बोगस बियाणे: बियाणे बदलून देऊन विषय संपणार आहे का?: अजित नवले
X
यंदा कापसाला भाव नसण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली. साधारण ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो. सोयाबीनच्या पिकावर मराठवाडा, विदर्भातील ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. अशा परिस्थितीत राज्यात सोयाबीन चं मोठ्या प्रमाणात बियाणं बोगस आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट कोसळलं आहे. लॉकडाऊन मुळं मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आल्यानं दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झआली आहे.
या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र ने किसान सभेचे नेते अजित नवले यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सरकारला फक्त बियाणे बदलून देऊन हे प्रकरण संपवायचं आहे का? सरकार या कंपन्यांच्या मुळाशी कधी जाणार असा सवाल उपस्थित केला आहे.
सोयाबीनचे सदोष बियाणे वितरित झाल्यामुळे सोयाबीन पेरा वाया गेल्याच्या गंभीर तक्रारी येत आहेत. शेतकऱ्यांना यामुळे मोठया आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उगवण न झालेल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांना दुबार पेरणी करायची आहे. मात्र लेखी तक्रार करूनही कृषी विभागाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे.
अशातच राज्यभरातील कृषी सेवा केंद्र दर रविवारी बंद रहात असल्याने शेतकऱ्यांना हंगामाच्या काळात निविष्ठा उपलब्ध होताना अडचणी येत आहेत. कृषी सेवा केंद्रांच्या राज्य संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यभरातील कृषी सेवा केंद्र आठवड्यातून एकदा बंद ठेवण्यात येत आहेत. बहुतांश ठिकाणी रविवारी केंद्र बंद ठेवली जात आहेत. तोंडावर आलेला हंगाम व कोरोनामुळे अगोदरच खंडित झालेली वितरण साखळी पाहता कृषी सेवा केंद्राच्या राज्य संघटनेने आपल्या या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे.