Home > Governance > धक्कादायक : मेट्रोच्या जीवघेण्या कामाला कोण जबाबदार?

धक्कादायक : मेट्रोच्या जीवघेण्या कामाला कोण जबाबदार?

धक्कादायक : मेट्रोच्या जीवघेण्या कामाला कोण जबाबदार?
X

देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि याच मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे चेंबूर. आज आपण पाहतो आहोत देशभरात शहरांच्या विकासाचे वारे आहे. हे वारे देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत सुद्धा आहे. मुंबईच्या विकासासाठी आतापर्यंत सागरी महामार्ग, कोस्टल रोड, मोनो रेल, मेट्रो असे अनेक प्रकल्प राबवण्यात आले. अनेकांची कामे तर अद्याप सुरु आहेत. यात मागच्या अनेक वर्षांपासून मुंबई मेट्रोच्या कामाची मोठी चर्चा आहे. हीच मेट्रो सर्वसामान्यांच्या जीवावर बेतत आहे. चेंबूर या ठिकाणी सध्या Esci नगर ते मांडाले या मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. अगदी मोठ्या गतीने हे काम सुरु आहे. पण या ठिकाणी कोणतीच सुरक्षेची काळजी घेलती जात नाही आहे. आज अत्यंत भयंकर प्रकार घडला. क्रेन ने उचललेली भली मोठी लोखंडी पाईप अचानक क्रेनमधून सटकली आणि खाली पडली, खाली एक कर्मचारी उभा होता. त्यावेळी भर रस्त्यात कुणाकडूनही वाहन न थांबवता क्रेनने पाइप उचलण्याचे काम सुरु होते. धक्कादायक म्हणजे मेट्रोचे काम ज्या ठिकाणी सुरु आहे . तिथे दोन्ही बाजूने पत्रे लावले जातात पण या ठिकाणी या पत्र्यांच्या बाहेर ही क्रेन उभी होती, बाजूने वाहतूक देखील सुरु होती. काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोणाचाही जीव जाऊ शकतो. मग या निष्काळजीपणाला जबाबदार कोण? सरकार आणि कंत्रादार लोकांच्या जीवाशी खेळणं कधी थांबवणार? नक्की काय प्रकार घडला पाहू..

अचानक क्रेनमधून निसटलेली लोखंडी पाईप थेट कर्मचाऱ्याच्या अंगावर पडली..

चेंबूर नाका येथून काही अंतर पुढे आल्यानंतर तिथे मेट्रोचे काम सुरु आहे. आपल्याला माहित आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारे मेट्रोचे काम सुरु आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूने पत्रे लावलेले आहेत. या पत्र्यांच्या आत मध्ये हे काम चालतं तर त्याच्या दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी रस्ता आहे. या ठिकाणी कामासाठी मोठमोठ्या क्रेन, मोठमोठे मशीन देखील आणले गेले आहेत. अनेक कामगार या ठिकाणी काम करण्यासाठी आहेत. दिवसरात्र हे काम या ठिकाणी सुरु असतं आता काम फास्ट होत आहे याच आपल्याला जरी कौतुक वाटत असलं तरी हेच मेट्रोचं काम आज जीवघेणे ठरत आहे. एक भयंकर प्रकार घडला. या ठिकाणी एका क्रेनच्या माध्यमातून एक मोठा लोखंडी पाइप उचलण्याचे काम सुरु होते. हे काम जे पत्रे लावले आहेत त्याच्या आत मध्ये चालू असणं अपेक्षित होतं मात्र ही क्रेन त्या पत्र्याच्या बाहेर म्हणजे रस्त्यावर उभी होती. क्रेनच्या कडेने संपूर्ण वाहतूक सुरु होती. या क्रेनने उचललेला मोठा पाईक एका जाड पट्याने बांधलेला होता..



अचानक त्या पाइपचा वरचा भाग तुटला आणि त्या पट्यातून तो पाइप निसटला व वरून तो सरळ खाली पडला. क्रेनच्या समोर एक कामगार उभा होता. वरून आलेला पाइप कडेला लावलेले पत्रे तोडून रस्त्यावर क्रेनच्या समोर उभ्या असलेल्या माणसाच्या अंगावर पडला. क्षणात माणूस जमिनीवर कोसळला. त्या ठिकाणी कामगारांची मोठी धावपळ सुरु झाली, रस्त्यावर येणारे जाणारे काही लोक त्याच्या मदतीला गेले. त्या ठिकाणाहून १०८ या नंबरला देखील कॉल केला. मेट्रोचं काम करणारा तो कर्मचारी काही सेकंद तसाच निपचित अवस्थेत पडलेला होता. त्यानंतर त्यांचे सहकारी त्या ठिकाणी आले व त्यांनी त्याला उचलले. त्याच्या डोक्याजवळ इजा झाली होती. खरंतर अगदी थोडक्यात तो व्यक्ती बचावला. काही वेळानंतर आम्ही त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याने बोलण्यास नकार दिला..


या जीवघेण्या निष्काळजीपणाला जबादार कोण?

ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी प्रत्यक्ष दर्शनीच्या अंगावर शहारे आले होते. रस्त्यावरून अनेक वाहने जात होती. खरं तर असं काम सुरु असताना बाजूने जाणारी वाहतूक थांबवणे गरजेचे होते. ज्यावेळी ही लोखंडी पाईप पडली त्यावेळी काहीच अंतरावर एक रिक्षा देखील जात होती. चुकून कोणाच्या अंगावर किंवा कोणत्या वाहनावर ही पाईप पडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. मग या निष्काळजी पणाला जबाबदार कोण? सरकार आणि कंत्राटदार लोकांच्या जीवाशी खेळणं कधी थांबवणार? सरकार व कंत्राटदार कोणती मोठी दुर्घटना घडण्याची किंवा हकनाक कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत का? त्यामुळे आता लवकरात लवकर या घटनेला जबाबदार संबधीतांवर कारवाई झाली पाहिजे इतकीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.




या घटने बाबत मेट्रो अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?

या संपूर्ण घटने संदर्भात आम्ही मेट्रोचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास (Chief Secretary and Metropolitan Commissioner, MMRDA SVR Shrinivas) यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी, या घटनेत आमचा सुरक्षा रक्षक जखमी झाला असून आम्ही काम करत असताना सर्व प्रकारची काळजी घेत असतो. रात्री- अपरात्री आपल्याकडे काम सुरु असते. भरपूर ठिकाणी ऍक्सीडेन्ट झाले आहेत. त्यामुळे याबाबत आपण संपूर्ण काळजी घेतो. या ठिकाणी घडलेल्या घटने संदर्भात रिपोर्ट मागवला आहे. दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी MaxMaharashtra सोबत बोलताना सांगितले..

Updated : 4 March 2023 3:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top