जगातील अद्भुत अशा क्रांतीचा आजोबा महात्मा ज्योतिराव फुले
X
जगात विविध देशात क्रांती घडवून आणणारे अनेक महापुरुष, योद्धे, धर्म संस्थापक होऊन गेले ज्यांची चर्चा जागतिक स्तरावर होतांना दिसते. मात्र, भारतात सामाजिक मानवतावादी क्रांती घडवून आणणाऱ्या महापुरुषाचे नाव मात्र त्यात क्वचित घेतले जाते. इतकेच काय भारतात अनेक महापुरुषांच्या सोबतच देशाचा सर्वोच्च सन्मान समजला जातो अशा "भारतरत्न” पुरस्कारापासून एका महान क्रांतीचा प्रणेता अजूनही वंचितच आहे. आजपासून ज्या महापुरुषाची दोनशे वी अर्थात द्विशताब्दी जन्मोत्सव सुरू होत आहे, त्यांचा साधा फोटो राष्ट्राच्या सर्वोच्च सभागृह असणाऱ्या संसद भवनात नाही. त्या क्रांतीच्या आजोबांचे नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले.
संसदे मध्ये फोटो नाही हे या देशातील ८५% बहुजन समाजाला लांच्छनास्पद आहे. इतका हा बहुजन वर्ग आपल्या सामाजिक गुलामीला कारणीभूत असणाऱ्या धर्म आणि समाजव्यवस्थेच्या आजही गुलामी मध्ये आहे. त्यामुळे आजचा लेखन प्रपंच हा अशा ८५ टक्के बेशरम आणि नालायक वारसदारांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आहे. त्यामुळे ज्यांच्यात सत्य आणि प्रामाणिक वाचण्याची हिंमत आहे, अशा लोकांनीच पुढे हा लेख वाचावा. गुलाम व लाचार मानसिकतेच्या लोकांनी पुढे नाही वाचला तरी चालेल. सुरुवात करण्याच्या आधी क्रांतीबा ज्योतिराव महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन करतो. माझे मित्र आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक दिवंगत प्रा. हरी नरके यांचे स्मरण करतो कारण त्यांच्या अकाली निधनाने बहुजन चळवळीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मित्रहो, जगातील अनेक देशात पारतंत्र्य होते, गुलामी होती. मात्र, त्यासर्व देशात एकाच प्रकारचे पारतंत्र्य किंवा गुलामी होती म्हणजे त्यांच्या देशावर बाहेरून आलेल्या आक्रमकांनी हल्ला करून स्थानिक राजसत्तेला पराभूत करून स्वतःची सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे त्या देशातील लोक हे एकजूट होऊन त्यादेशातील विदेशी आक्रमकांना हाकलून देण्यासाठी लढा देत होते आणि त्यांनी त्यांना पराभूत करून आपल्या देशातून हाकलून दिले आणि आपल्या देशात पुन्हा स्वतःचे शासन प्रस्थापित करून ते देश स्वतंत्र झाले, मुक्त झाले.
मात्र, भारतात असे नव्हते दीड-दोन हजार वर्षापासून यादेशातील ८५% बहुजन वर्ग हा आपल्याच देशात दुहेरी गुलामीत होता. एक म्हणजे धर्माच्या नावाने लादलेली धर्मावर आधारित जातीयवादी, विषमतावादी, शोषण व्यवस्थेची गुलामी आणि त्यानंतर देशावर मुघल, मुस्लिम, डच, पोर्तुगीज, ब्रिटिश यांनी येऊन आक्रमण करून देश जिंकून स्थापन केलेली गुलामी. वास्तविक विदेशी आक्रमकांच्या मुळे आलेले पारतंत्र्य आणि देशात धर्माच्या आधारे असणारे पारतंत्र्य या दोघांपैकी विदेशी आक्रमकांनी लादलेले पारतंत्र्य येथील ८५% बहुजनांच्या साठी क्रांती, विद्रोहाची नांदी ठरली. त्यामुळे येथील बहुजनांना आपल्या धर्माने लादलेल्या गुलामीच्या विरोधात बोलता येऊ लागले, अनेकांनी विदेशी आक्रमकांच्या धर्मातील समानता, स्वातंत्र्य आणि विकासाची संधी बघून आपल्या पारंपारिक पिढीजात धर्माला लाथ मारून आक्रमक लोकांचा धर्म स्वीकारला आणि आपल्याच देशात आक्रमकांचे समर्थक, सहकारी आणि धर्मबंधू बनून राहण्यास सुरुवात केली. त्यांच्यासाठी तो स्वातंत्र्याचा नवा श्वास होता. त्याने आक्रमकांची सत्ता आणि पाया यादेशात मजबूत झाला तो इतका मजबूत की सुमारे १२०० वर्ष हा देश परकीय सत्तेच्या अमलाखाली होता.
असे असले तरी भारतातील अजूनही ८५ टक्के समाज दुहेरी पारतंत्र्यात होता. एक पारतंत्र्य परदेशातून आलेल्या आक्रमकांचे होते. तर दुसरे पारतंत्र्य हे देशाच्या अंतर्गत असणाऱ्या नालायक, नीच, विषमतावादी, स्वार्थी, स्त्री विरोधी, मानवता विरोधी धर्मावर आधारित व्यवस्थेचे. ज्यामुळे ८५% समाज या विषमतावादी व्यवस्थेच्या चरकात पिळला जात होता. ८५% समाजाला ना शिक्षणाचा अधिकार होता ना राज्य व्यवस्थेतील कुठल्या महत्त्वाच्या पदावर जाण्याचा मार्ग होता. तो ज्या गावात, ज्या जातीत जन्माला येई त्याच जातीत, जन्म जात जो व्यवसाय असे तो करत त्याच गावातील पंचक्रोषित मरून जात असे. त्याचे धर्माच्या ठेकेदाराकडून आणि परकीय आक्रमकांच्या कडून असे दुहेरी शोषण होत असे. देशातील उच्चवर्णीय मात्र जे आक्रमक येत त्यांच्या विरोधात कधी लढत तर कधी त्यांच्या सोबत मिळून सत्तेत राहत. मग ते मुस्लिम आक्रमक असो की ब्रिटिश. यादेशातील उच्चवर्णीय हे सतत सत्तेत रहात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी बहुसंख्य लोकांना फक्त परकीय लोकांच्या पारतंत्र्यात रहावे लागले, धर्माचे आणि समाज व्यवस्थेचे स्वातंत्र्य मात्र त्यांच्या हातात होते. इतकेच नाही तर हे उच्चवर्णीय सत्ताधाऱ्यांकडून बडी-बडी पदे जशी सचिव, मंत्री, सुभेदारी, अशी मोठी पदे मिळवून ८५% जनतेच्या समोर सत्ताधारी आणि राजेच असत. जे बहुजन समाजाला लुटून मुस्लिम आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांची तिजोरी भरत असत. त्यांच्या या जाचाला कंटाळून आपल्या स्वतःच्या विकास आणि स्वातंत्र्यासाठी मोठ्या प्रमाणात बहुजन हिंदुनी मुस्लिम धर्म स्वीकारला तर ब्रिटिश सत्ता आल्यावर मोठ्या प्रमाणात बहुजन जातीतील लोकं ईसाई झाले. आज भारत देशात १६ ते १७ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेश मधील मुस्लिमांची संख्या पकडली तर अखंड हिंदुस्थान मधील ४५ टक्के हिंदू हे मुस्लिम धर्मात गेले हे सत्य समोर येते. हे दुसरे तिसरे काही नसून हिंदू धर्मातील जातीयवाद आणि विषमतेवर आधारलेल्या समाज व्यवस्थेचे पाप आहे. हिंदू धर्मातील उच्चवर्णीय मुस्लिम आणि ब्रिटिश आक्रमकांच्या समोर स्वतः गांडू बनून रहायचे आणि आपल्याच धर्मातील ओबीसी आणि अस्पृश्य समाजातील लोकांना मात्र समानतेचे, मानवतेचे अधिकार न देता, त्यांचे स्वतः शोषण करत राहायचे. शिवाय परकीय सत्तेत, मंत्री, सचिव, सुभेदार म्हणून राहण्यात गर्व देखील समजत.
ही व्यवस्था उमजली महात्मा ज्योतिराव फुले यांना. त्यांनी ही व्यवस्था बरोबर हेरली आणि त्यांनी ब्रिटिश आक्रमकांच्या विरोधात नंतर लढता येईल, मात्र ब्रिटिश सत्तेने देऊ केलेले शिक्षण, व्यवसाय आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा उपयोग करून सर्वप्रथम धर्माच्या नावाने हजारो वर्ष ओबीसी आणि SC/ST (अस्पृश्य) यांच्यावर लादलेल्या गुलामीच्या विरोधात सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले. स्वतः महात्मा ज्योतिराव फुले यांना जातीयतेचे चटके बसले होते, त्यांच्या शिक्षणात उच्चवर्णीय लोकांनी आणलेला अडथळा त्यांना माहित होता. जेव्हा त्यांनी समाजातील बहुजन अस्पृश्य आणि स्त्रियांना जागृत करण्याचे काम हाती घेतले, तेव्हा तर इथल्या धार्मिक ठेकेदारांच्या बुडाला आग लागली. त्यांनी महात्मा फुलेंच्या प्रत्येक सामाजिक क्रांती कार्याला विरोध करण्यास सुरुवात केली. इतका विरोध केला की, त्यांना ठार मारण्यासाठी रामोशी समाजातील दोन गुंडांना सुपारी दिली. ती पण एक हजार रुपयाची. त्या काळात दीड रुपया तोळे सोने होते, त्यामुळे आता तुम्हीच हिशोब लावा की, सुपारी किती लाखाची होती, मी पुढे जातो.
या क्रांतीच्या आजोबाने बहुजन समाज मागे का राहिला ? त्याच्या पारतंत्र्याचे अचूक निदान केले आणि ते आपल्या आखंडात मांडले.
विद्येविना मती गेली।
मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
महात्मा फुले यांनी जे जाणले की देशातील बहुजन समाज हा अज्ञानामुळे धार्मिक समाज व्यवस्थेच्या पारतंत्र्यात गेला. त्यांनी बहुजन समाजात ज्ञानाचा प्रचार करून अज्ञान कुठले, अनीती कुठली आणि त्यातून होणारा अन्याय कुठला हे सांगण्यास सुरुवात केली. धर्म म्हणून सांगितल्या जाणाऱ्या विषमतावादी व्यवस्थेचे त्यांनी शवविच्छेदन करून समाजाच्या टेबलावर ठेवले, त्यामुळे धर्माचे ठेकेदार, लाभार्थी अस्वस्थ झाले, संतापले आणि आक्रमक झाले.
सर्वात मोठा आणि पहिला प्रहार महात्मा फुले यांनी सर्वात पवित्र मानला गेलेल्या धार्मिक ग्रंथ वेदावर केला. त्यांनी सरळ सांगितलं "वेद म्हणजे भेद" सर्व पुराणातील कथा या भाकड कथा असून बहुजन समाजाला मूर्ख बनविणे, त्यांना भ्रमात ठेवण्याचे, लुटण्याचे षडयंत्र आहे. त्यासाठी त्यांनी अनेक देवांची त्यांच्या रूपाची जाहीर खिल्ली उडवली. आणि देवाची नव्याने साधी सरळ व्याख्या केली ती म्हणजे "निर्मिक" देव हा ही सर्व सृष्टीचा निर्माता म्हणजे निर्मिक आहे. देवाचे रूप आणि भक्ती काय असेल तर सत्य बोलणे, सत्य वागणे, सत्याचा प्रचार प्रसार करणे आहे. त्यामुळे त्यांनी "सत्यशोधक समाजाची" स्थापना केली आणि "सत्यधर्म" सांगितला. जो सर्व प्रकारच्या भेद, विषमतेला आणि शोषणाला नकार देणारा असून सत्य, अहिंसा, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, समानता, मानवता आणि प्रेमावर आधारलेला आहे.
वैदिक धर्माच्या नावावर भट-बामणाकडून होणाऱ्या फसवणूक, शोषण आणि विषमतेला पर्याय म्हणून सत्यधर्म दिला. हिंदू समाजातील संपूर्ण बहुजन समाजाचे एकत्रीकरण आणि एकरूपी करण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. ब्राह्मणाचा अधिकार काढून तो अस्पृश्यांच्या हातात देण्याचे अद्भुत असे क्रांती कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले.
त्यांनी केलेल्या क्रांतीने भविष्यातील सामाजिक आणि मानवतावादी क्रांतीची बीजे पेरली गेली, त्यातून बहुजन समाजात विद्वान, पत्रकार, अभ्यासक, चिंतक, व्यापारी आणि उद्योगपती जन्माला आले. त्यांचे हे विचार महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या सारख्या अनेक राज्यकर्त्या पर्यंत गेले. त्यांच्या या क्रांतिकार्याने हिंदू धर्मातील अनेक उच्चवर्णीय लोकांना आपली चूक आणि धर्मातील त्रुटी उमजल्या त्यांनी महात्मा फुले यांच्या कार्याला हातभार लावला. त्यामुळे या सत्यशोधक क्रांतीने मराठा, कुणबी, रामोशी, अस्पृश्य अशा समाजात विद्रोही परंपरा जन्माला आली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली. ते एवढ्यावर थांबले नाही तर लोकांच्या मध्ये स्वदेश आणि स्वातंत्र्य याबद्दल प्रेरणा निर्माण व्हावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जगातील पहिला पोवाडा रचला आणि जगात सर्वप्रथम शिव जयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शिक्षण, धर्मसुधार, अंधश्रद्धा निर्मूलन, उद्योगक्रांती, कामगार क्रांती आणि स्त्री मुक्तीच्या क्रांतीमुळे बहुजन आणि उच्चवर्णीय जातीत हजारो समाजसुधारक निर्माण झाले. त्यात प्रमुख नावे घ्यायची झाल्यास पहिले कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे, मुक्ता साळवे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पिता रामजी सुभेदार, अर्जुन केळुस्कर, स्त्री मुक्तीवरील स्त्री-पुरुष तुलना पुस्तकाच्या लेखिका ताराबाई शिंदे, रखमाबाई राऊत, भारतातील पहिल्या स्त्री वृत्तपत्र संपादिका, अस्पृश्य समाजातील पहिले पत्रकार गोपाळबाबा वलंगकर, अस्पृश्य समाजातील पहिले वृत्तपत्र संपादक शिवराम जाणबा कांबळे, मराठा समाजातील समाजसेवक अर्जुन केळुस्कर, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे, भास्करराव जाधव, पत्री सरकार, जगात ज्याचे साहित्य आज वाचले जाते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, अशी हजारो अभ्यासक, विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक जन्माला आले. याच क्रांतीची धुरा पुढे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हाती घेतली आणि यादेशात समग्र क्रांती घडवून आणली. महात्मा फुले यांच्या क्रांतीचा परिणाम असा झाला की, ज्या बहुजन समाजाला विषमतावादी व्यवस्थेने जखडून ठेवले होते ते स्वतंत्र झाले. एका अस्पृश्य समाजात जन्मलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची राज्यघटना लिहून धर्मावर आधारित व्यवस्थेला सार्वजनिक जीवनातून आणि मान्यतेतून हद्दपार केले.
मात्र, यादेशातील बहुजन हा आपल्या जातीत जन्माला आलेल्या महामानव, संत, महापुरुष यांच्याकडे कायम मामुली समजून, त्यांच्या शिकवणूक आणि वारसाकडे दुर्लक्ष करून त्यांना काळाच्या पडद्या आड गाडून टाकून सतत आणि नेहमी ज्या धर्म व्यवस्था आणि ठेकेदारांनी त्यांना हजारो वर्ष ज्ञानापासून दूर ठेवून गुलामीत खितपत ठेवले त्याच व्यवस्थेच्या पालख्या वाहण्यात धन्यता मानत आहे. आपला विकास हा आपण केलेल्या शिक्षण, कष्ट आणि संविधानाने निर्माण केलेल्या संधी आणि व्यवस्थेमुळे झाला आहे, हे विसरून कुठल्यातरी काल्पनिक आणि भ्रामक गोष्टीच्या मागे लागून क्रांतीचा मार्ग सोडून प्रतिक्रांतीच्या मार्गाने जात आहे, त्यासाठी आपली शक्ती, श्रम, पैसा, पद खर्च करीत आहे.
आजही अनेक जणांच्या घरात नाही नाही त्या फडतूस बाबाबुवा यांचे फोटो असतील. मात्र, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असत नाही. हे फोटो घरात लावणे त्यांना मागास असल्याचे वाटते किंवा त्यांचे तथाकथित उच्चवर्णीय मित्र मंडळी त्यांच्यावर बहिष्कार टाकतील, याची त्यांना भीती वाटते. त्यामुळे ते अभावाने महात्मा फुले जयंती साजरी करतात किंवा त्यांची पुस्तकं अभावाने घरात ठेवतात. काही खुद्द माळी आणि ओबीसी समाजातील लोकांना महात्मा फुले यांच्याबद्दल विचारले तर ते सहज बोलतात त्यांनी आमच्या साठी कुठले कार्य केले ? त्यांनी जे केले ते महार-मांगासाठी केले, इतके क्रांतीशी बेईमान असणारे लोकं आहेत.
मात्र, कोट्यवधी धन्यवाद ! माझे मित्र आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या जीवन आणि तत्वज्ञानाचे अभ्यासक हरि नरके यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचे तत्वज्ञान, जीवन आणि संघर्ष हा साहित्यातून, भाषणातून पुढे आणला तेव्हा आता गेल्या दहा-पंधरा वर्षात कुठे-कुठे महात्मा फुले जयंती साजरी होतांना दिसते. त्यांनी फुलेंच्या विचारावर हल्ला करणाऱ्या तथाकथित उच्च वर्णीय प्रवृत्तीचा मुकाबला करून त्यांना सपशेल पराभूत करून टाकले. मात्र, या प्रवृती पुन्हा डोकं वर काढणार नाहीच असे नाही. त्यावेळी मात्र आपण महात्मा फुले यांनी लढलेले आणि जिंकलेले सामाजिक क्रांतीचे युद्ध आठवून प्राणपणाने लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. कारण ही लढाई महात्मा फुले किंवा हरि नरके यांच्या काहीच कामाची नाही, ती लढाई तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना पुन्हा गुलामीच्या चरकात जाण्या वाचून वाचवू शकेल. प्रतिक्रांतीची सुरुवात झालीच आहे. ज्यावेळी धर्माचे अवास्तव स्तोम माजवले जाते, धार्मिक उत्सवाचा उन्माद वाढू लागतो, आपली बुद्धी गहाण ठेवून बहुसंख्य लोकं वाट्टेल तिथे आणि वाट्टेल त्याच्या पुढे नतमस्तक होऊ लागतात, ती धोक्याची घंटा असते. तुम्ही जागृत, सावध आणि महात्मा फुले यांचे साहित्य वाचले असेल, सत्यधर्म म्हणजे काय ? सत्यशोधक म्हणजे काय हे माहीत असेल आणि हे तुम्ही तुमच्या मुलाबाळांना सांगितलं असेल तरच तुम्ही वाचू शकता, अन्यथा तुमचा बळी जाणार हे सत्य आहे.
तुम्हाला अक्कल येवो, तुमच्यात महात्मा फुले यांचा विचार आणि तत्वज्ञान अंकुरित होवो, तो अंकुरित असेल तर त्याचा वटवृक्ष होवो आणि तुमच्यात तो वटवृक्ष झाला असेल तर त्याला मी नमस्कार करतो आणि थांबतो.
पुन्हा एकदा क्रांतीचा आजोबा असलेल्या महात्मा फुले जयंतीच्या आपणास शुभेच्छा देतो आणि इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो
किरण सोनावणे, शिवसेना प्रवक्ते
९९२२६६६६०७






