Home > हेल्थ > ध्यान म्हणजे काय...?

ध्यान म्हणजे काय...?

ध्यान म्हणजे काय...?
X

‘ध्यान’ म्हणजे सतत बडबड करणाऱ्या अस्वस्थ मनाला शांत करणे. त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो. ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे. डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते. त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ती, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य, मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.

ध्यानाचे फायदे -

आध्यात्मिक स्वास्थ्य हे मूळ आहे आणि शारीरिक आरोग्य हे फळ आहे. ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षीस आहे. ध्यानामुळे आपण स्वत:ला खूप काही देऊ शकतो.

आजारांवर उपाय –

शारीरिक पीडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वतेमुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक ऊर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याने येते. ध्यानाने आध्यात्मिक ऊर्जा, आध्यात्मिक विवेकज्ञान मिळाल्यानंतर त्यातून बुध्दीमत्तेचे विकसन साध्य होते. मानसिक चिंता ताबडतोब लोप पावतात. परिणामस्वरूप शारीरिक आजारही नियंत्रणात येतात.

स्मरणशक्ती वाढते -

ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक ऊर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ती जबरदस्त वाढते. म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठीशाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर ध्यान नितांत आवश्यक आहे.

वाईट सवयी नष्ट होतात -

खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू वगैरेचे व्यसन इ. सवयी बऱ्याच जणांना असतात. ध्यानाद्वारे प्राप्त आध्यात्मिक ऊर्जा अशा सवयींपासून आपल्याला दूर नेते.

मन आनंदी होते -

कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेली व्यक्ती जीवनातील पराभव-अपमानांना लीलया तोंड देऊ शकते. वेदना सहन करण्याची, तिच्यावर मात करण्याची क्षमता तिच्यात येते. म्हणूनच ध्यान करणारी व्यक्ती नेहमी शांत व आनंदी असते.

कार्यक्षमता वाढते -

आध्यात्मिक ऊर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.

झोपेचे तास कमी होतात -

ध्यानात मुबलक आध्यात्मिक ऊर्जा मिळविली जाते. त्या मानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.

दर्जेदार नातेसंबंध-

आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्परसंबंध फारसे समाधानकारक व दर्जेदार नसण्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.

विचारशक्ती वाढते -

आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ती मिळवितात आणि सर्व इच्छा नाट्यपूर्ण रीतीने प्रत्यक्षात येतात.

जीवनाचा उद्देश -

आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेवून, विशेष कामाकरिता. विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.

ध्यानामधली ताकद व सामूहिक ध्यान -

जेव्हा १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेव्हा त्यांच्या ऊर्जालहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात. आइन्स्टाईनने शास्त्रीय मांडणीतून सांगितले आहे की एका अणूचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो. हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली होती. आपणसुद्धा ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.

Updated : 27 July 2017 7:18 PM GMT
Next Story
Share it
Top