Home > मॅक्स ब्लॉग्ज > बहिरमची जत्रा-बहिरमचं झगमग स्वप्न

बहिरमची जत्रा-बहिरमचं झगमग स्वप्न

बहिरमची जत्रा-बहिरमचं झगमग स्वप्न
X

जत्रा - यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. बहिरमची यात्रा ऐन भरात आली आहे.बहिरमची जत्रा म्हटल की, अस्सल वऱ्हाडी माणसांची मन मोहरून जातात. झंकारून उठतात. खेड्यातून शहरात स्थायिक झालेली माणसं नकळतपणे आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलायला लागतात. काही क्षणातच डोळ्यासमोर लहान असताना वा तरुणपणी अनुभवलेल्या जत्रांची चित्रं चलतचित्रपटाप्रमाणे सरकायला लागतात.

पूर्वी पिकं निघाल्यानंतर वर्षभराचा शिणवटा घालविण्यासाठी जत्रा हा प्रकार लहान-थोर सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र राहत असे. देव-देवतांच्या नावाने केलेले नवस फेडणे, आपल्या गावात न भेटणाऱ्या वस्तूंचा बाजारहाट उरकणे आणि जलसे, तमाशे व कुस्त्यांच्या दंगलीत मन रमविणे हे जत्रेला जाण्यामागचे मुख्य उद्देश असायचे.आज बाजारहाट गावा-गावात भरतात. टीव्हीमुळे करमणूक घरात मिळते. नवस फेडायला कोणी जत्रेची वाट बघत नाही. आजूबाजूला असंख्य 'जागृत' मंदिरं झाली आहेत. बुवा-महाराजांची पैदासही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जत्रांचं पूर्वीचं ग्लॅमर उरलं नाही. मात्र तरीही जत्रा हा प्रकार टिकून राहावा, असं मनापासून सर्वांनाच वाटतं.

जत्रेच्या किती-किती आठवणी आहेत. आज पन्नाशीत असलेली पिढी तेव्हा उत्तररात्री वा भल्यापहाटे बैलगाडीनं जत्रेला निघायची. जत्रेला जाण्यासाठी साऱ्या घरादाराची एकच धांदल उडायची. घरची खिलारी बैलं गाडीला जुंपली जायची. गाडीत बायकामाणसं आणि पोरेसोरं बसायची. पुरुष माणसं पायी वा घोड्यावर बसून निघायची. रस्त्यात बाया माणसांचा गप्पांचा बाजार असायचा. जत्रेच्या ठिकाणी पोहोचलं की सर्वांमध्ये वेगळंच चैतन्य निर्माण व्हायचं. बायांना नवस फेडण्याचे वेध लागायचे. पुरुषमंडळी राहुटी कुठे लावायची याचा शोध घ्यायचे. बालगोपाळांना देवळासमोरची नाना प्रकारची दुकानं खुणवायची. पेढे, बर्फी, बत्तासे, साखरेच्या कांड्या, चुरमुरे, फुटाणे, डाळे अशा खाद्यपदार्थांची दुकानं, आरसे, फण्या, नकली कचकड्याचे चष्मे, खुळखुळे, शिट्ट्या, गलोली, लहानमोठे चेंडू, खेळणी असं आणखी बरंच काही असणारी ती नवलाईची दुनिया मुलांना खेचून घेत असे. आज लहानपणापासून मोठमोठी डिपार्टमेंटल स्टोअर व रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्या मुलांना यातील थरार कळणार नाही. तो आनंद वेगळा होता हे नक्की. तेव्हाच्या जत्रेतील दोन आण्याची साखरेची कांडी वा आकाशझुल्यातून मारलेल्या चकरेची सर आजच्या महागड्या मिठाईला वा यांत्रिक स्काय राईडला नक्कीच येणार नाही.





जत्रांच्या अशा खूप आठवणी आहेत. सांगाव्या आणि जतन करून ठेवाव्या तेवढ्या कमी. बहिरम आणि ऋणमोचन...वऱ्हाडातील प्रसिद्ध म्हणाव्या अशा जत्रा आहेत. नामवंत लेखक मधुकर केचे यांनी बहिरमच्या यात्रेचं अतिशय वेधक असं चित्रण आपल्या लिखाणातून केलं आहे. ते त्यांच्याच शब्दात वाचण्याजोगं आहे- 'सातपुड्याच्या पायथ्याशी महिनाभर मुक्कामाला येणारं 'एक झगमग स्वप्न', असं वर्णन त्यांनी या जत्रेचं केलं आहे. 'दिवाळी संपते. हेमंत ऋतू नवे सोने घेऊन येतो. मग पौष महिन्याच्या काळात बहिरमची जत्रा सुरू होते. गहू ओंब्यांवर येतो. आम्रवृक्षाच्या झुंडीच्या झुंडी आपल्या मोहोराची वार्ता आभाळभर करतात. त्यावेळी कास्तकारीतून मोकळे झालेले हात आणि भरलेला खिसा घेऊन वऱ्हाडी कास्तकार महिन्याच्या बोलीने या स्वप्नात शिरतो. ...विदर्भाची काळी कसदार सोने-चांदी ओकणारी जमीन. तिची वर्धे- पूर्णेच्या कुशीत बागडणारी लेकरं. ही लेकरं आषाढीला “हरी मुखे म्हणा-हरी मुखे म्हणा" करीत पंढरपूरला जाणार, "महादेवा जातो गा" म्हणत चौऱ्यागडला वा सालबर्डीला जाणार.पसातपुड्याखालचा अमरावती जिल्हा नेमका ऋणमोचन किंवा बहिरमलाच जाणार. संस्थानिकांशी बरोबरी करणारे इकडचे तेव्हाचे जमीनदार. यात्रा महिन्यावर आली की, बंड्या भरभरून त्यांचे सामान बहिरमला जाणार. तिथं मग पूर्ण महिनाभर तंबूडेरा. या तालेवारांची गोष्टच न्यारी. आपले वैभव दाखविण्यासाठी स्पर्धा लागलेले ते सारे पाटील, देशमुख राहुट्या, तंबू, डेरे यांचे मोहल्ले सातपुड्याच्या पहाडात उभे करतात. वाड्यात द्यावा तशा परस्परांना आपापल्या तंबूत मेजवान्या देतात. नुकत्याच विकलेल्या कापसाच्या रकमा 'सदा रंग लाल... तुझ्या भांगात गुलाल' म्हणत पेटी ठुमकणाऱ्या कोण्या चटकचांदणीवर उधळल्या जातात. वरखेडकरांपेक्षा तळवेलकरांनी दौलतजादा जास्त दिला, ही स्तुतीवार्ता मग एव्हरेस्ट विजयाच्या गुमानाने दिवसभर फिरत राहते. केचे सरांनी बहिरमच्या अशा खूप साऱ्या आठवणी लिहिल्या आहेत. त्या मुळातूनच वाचाव्या अशा आहेत.


बहिरमची रम्य अशी ही जत्रा काळानुरूप बरीच बदलली आहे. आधुनिकतेमुळे माणसांची जीवनशैली व प्राथमिकता बदलली असल्याने त्याचा परिणाम इतर गोष्टींप्रमाणे जत्रेवरही होणे अगदी स्वाभाविक आहे. निव्वळ हळहळ व्यक्त करण्यापेक्षा ही जत्रा पूर्वीच्या टेचात फुलावी, बहरावी यासाठी आपण बरंच काही करू शकतो. अलीकडच्या काही वर्षात आमदार त्याबद्दल बच्चू कडू यानी बहिरमचा तमाशा बंद केल्याने या यात्रेची गंमत गेली, असं सांगितलं जाते. मात्र त्याला काहीही अर्थ नाही. तमाशाच्या नावाने जे गळे काढतात त्यांचे इंटरेस्ट वेगळे आहेत.कोणत्याही जत्रेमध्ये जे काही तमाशे असतात तेथे नेमकं काय चालतं हे एकदा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल, तर तमाशाचं समर्थन कोणीच करणार नाही.




बहिरममध्ये तमाशा नाही म्हणून या जत्रेची मजा गेली असं मानण्याचं काही कारण नाही. पूर्वी इंग्रजांच्या काळात तहसीलदार पर्यायाने तहसील कार्यालय बहिरमला यायचं. कोर्टही तेथेच भरायचं. लोक जत्रेच्या निमित्ताने येऊन आपली शासकीय कामेही करून घ्यायची. काही वर्षापूर्वी बच्चू कडूंनी शासकीय कार्यालय काही दिवसासाठी तेथे आणून शासकीय यात्रा भरविली होती. हा प्रयोग नित्यनेमाने झाला पाहिजे. याशिवाय महिनाभर वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा, महोत्सवांचंही आयोजन केलं पाहिजे. बहिरमच्या यात्रेचं महत्त्व व वेगळेपण लक्षात घेऊन तालुका व जिल्हा प्रशासनानेही 'बहिरम महोत्सव' यासारखा एखादा प्रयोग करता येऊ शकतो का यादृष्टीने विचारविनीमय करून पुढाकार घेतला पाहिजे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पांढरपेशा मध्यमवर्गीयांनी पौष महिन्यातील एक-दोन दिवस तरी तिथे मुक्कामाच्या तयारीने गेलं पाहिजे. असं झालं तरच बहिरमची यात्रा टिकेल. आपला अमूल्य धार्मिक व सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी कोरडे उसासे टाकण्यापेक्षा आपण एवढं नक्कीच करू शकतो.

Updated : 4 Jan 2024 12:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top