उदयन राजेंची अटक... ‘त्या काळ’ची !
X
‘खासदार उदयन राजेंना अटक व सुटका’ ही बातमी वाचली व मी पोलीस अधीक्षक असतानाची सातारा इथली ती पहाट आठवली. 11 सप्टेंबर 1999 रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी देशभर खळबळ उडवून देणारी ती घटना घडली होती. (‘नवी दिशा -पोलीस प्रशासनाची’ या माझ्या पुस्तकातही ती आली आहे.) त्या पहाटे एक फिर्याद माझ्या हातात देण्यात आली होती. नव्हती ती झोप उडाली. नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाल्याचे व युती सरकारमधील एक राज्यमंत्री व छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयन राजे हे त्यात प्रमुख आरोपी दाखवले होते. एवढी मुद्देसूद, संक्षिप्त व परिपूर्ण फिर्याद मी उभ्या नोकरीत पहिली नव्हती. नंतर समजले की ती 11 वकिलांनी एकत्र बसून बनवली होती.
त्यानंतर बातमी आली की अभयसिंह राजे (उदयन राजेंचे चुलते) यांच्या नेतृत्त्वाखाली हजारेक लोकांचा जमाव जमला असून आरोपी उदयन राजेंना अटक केली नाही तर सातारा पेटेल अशी धमकी दिली जात आहे. त्याच वेळी दुसरी बातमी धडकली की राणीसाहेब (उदयन राजेंची आई) यांच्यासोबत मोठा जमाव जमलाय व राजेंना अटक केली तर शहर पेटेल अशा घोषणा देतोय. तणाव प्रचंड वाढला. तीन तासांनंतर मतदान सुरू होणार होते.
परिस्थिती गंभीर होती. मोठाच पेचप्रसंग. खुर्चीवर डोळे मिटून बसलो. पटलेलं शहर, लाठीमार, अश्रूधूर, गोळीबार... सगळं डोळ्यांसमोर आलं. मग दंगलीची न्यायालयीन चौकशी. त्यामध्ये मी पिंजऱ्यात उभा. पोलीस दल, सातारा पोलीस व माझा बचाव करतोय, हे डोळ्यांपुढून सरकलं आणि उत्तर सापडलं!! अटक केली तरी दंगल होणार नाही केली तरी दंगल होणार. अटक करून दंगल झाली तर कायद्याचे पालन केल्याचे श्रेय मिळणार होते नाही तर कर्तव्यच्युत होण्याचा ठपका आला असता.
DySP मुत्याल, इन्स्पेक्टर सुर्वेंना सूचना दिल्या. उदयन राजे हजर झाले.
"Why have you called me here?" आल्याबरोबर त्यांनी प्रश्न केला.
मी फिर्याद वाचून दाखवली.
"हे सर्व साफ खोटं आहे एसपी साहेब. तुम्ही नवीन आहात. हे कुभांड माझे चुलते अभयसिंह राजेंनी रचलेले आहे. आमचा जुना वाद चालू आहे..." वगैरे. आम्ही गोळा केलेला पुरावा त्यांना सांगितला. झुंजूमुंजू होई पर्यंत वाद चालला.
"मी निर्दोष आहे. मी निघालो," असे ते म्हणाले.
मग मी बजावले, "Mr. Udayan Raje, you cannot go. Now you are under arrest!”
त्यांना क्राईम ब्रँच मध्ये ठेवण्यात आले. राणी साहेब मोठा मोर्चा घेऊन आल्या. राणी साहेब फार कडक व आक्रमक स्वभावाच्या आहेत, अशी माहिती पुरविण्यात आली होती. राणी साहेबांची सर्व बाजू ऐकून घेतली. आमचे लोक बघून घेतील... वगैर. असा त्यांचा आक्रमक पवित्रा होता.
मीही माझी बाजू सांगितली, “तुमच्या लोकांनी गडबड केली तर ते गुन्हे तुम्ही व तुमच्या मुलाने घडविले, असे आरोप होतील. तुमच्या अडचणी वाढतील. तुमच्या लोकांना घरी जाऊन शांत रहायला सांगा.” मध्येच फोन वाजत होते. प्रदीर्घ चर्चेनंतर राणी साहेबांमधील एक आई जागृत झाल्याचे मला जाणवले.
पुन्हा फोन खणाणला, "मी महाराष्ट्राचा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतोय," पलीकडून आवाज आला.
"गुड मॉर्निंग सर...!" मी.
“खोपडे तुम्ही उदयन राजेंना अटक केली हे खरे आहे का? "
"होय सर." मी.
"का?"
“फिर्यादीमध्ये त्यांचे नाव आहे त्याशिवाय…”
"उद्या फिर्यादींमध्ये माझे नाव टाकले तर मलाही अटक करणार का?"
“शिवाय तीन प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. हिंसक जमावामध्ये ते होते अशी आमची खात्री पटलेली आहे. "
"उद्या माझ्याविरुद्ध खोटे साक्षीदार उभे केले तर मलाही अटक करणार का? यू आर ऑल्वेज अगेन्स्ट मी अँड माय पार्टी."
(नांदेड एसपी असताना आमची वादावादी झाली होती. मुंडे साहेब हे खरे तर एक उमदा व मोठ्या मनाचा माणूस होते पण अधिकाऱ्यांशी वागण्याची त्यांची एक स्टाईल होती.)
"….खोपडे, मला माहीत आहे तुम्ही बारामतीचे आहात व राष्ट्रवादीचे बगलबच्चे आहात." पलीकडून फोन आपटल्याचा आवाज आला.
मीडिया, डीजीपी ऑफिस, राजकारणी यांचे फोन, राणी साहेब आदींशी एकीकडे चर्चा चालू असता एक स्पेशल ड्युटी शिपाई कानाजवळ कुजबुजला, "सर लोकांमध्ये चर्चा आहे की राजाला दोन खून माफ असतात इथे तर एकच खून झालाय! "
एव्हाना मतदान सुरू झाले होते. शरद लेवेंची अंत्ययात्रा दोन हजारावर लोकांसह तणावात सुरू झाली. स्मशानात जाण्याऐवजी प्रेत माझ्या कार्यालयाच्या दारात ठेवले गेले. अभयसिंह राजेंनी जमावापुढे भाषण केले की, "मुख्य आरोपीला अद्याप अटक केलेली नाही व केली असल्यास आरोपीला बेड्या घातलेल्या अवस्थेत जमावाला दाखवा त्याशिवाय आम्ही मृतदेह हलवणार नाही!"
मग मी जमावपुढे भाषण केले, "मुख्य आरोपीला आम्ही अटक केलेली आहे. पाच जणांचे शिष्टमंडळ येऊन खात्री करू शकते. पण बेड्या घातलेल्या अवस्थेत आरोपीला दाखविण्याची प्रथा नाही व मी दाखवणार नाही."
त्यावर अभयसिंह राजेनीं भाषण केले, "बेड्या घातलेल्या अवस्थेत आरोपी दाखविल्याशिवाय आम्ही मृतदेह हलविणार नाही. एसपी सुरेश खोपडे हे बीजेपी व शिवसेनाधार्जिणे आहेत. आमचे सरकार आल्यावर त्यांच्याकडे बघून घेऊ!"
मतदान पार पडले. एक मंत्री व छत्रपतींचे वारस असलेल्या व्यक्तीला अटक करूनही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, हे पाहून यूपी व बिहारच्या निवडणूक निरीक्षकांनी मला मिठी मारली. पण रात्रीच्या बातम्यांत निवडणूक आयोगाने कलेक्टर साताराचे अभिनंदन केले.
युतीचे सरकार जाऊन आघाडीचे सरकार आले. आमच्या बारामतीचे अजित पवार सातारचे पालकमंत्री बनले. सुरेश खोपडे हा शिवसेना-बीजेपीचा माणूस आहे असे ठरवून, निवडणुकीनंतर 3 महिन्यांत व एकूण नोकरीस 7 महिने झाले असताना माझी साताऱ्यामधून उचलबांगडी झाली. बदली का केली, याचे उत्तर ना सरकाने दिले ना इलेक्शन कमिशनने !
सातारा पोलीस दलाने निरोप दिला. त्यातील दोन शेरे आजही लक्षात आहेत. एकजण म्हणाला होता, "साहेब, दीड दिवस तुम्ही एकाच खुर्चीवर बसून होता पण तुम्ही एकदाही कुणावर रागावला नाही. " दुसरा म्हणाला, "एवढं काम केल्यावर तुमची बदली व्हायला नको होती. तरी पण एसपीला पाठीचा कणा असतो हे तुम्ही दाखवून दिलेत!”
निवृत्तीवेतना इतकेच ते शेरे महत्वाचे वाटतात!
सुरेश खोपड़े