Home > हेल्थ > पंचकर्म नेमके कशासाठी?

पंचकर्म नेमके कशासाठी?

पंचकर्म नेमके कशासाठी?
X

पंचकर्म ही आयुर्वेदाची एक सर्वांगिण अशी उपचारपध्दती आहे. प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली ही उपचार पद्धती आहे. यामध्ये रोग बरा होण्यासाठी एखादे औषध देऊन शरीरातच तो रोग जिरवून न टाकता तो रोग शरीरातून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे रोग समूळ नष्ट होतो. अर्थात तो रोग पुन्हा डोकं वर काढत नाही व रोग समूळ नष्ट होतो. अशा रीतीने रोग शरीरातून बाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेला ''शोधन क्रिया'' म्हटले जाते.

मात्र त्याचबरोबरच रोगानुसार

बृहन

लंघन

स्नेहन

रूक्षण

स्वेदन

स्तंभन

हे सहा उपक्रमही केले जातात.

परंतु पंचकर्म उपचारात

  • वमन
  • विरेचन
  • बस्ती
  • नस्य
  • रक्तमोक्षण

हे प्रमुख व अत्यंत महत्त्वाचे असे उपचार आहेत. प्रत्येक रुग्णाला हे पाचही उपचार केलेच पाहिजे, असे आवश्यक नाही. रुग्णाची प्रकृती, आतापर्यंत झालेली मोठमोठी आजारपणे, वय, कुठला ऋतू सुरू आहे या सर्वांचा विचार करून वैद्य रुग्णाला नेमका कुठला उपचार द्यायचा हे ठरवतात. पंचकर्मामध्ये वात, पित्त आणि कफ या तीन दोषांचे शोधन करायचे असते. वात, पित्त व कफ हे तीन दोष संतुलित असतील तर कोणताही रोग होत नाही. मात्र यांच्यापैकी एखादाही दोष वाढला असेल तर, शरीरात रोग निर्माण होत असतो. हे तीन दोष वाढण्याच्यादेखील वेगवेगळ्या श्रेणी असतात. त्यानुसार उपचार निश्चित केला जातो.

साधारणतः अन्न पचन न होणे, तोंडाला चव नसणे, स्थूलपणा, ऍनिमिया, जडत्व, अंग गळून जाणे, अंगावर पित्त उठणे, सर्वांगास कंप सुटणे, सर्व अंग जखडणे, कामात लक्ष न लागणे, अतिशय आळस येणे, थोडे श्रम करताच दम लागणे, अकारण अशक्तपणा येणे, सर्वांगास दुर्गंधी येणे, वारंवार कफ होणे, वारंवार पित्त होणे, निद्रानाश किंवा अतिशय झोप येणे, नपुंसकता येणे, वाईट स्वप्ने पडणे, शरीराचा वर्ण काळवंडणे ही लक्षणे दिसलीत तर पंचकर्म उपचार देणे अतिशय लाभकारक असते.

पंचकर्म उपचार करताना रोग्याची शक्ती पाहिली जाते. हे उपचार सोसण्याची ताकद रुग्णामध्ये असली पाहिजे. वात, कफ व पित्त हे तीन दोष शरीरात वाढले असतील. सर्व शरीरात पसरले असतील व ते साम अवस्थेत असतील तर ते दोष वाढलेले असूनदेखील पंचकर्माद्वारे तसेच्या तसे बाहेर काढता येत नाहीत. साम अवस्थेतील रोग्याचे शोधन केल्यास रोग्याला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. यासाठी पाचन, स्नेहन व स्वेदन हे तीन पूर्व उपचार केले जातात व तद्नंतर पंचकर्म उपचार केले जातात. वैद्यांनी सांगितलेले पथ्य व इतर सूचनांचे पालन करणे शक्य नसेल तर, पंचकर्म करू नये आणि स्वतःच्या मनाने तर अजिबात करू नये.

पंचकर्माचा अधिकाधिक लाभ व्हावा म्हणून काही सूचना

  • अतिशय मोठ्या आवाजात बोलू नये
  • कुठल्याही वाहनाने प्रवास करू नये
  • जास्त चालू-फिरू नये
  • एकाच जागी जास्त बसून वा पडून राहू नये
  • अति खाणे किंवा अजीर्ण टाळावे
  • वैद्यांनी सांगितलेलाच आहार घ्यावा
  • ब्रह्मचर्याचे पालन करावे

पंचकर्माने रोग शरीरातून समूळ नष्ट होतो. परंतु काही इतरही याचे फायदे आहेत. शरीरात अग्नी प्रदीप्त होतो. शरीराला व मनाला स्वस्थता मिळते. इंद्रिये प्रसन्न होतात. मन व बुद्धी आपापल्या कार्यांमध्ये उत्कर्ष करतात. शरीराचा वर्ण व कांती उजळते. त्वचा तजेलदार दिसू लागते. कार्यशक्ती म्हणजे स्टॅमिना वाढतो. शरीर पुष्ट व भारदार होते. वृद्धावस्था लवकर येत नाही. संतती नसलेल्यांना संततीप्राप्ती होते. निरोगी अवस्थेत दीर्घायुष्य मिळते. पंचकर्म उपचार तज्ज्ञ व्यक्तिच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावा. त्याने दुष्पपरिणाम होत नाहीत. हे सर्व फायदे मिळवायचे असतील तर पंचकर्म उपचार वर्षातून किमान एकदा तरी करून घेतलाच पाहिजे.

डॉ. सतिश सुर्यवंशी, आयुर्वेदाचार्य आणि पंचकर्म तज्ज्ञ

Updated : 18 May 2017 6:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top