Home > हेल्थ > कॅन्सर व आहार : भाग १

कॅन्सर व आहार : भाग १

कॅन्सर व आहार : भाग १
X

आरोग्य राखण्यासाठी आणि शारीरिक वाढीसाठी लागणाऱ्या अन्नाची तजवीज करणे किंवा गरज भागविणे म्हणजे पोषण- nutrition. सकस आहार शरीराच्या वाढीसाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी अतिशय गरजेचा असतो. सकस आहार न मिळाल्यामुळे कुपोषण होऊन लहान मुले मृत्यू पावल्याच्या घटना आपण नेहमी वर्तमानपत्रांतून वाचत असतो. पेशींच्या वाढीसाठी लागणारी ऊर्जा, मेद, प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे इत्यादी गोष्टी अन्नामधून पुरवल्या जातात. ‘कॅन्सर आणि आहार’ हा विषय हाताळताना शास्त्रीय दृष्टिकोनातून तपासणी केली असता असे लक्षात येते की काही अन्नपदार्थ कॅन्सरजन्य आहेत तसेच कॅन्सर रुग्णांमध्ये वजन कमी होणे, भूक कमी लागणे इत्यादी गोष्टींमुळे उपचारावर परिणाम होतो.

कॅन्सर जन्य पदार्थ :

थोडे थोडके नव्हे तर तब्बल ३५ टक्के कॅन्सर हे आहाराशी निगडित असून आहारामध्ये बदल केल्यास तेवढ्या प्रमाणात कॅन्सर कमी करता येऊ शकतो.

आहार आणि लठ्ठपणा :

असंतुलित आहार, जंक फूड, खाण्याच्या वेळा न पाळणे आणि व्यायाम न करणे इत्यादी कारणांमुळे वजन वाढायला लागून लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणा वाढला की इच्छा असली तरी व्यायाम करता येत नाही आणि मग हे दुष्टचक्र सुरू राहाते.

मासिक पाळी बंद झालेल्या स्त्रियांमध्ये १० किलो पेक्षा जास्त वजन वाढल्यास शरीरातील estrogen मध्ये वाढ होते. परिणामी स्तनाचा आणि गर्भाशयाचा (endometrium) कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. लठ्ठपणामुळे स्तनाचा आणि गर्भाशयाचा (endometrium), सर्विक्ष (cervical), स्वादुपिंड व पित्ताशय इत्यादी कॅन्सर होतात.

मेद/ चरबी :

शरीराला लागणाऱ्या कॅलरीज या कार्बोहायड्रेट्स, मेद व प्रथिने यांपासून मिळतात. मेद किंवा चरबीतून मिळणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा कमी असले पाहिजे. आहारात चरबीचे प्रमाण जास्त - तेही प्राण्यांच्या चरबीचे- असेल तर स्तन, कोलोन, प्रोस्टेट व गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

मांसाहार विरुद्ध शाकाहार :

शाकाहारी लोकांमध्ये मांसाहारी लोकांपेक्षा ८ टक्के कॅन्सर कमी प्रमाणात आढळतो. त्यामुळे शुद्ध शाकाहारी आहार केव्हाही उत्तम.

पाश्चिमात्य आहार विरुद्ध भारतीय आहार :

पाश्चिमात्य आहारामध्ये चरबीयुक्त अन्न - मांस, मटण, अंडी, डेअरी प्रोडक्टस् - चीज, बटर, तसेच स्वीट्स - चॉकलेट इत्यादी रिफायनरी कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते त्यामुळे कॅन्सरचे – त्यातही अन्ननलिकेच्या कॅन्सरचे - प्रमाणही जास्त आहे. भारतीय आहारामध्ये फळे, भाजीपाला, कडधान्ये, मासे, पोल्ट्री चिकन इत्यादी गोष्टी असतात त्यामुळे कॅन्सरचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

कॅन्सर झाल्यानंतरचा आहार : ‘अरे काही होत नाही रे… झाला तर पाहू’ या आपल्या भारतीय मानसिकतेनेच आपले जास्त नुकसान केले आहे. संतुलित आहार घ्यावा, दररोज फिरायला जावे, असे डॉक्टरांनी कितीही सांगितले तरी कोणीही ते मनावर घेत नाही. एखादा डॉक्टर फारच मागे लागला तर आपण डॉक्टर बदलू पण स्वत:ला नाही बदलणार. परंतु कॅन्सरचे निदान झाले तर रुग्ण त्याच्याशी दोन हात करण्यासाठी काहीही करायला तयार होतात... डॉक्टर सांगतील ती पथ्ये पाळतात. या सर्व मानसिकतेचा विचार करून कॅन्सरचे उपचार चालू असताना आहारामध्ये बदल करून कॅन्सर पूर्णपणे बरा करता येऊ शकतो का, या प्रश्नाची उकल करण्याकरिता बऱ्याच पाश्चिमात्य देशांनी संशोधन केलेले असून त्याचे उत्तर दुर्दैवाने ‘नाही’ असे आहे.

आता तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्की येईल की, सकस आहाराची गरज नाही का? इथे अजिबात गोंधळून जाण्याची गरज नाही. सकस आहार हा कॅन्सरवरील उपचारांचा अविभाज्य घटक आहे. शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिओथेरपी हे उपचार शरीरास हानीकारक असतात. त्यामुळे उपचारांदरम्यान सकस आहार घेणे गरजेचे असते.

पथ्ये :

उपचार सुरू असताना बऱ्याच रुग्णांची तक्रार असते की उलटीसारखे वाटते, भूक लागत नाही, पोट भरल्यासारखे वाटते... मी माझ्या रुग्णांना नेहमी एकच पथ्य सांगतो ते म्हणजे भरपूर जेवण घ्या. तळलेले तेलकट, तिखट पदार्थ वर्ज्य करावे. आपल्याकडे बऱ्याच रुग्णांना दिवसातून दोन किंवा तीन वेळा जेवण्याची सवय असते. ती उपचारांदरम्यान थोडीशी बदलून दर दोन तीन तासांनी छोटी छोटी जेवणं घेतल्यास रुग्णांना फायदा होतो.

‘अहो डॉक्टर, आम्ही नेहमी रुग्णाच्या मागे लागतो जेवणासाठी पण हा/ही जेवत नाही,’ अशी नेहमी नातेवाईकांची प्रेमळ तक्रार असते आणि ते खरेही आहे. परंतु आपण रुग्णाची मानसिकता समजून घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा रुग्णांची इच्छा असूनदेखील त्रास होत असल्याकारणाने त्यांना खाता येत नाही. अशा वेळी रुग्ण आणि नातेवाईक या दोघांनी समजूतदारपणा दाखवणे गरजेचे असते. रुग्णांच्या नातेवाईकांना माझा इतकाच सल्ला आहे की रुग्ण म्हणजे लहान मूल समजावे व त्याच्या कलाने घ्यावे.

किमोथेरपी चे उपचार घेताना आहाराबाबत विशेष लक्ष द्यावे व उपचाराच्या सुरुवातीलाच आपल्या डॉक्टरशी बोलून काही पथ्ये असतील तर ती विचारून घ्यावीत कारण किमोथेरपीच्या काही औषधांसोबत विशिष्ट आहार चालत नाहीत. रेडिओथेरपीचे उपचार घेताना काही विशेष पथ्याची गरज नसते. भरपूर जेवण घ्यावे. तळलेले तेलकट, तिखट पदार्थ वर्ज्य करावे, प्रमाणापेक्षा थंड किंवा गरम खाऊ नये.

मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आहारतज्ञाकडून आहाराचे वेळापत्रक बनवून घ्यावे व त्याचे पालन करावे. उपचारादरम्यान बऱ्याच रुग्णांना नाकातून किंवा पोटातून नळी टाकलेली असते. अशा वेळी मिक्सर अन्न बारीक करून दोन अडीच लिटर दिवसाला रुग्णास द्यावे.

काय खावे?

आहारामध्ये फळे, भाजीपाला, कडधान्ये, मासे इत्यादी गोष्टी खाण्यास प्राधान्य द्यावे. कारण यामध्ये कॅन्सरजन्य गोष्टींवर मात करणारे अँटी ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे व खनिजे, फायबर, पोटॅशियम, कॅरोटीन हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.

डॉ. दिलीप निकम

विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग,

कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई

[email protected]

Updated : 18 Aug 2017 4:24 AM GMT
Next Story
Share it
Top