Home > मॅक्स ब्लॉग्ज > प्राणघातक हल्ल्यानंतर हेरंब कुलकर्णी यांचे सडेतोड प्रश्न

प्राणघातक हल्ल्यानंतर हेरंब कुलकर्णी यांचे सडेतोड प्रश्न

सामाजिक कार्यकर्ते असलेल्या हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्याची राज्यभर चर्चा झाली. तक्रार घेण्यासाठी पाच तास लावणारे पोलीस हेरंब कुलकर्णी यांच्या घरी फेऱ्या मारायला लागले. पण या हल्ल्याच्या निमीत्ताने समाज, शासन आणि प्रशासनाला चपराक लावणाऱ्या भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या आहेत.

प्राणघातक हल्ल्यानंतर हेरंब कुलकर्णी यांचे सडेतोड प्रश्न
X

मागील शनिवारी माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला. आजारी असल्याने गाडी चालवता येत नव्हती म्हणून मित्राच्या गाडीच्या पाठीमागे बसून शाळेतून येत होतो. अचानक आलेल्या गुंड तरुणांनी गाडी अडवून माझ्या दोन्ही पायावर, हातावर, पाठीवर आणि वाईट म्हणजे डोक्यात स्टीलच्या रॉडने मारहाण केली. गाडी चालवणारा मित्र सुनिल कुलकर्णी याच्याही हातावर पायावर बेदम मार बसला.एकटा असतो तर मला कोणी उचलले असते? कारण बघे कडेला असून कोणीही मध्ये आले नाही.

तसेच आम्ही दोघे दवाखान्यात गेलो. तिथून पोलीस स्टेशनला गेलो. तक्रार नोंदवली. पोलिसांनी खूप वेळ म्हणजे ४ तास बसवून ठेवले. दुसऱ्या दिवशी नुसत्या पंचनामा साठी २ तास अशा जखमी स्थितीत हे सहन केले.

कुटूंबिय घाबरतात, शाळेतील विद्यार्थी पालक सरांना मारले म्हणून घाबरतील म्हणून मुद्दामच घटना जाहीर केली नाही. पोलीस केस पाठपुरावा करू असे ठरवले. दोन दिवस गप्प राहिलो.

पण जवळच्या मित्रांना कळताच सारेच संतापले. त्या सर्वांनी एकत्र येऊन माझ्या घरी meeting घेतली व थेट एस. पी. ऑफिसला जाऊन त्यांना गांभीर्य लक्षात आणून दिले. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला, मुख्यमंत्री यांनी मलाही फोन केला आणि क्षणात चित्र बदलले.

पोलीस एस पी थेट घरी आले. ज्या पोलीस स्टेशनला मला ४ तास बसवले ते पोलीस सतत घरी येत राहिले. दारापुढे पूर्णवेळ पोलीस आले आणि उलट तुम्ही असे आहात हे आधीच आम्हाला का नाही सांगितले..? ही तक्रार...आणि तुम्ही विशेष असाल तरच आम्ही लवकर दखल घेतो ही कबुली.

मग त्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे घरी आल्या. अनेक वर्षांचा स्नेह असल्याने त्यांनाही खूप वाईट वाटले. त्यांनी माझ्या घरातच पत्रकार परिषद घेतली. मग पोलिसांवर दडपण वाढले. उपसभापती नीलम गोऱ्हेंनी पत्र पाठवले. शालिनीताई विखे, आमदार संग्राम जगताप असे अनेक नेते एस पी शी बोलले आणि आरोपी त्यानंतर एक दिवसात अटक झाले..

या वेदनेत हे समाधान आहे की, समाजात अजूनही कार्यकर्त्यांबद्दल खूप आदर आहे. जिव्हाळा आहे. नगरला येऊन मला फक्त ३ महिने झाले. पण किमान ३ दिवसात ८०० माणसे भेटून गेले. किमान १५०० फोन आले. त्यात शहरातील सर्व राजकीय पक्ष नेते, नगरसेवक सामाजिक संघटना आणि सामान्य अनोळखी कितीतरी माणसे... अहमदनगर मधील आमचे सर्व कार्यकर्ते ढालीसारखे माझ्यासाठी उभे राहिले.

विश्वंभर चौधरी यांच्यासह नाशिक, जालना, पुणे, संभाजीनगर, शिरूर, अकोले अशा अनेक ठिकाणाहून लोक आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मेधा पाटकर, बाळासाहेब थोरात, विनोद तावडे, भालचंद्र कांगो, यशोमती ठाकूर, वसंत पुरके अशा अनेक मान्यवरांनी फोन केले. यातून एकटेपण वाटले नाही. याने अजून धैर्य आले. कार्यकर्ता एकटा नसतो हे अनुभवता आले. अनेक शहरात लोकांनी निवेदने दिली.

शारीरिक मारहाण होणे दुःखदायक असते. अपमानकारक असते. जखमेच्या वेदना असतात पण माझेच मला विशेष वाटले की, मी इतका अशक्त असूनही मी शांत होतो. उलट खाली पडल्यावर मी गाडीचा नंबर लक्षात ठेव असे सांगत होतो. किंचितही भीती वाटली नाही. मनोधैर्य कायम राहिले.

अस्वस्थ याने आहे की, इतक्या छोट्या कारणाने इतक्या टोकाचे पाऊल लोक का उचलत असतील? शाळेपासून १०० मीटर तंबाखू टपरी नसावी असे आदेश असताना त्याची अंमलबजावणी म्हणून माझ्या शाळेशेजारी असलेली एक ४६ वर्षे जुनी पानटपरी मी महापालिकेला पत्र देऊन हलवतो आणि आमची टपरी का हलवली? म्हणून ते सुपारी देतात. हे किती भीषण आहे ? आपल्या शाळेचा परिसर तंबाखूमुक्त असावा असे सुध्दा शाळेने म्हणायचे नाही? इतकी दादागिरी असावी?

दुसरी वाईट गोष्ट म्हणजे ही सुपारी फक्त १५ हजार रुपयांची आहे. म्हणजे ५ आरोपी असल्याने प्रत्येकी ३ हजार रुपयांची. इतकी कमी आपल्या मरणाची किंमत असू शकते? अवघ्या ३ हजारात एखादा तरुण एका अनोळखी माणसाचा जीव घ्यायला तयार होतो? त्याचे परिणाम काय होतील? याचा विचार ही करत नाही? आपले करियर उध्वस्त होईल, याचे कोणतेही भान का नसावे?

तरुणाईत हिंसेची ही सहजता किती चिंताजनक आहे? हातात कोयते, रॉड हे पेन किंवा संगणकापेक्षा सहजपणे येत आहेत? आणि आपली मोठी शहरे किती बकाल होत आहेत. भर दुपारी १२ वाजता तरुण उठून कोणालाही मारून येतात. कारण कोणीही आपले कोणीही बिघडवणार नाही, याची त्यांना खात्री झाली आहे. आपले प्रिय नेते आपल्याला वाचवतील याचे वचन आणि कवच त्यांना आहे.

माझ्या अकोले तालुक्यात आम्ही अनेक बालविवाह थांबवले. अनेक दारू दुकाने बंद केली. भ्रष्टाचार तक्रारी केल्या. तडीपार करण्याची मागणी केली. शाळेच्या दारू दुकानाविरुध्द आंदोलन केले. पण कोणीही कधीही हात लावला नाही, शिवीगाळ नाही आणि इथे शहरी भागात नुसते टपरी काढण्याची तक्रार केली तर थेट जीवघेणा हल्ला....आपली शहरे किती बेताल आणि गुंडगिरीचे अड्डे होत आहेत. कोण कशाला विरोध करील? रस्ता नीट झाला नाही, अतिक्रमण केले तर नागरिक गप्प राहतात याचे कारण भेकडपणा आहे, पण ही भीतीही आहे.

शहरी भागातील राजकारण आणि गुंडगिरी हातात हात घालून पुढे जात आहे आणि तरुणाई त्याचे साधन म्हणून वापरले जात आहेत. जागा रिकाम्या करून घेणे, दहशत पसरवणे याला हे तरुण मुले लागतात. सुसाट वेगाने टीबल सीट गाडी चालवणे हे या युवा कार्यकर्त्यांचे आकर्षण आहे.

आम्ही विवेकी संवेदनशील तरुण घडवू शकलो नाही, हे शिक्षक म्हणून मला आमच्या शिक्षणाचे आणि मुलांवर लक्ष न ठेवणाऱ्या कुटुंबव्यवस्थेचे अपयश मला वाटते.

जखमी झाल्यावर अंतर्मुख होताना हे सारे मनात येते आहे. शिक्षणव्यवस्थेचा घटक म्हणून अपराधी ही वाटते आहे. हे आम्ही काय घडवले आहे?

समाधान फक्त हे की इतका मार खाऊन मी किंचितही घाबरलो नाही. मनावर ओरखडा ही नाही. आचार्य अत्रे यांच्यावर पुण्यात हल्ला झाला

तेव्हा ते मला म्हणाले " मला मारणारे मेले, मी जिवंत आहे.." हीच माझी भावना आहे.

आज मी पुन्हा कामाला सज्ज आहे.

याचे कारण अब्राहम लिंकन चे एक वाक्य माझ्या काळजात रुतून आहे..

" गुंडांना घाबरत जाऊ नको म्हणावे

त्यांना नमवणे सर्वात सोपे असते...."


ताजा कलम : माझ्या हल्ल्याच्या निमित्ताने माझ्या भोवती चर्चा न फिरता प्रत्येक गावातील ,शहरातील प्रत्येक शाळेभोवती १०० मीटर मध्ये एकही तंबाखू टपरी असणार नाही.

या शासन आदेशाचा आग्रह धरायला हवा. जनतेचा पालकांचा रेटा निर्माण व्हायला हवा. शाळा आज दारू दुकाने, टपरी, गुटखा, मटका याने वेढल्या आहेत.

Updated : 13 Oct 2023 3:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top