्कार मिळणार नाही!

काही अभ्यासानुसार भारतात 5 वर्षे ते 24 वर्षे या वयोगटात जवळपास 50 कोटी विद्यार्थी आहेत आणि शिक्षणक्षेत्राची उलाढाल वार्षिक जवळपास 7 लाख कोटी रुपये आहे. टाटा ट्रस्टच्या एका रिपोर्टनुसार भारतात सगळ्या शाळांत ICT द्वारे शिक्षण देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च हा साधारण 70,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे. BYJU सारखे app द्वारे शिकवणारे ICT प्लॅटफॉर्म शाहरूख खानला ब्रँड अंबसेडर म्हणून घेतात. White Hat Jr ला जवळपास 2,000 कोटींना विकत घेतात आणि त्याच्या जाहिरातीसाठी ह्रितीक रोशनला घेतात यावरून कुणालाही सहज अंदाज येऊ शकते ही हे नवीन मार्केट किती मोठे आहे. थोडक्यात 70,000 कोटी रुपयांच्या ICT च्या मार्केटसाठी 7 कोटी रुपयांचा पुरस्कार देऊन, भारत सरकारवर सकारात्मक दबाव आणणे यात नक्कीच एक बिझनेस सेन्स आहे. आपल्या देशात जवळपास 10% मुले शाळेची पायरीच चढत नाहीत आणि अजून 11% मुले-मुली गरिबी, खर्चिक शिक्षण, कामासाठी स्थलांतर, अवेळी लग्न, शाळेत शौचालय नसणे आदी गोष्टींमुळे शिकायची इच्छा असूनही शाळा सोडून देतात. पण हा प्रश्न सोडवण्यासाठी कुठलीही कंपनी पुढाकार घेताना दिसत नाही, कारण हे प्रश्न ज्या मुलांचे आहेत त्या मुलांचे आईबाप या कंपन्यांचे ग्राहकच नाहीत.

डिसले गुरुजींसोबतच शुवाजीत नावाचा एक भारतीय शिक्षकही पहिल्या पन्नास लोकांत यादीत होता. शुवाजीत IIM लखनौमधून शिक्षण घेऊन, नंतर लंडनमध्ये IBM मधली करत असलेली नोकरी सोडून राजस्थानमध्ये बंकर रॉय यांच्या बेअरफूट कॉलेज या राजस्थानमधील संस्थेत अत्यंत गरीब घरातील मुलांना शिकवतोय. त्याने Hi-Fi शिक्षणापेक्षाही आत्यंतिक दारिद्र्यात असणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा ध्यास घेतलाय. बंकर रॉय यांना तर Time ने 2010 च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये निवडले होते, जे 1972 पासून हे कार्य करत आहेत. IIM अहमदाबाद मधील प्राध्यापक अनिल गुप्ता गेली कित्येक वर्षे भारतभरातील शालेय मुलांच्या innovative idea ना व्यवहारात उपयोगी कसे आणता येईल यावर काम करत आहेत. डॉ. जयंत नारळीकर, अरुण देशपांडे आदी संशोधक लोक मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन कसा आणता येईल यासाठी आयुष्य खर्ची घालत आहेत. ओरिसामधल्या बिनोदिनी समल या शिक्षिका गेली कित्येक वर्षे नदी पोहून पार करत शाळेत जातात, आणि मुलांना शिकवतात. आदिवासी पाडे आणि नक्षली भागात सेवा करणारे हजारो शिक्षकही आपल्या देशात आहेत. पण या हजारो शिक्षकांच्या आयुष्यभर केलेल्या कामापेक्षा 5-7 वर्ष Hi-Fi शिक्षणाच्या श्रीमंत मॉडेलला खेड्यात नेऊन दाखवण्याला अवार्ड दिला जातो, कारण त्यात पुरस्कार देणारांचे आणि प्रयोजकांचे व्यावसायिक हितसंबंध दडलेले असतात.

1994 ते 2000 या काळात भारतीय सुंदरींनी 2 वेळा "मिस युनिव्हर्स" आणि 4 वेळा "मिस वर्ल्ड" हा किताब पटकावला होता. 1966 नंतर 2004 पर्यंत एकही भारतीय सुंदरी हे किताब मिळवू शकली नाही याचा अर्थ, तेव्हा भारतात सुंदर युवतीच नव्हत्या का? ह्या किताबांच्या लयलुटीमागे WTO वर नुकतेच स्वाक्षरी केलेल्या भारतात सौंदर्यप्रसाधनांचे प्रचंड मोठे मार्केट निर्माण करण्याची बहुराष्ट्रीय कंपन्यांची प्रेरणा होती. कोरोनाच्या साथीच्या लॉकडाऊननंतर 4G तंत्रज्ञानाच्या सोबतीने ऑनलाईन होत असलेल्या शैक्षणिक क्षेत्रात ICT ची भली मोठी भारतीय बाजारपेठ जगभरातील कंपन्याना खुणावत आहे, आणि त्या बाजारपेठेला आकार देण्यासाठी माहिती व संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना या क्षेत्रात भारतीय आयडॉल निर्माण करावेच लागतील. पण शिक्षणाची बाजारपेठ आणि सौंदर्यप्रसाधनाची बाजारपेठ या अत्यंत वेगळ्या स्वरूपाच्या गोष्टी आहेत. शिक्षण क्षेत्रात आणलेले फॅड (अल्पकाळाचे चोचले), दीर्घकाळाचे प्रश्न निर्माण करू शकतात. म्हणून आमच्या राज्यपाल, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री वगैरे महनीय लोकांनी डिसले गुरुजींच्या सोबतच आपले आयुष्य शिक्षणासाठी वाहून देणाऱ्या डॉ. नारळीकर, बंकर रॉय, डॉ. अनिल गुप्ता, अरुण देशपांडे वगैरे लोकांशीही थोडी चर्चा करावी आणि त्यातून योग्य आणि सर्वसमावेशक दीर्घकालीन शैक्षणिक धोरणे आखावीत एवढीच माफक अपेक्षा!

Updated : 14 July 2022 1:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top