Home > मॅक्स ब्लॉग्ज > आर्यन खानच्या निमित्ताने...

आर्यन खानच्या निमित्ताने...

आर्यन खान वर ज्या पद्धतीने माध्यमं भाष्य करत आहेत. ती माध्यमं व्यवस्थेच्या पोकळीवर का बोलत नाही? मुलं कोणीही असो... आणि ते कोणाचंही असो ते व्यवस्थेचं बळी ठरले आहे. याची जाणीव करुन देणारा तृप्ती डिग्गीकर यांचा लेख

आर्यन खानच्या निमित्ताने...
X

आर्यन खानबद्दल जे जे tweets आणि इतर मजकूर सार्वजनिक होत आहे ते दुर्दैवी आहे. लेकरं हे लेकरंच असतात! झोपडपट्टीतील किशोरवयीन असोत किंवा अलिशान घरातील. नशा करण्याची वृत्ती वाढते आहे. त्याचे उदात्तीकरण होते.

2017-18 च्या सुमारास PUBG gaming addiction मुळेही बड्या बड्या घरातली मुले जीवानीशी गेली. Addiction कोणतेही वाईट! यावर आर्यनचे नाव आले म्हणून अधिक कमेंट होताहेत. पण addiction हे पालकांमध्ये आहे.

पैसाच पैसा आहे तिथंही व कफल्लक तिथंही. याला आर्थिक स्थितीच्या आधारे निष्कर्ष काढता येत नाही. शाळांमध्ये वार्षिक फी 70 हजार ते 1.5 लाखापर्य॔त गेली आहे. चांगल्या शाळेत मुल टाकणे म्हणजे रग्गड पैसा लावणे. मग त्या शिक्षणातून हाशील काय होते?

पाल्यांवर बक्कळ पैसा खर्च करणे म्हणजे उत्तम पालकत्व. अनेक मध्यमवर्गीय पालक तर परवडत नसतानाही सगळी मिळकत पाल्यांना उत्तम शाळा, ट्यूशन, फिनिशिंग स्कूल, शिष्टाचार शिकवणा-या संस्था, hobbies साठी वेगळे क्लास असं सुरू आहे. सगळा मारा असुनही या मुलांना रेव्ह पार्ट्यांमधे थ्रील वाटतं.

पैसा हे दैवत झालं की समाज बकाल होतो. संवाद संपतो व पोकळ इगोची स्पर्धा सुरू होते. अभिजातता, सहजता, खेळीमेळीचे वातावरण, खिलाडू वृत्ती सगळे गायब. स्वतः च्या कोषात राहणं वेगळे आणि सतत बोअर होतंय म्हणून काहीबाही थ्रील शोधणे वेगळे.

आधी संजूबाबा होता आज आर्यन आहे. ग्लॅमरस चेहरे असल्याने यावर कमेंट करायला उड्या पडत आहेत. पण आपला आसपास पाहा. चैन करायला व रात्री दारू मिळेल म्हणून भुरट्या चो-या करणारे सगळ्याच आर्थिक स्तरातील आहेत. किशोरवयीन व तरूण अधिक आहेत.

या विषयांवर नावानिशी बोलण्याऐवजी व्यवस्थात्मक पोकळीवर बोलले पाहिजे. ही व्यवस्था आपण प्रत्येकाने निर्माण केलेली आहे. ती कुटूंब असो, आसपास असो, समाज, समुदाय असोत... मोठ्यांनी निर्माण केलेल्या सापळ्यात, सुख, प्रतिष्ठा याच्या कल्पानांमध्ये ही पोरं फसत जातात.

Updated : 4 Oct 2021 8:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top