Home > Fact Check > Fact Check : १०५ तासात ७५ किलोमीटर रस्ता पुर्ण केल्याचा नितीन गडकरी यांचा दावा खोटा?

Fact Check : १०५ तासात ७५ किलोमीटर रस्ता पुर्ण केल्याचा नितीन गडकरी यांचा दावा खोटा?

केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी 105 तासात 75 किलोमीटर रस्ता पुर्ण केल्याचा दावा केला आहे. तर या रस्त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाल्याचा दावा केला आहे. पण हा दावा खरा आहे का? नितीन गडकरी खोटं बोलले आहेत का? जाणून घेण्यासाठी वाचा...

Fact Check : १०५ तासात ७५ किलोमीटर रस्ता पुर्ण केल्याचा नितीन गडकरी यांचा दावा खोटा?
X

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. मात्र नितीन गडकरी यांनी अमरावती ते अकोला दरम्यान 75 किलोमीटर लांबीचा रस्ता 105 तासात पुर्ण केल्याचा दावा केला आहे. मात्र सोशल मीडियातून नितीन गडकरी यांचा दावा फेक असल्याचे म्हटले जात आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

दहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग (NH-53) वरील अकोला ते अमरावती दरम्यान लोणी ते मुर्तीजापुर हा रस्ता अत्यंत खराब झाला होता. या महामार्गासाठी नागरिकांनी अनेक आंदोलनं केली. त्यानंतर या रस्त्याचे काम सुरू झाले. तर 105 तासात 75 किलोमीटर रस्त्याचे काम पुर्ण केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच हे गिनीज बुक रेकॉर्ड असल्याचे म्हटले आहे. तर या दाव्यानंतर नितीन गडकरी यांनीही अशाच प्रकारे दावा केला आहे.

नितीन गडकरी यांचा दावा

नितीन गडकरी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, NHAI टीमचे अधिकारी, सल्लागार आणि राजपथ इन्फ्राकॉम प्रायव्हेट लिमिटेड आणि जगदीश कदम यांनी 75 किलोमीटर बिटूमीनस काँक्रीट रस्ता पुर्ण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त केल्याबद्दल या टीमचे अभिनंदन. तसेच हा संपुर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.

पुढे नितीन गडकरी म्हणाले आहेत की, राष्ट्रीय महामार्ग (NH-53) अकोला ते अमरावती दरम्यान सिंगल लेनमध्ये पुर्ण करण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या आमच्या अभियंत्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानतो, असं मत व्यक्त केलं आहे.

तसेच तुमच्या चिकाटी, मेहनत आणि घामावर New India चे व्हिजन तयार होत आहे. त्यामुळे संपुर्ण देशाला तुमचा महान आहे. महान कार्य चालू ठेवा, असंही गडकरी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

आझादी का अमृत महोत्सवी वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली समृध्द वारसा साजरा करत असल्याचे नितीन गडकरी यांनी ट्वीट केले आहे. तर याआधी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या विक्रमी वेळेत रस्त्याचे काम पुर्ण केले असल्याचे म्हटले आहे.

अमृत महोत्सव या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरूनही नितीन गडकरी यांनी केलेल्या दाव्यासारखाच दावा केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा रस्ता 75 नाही तर 80 किलोमीटर असल्याचा दावा केला आहे. त्याबरोबरच हा रस्ता 108 तासात पुर्ण केल्या असल्याचा दावा केला आहे.

चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्वीटला कोट करून विश्वजीत देशमुख यांनी म्हटले आहे की, बरेच दिवस झाले यावर लिहायचं होतं. कारण अकोला ते अमरावती दरम्यानचा मुर्तीजापूर ते लोणी हा राष्ट्रीय महामार्ग (NH-53) हा रस्ता 75 किंवा 80 किलोमीटरचा नसून तो 30 ते 34 किलोमीटरचा असल्याचा दावा केला आहे. तसेच हा रस्ता आम्ही नेहमी वापरत असल्याचा दावाही विश्वजीत देशमुख या ट्वीटर वापरकर्त्याने केला आहे. त्याबरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपच्या लोकांनी केलेला दावा मिसलिडिंग असल्याचे मत विश्वजीत देशमुख यांनी आपल्या ट्वीटमध्ये मांडले आहे.

NH-53 हा राष्ट्रीय महामार्ग मुंबई ते कोलकत्ता या दोन शहरांना जोडणारा रस्ता असून तो 1950 पुर्वीचा असल्याचेही विश्वजीत देशमुख यांनी आपल्या ट्वीटर थ्रेडमध्ये म्हटले आहे. तर या रस्त्याचे 30 किलोमीटर अंतर आधीच पुर्ण झाले आहे. याबरोबरच या रत्याचे कामही आता नाही तर 2012 पासून सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र गडकरी यांनी केलेला दावा खोडून काढायला आघाडीकडून कोणीही पुढे आले नसल्याचे मत विश्वजीत देशमुख यांनी मांडले आहे. तसेच या रस्त्याचे गुगल मॅपवर जाऊन व्हेरिफाय करण्याचे आवाहनही विश्वजीत देशमुख यांनी केले आहे.

विश्वजीत देशमुख यांच्या दाव्यावर प्रतिक्रीया देतांना @Pankaj_speak94 या ट्वीटर वापरकर्त्याने या दाव्याचे समर्थन केले आहे. तसेच या दोन गावांमधील अंतर हे 32 ते 35 किलोमीटरपेक्षा जास्त नसल्याचा दावा केला आहे.

@JR_Social1 या ट्वीटर अकाऊंटवरूनही विश्वजीत देशमुख यांच्या ट्वीटर थ्रेडवर मत व्यक्त केले आहे. त्यामध्ये त्यांनी गडकरी हे मोदी यांचे फेकूगिरी करण्यातील सर्वात मोठे स्पर्धक असल्याचे म्हटले आहे. तसेच गडकरी यांनी रस्ता मोजण्याचा सरकारी फॉर्म्युलाच बदलला असल्याचे म्हटले आहे. पुर्वी 100 किलोमीटर रस्ता चार लेनमध्ये बनवला तर तो 100 किलोमीटर गणला जायचा. मात्र आता 100 किलोमीटर रस्ता बनवला तर तो 400 किलोमीटर मानतात, असा दावा केला आहे.

त्यावर प्रतिक्रीया देतांना विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे की, यानुसार सिंगल लेन 75 किलोमीटरचा दावा केला आहे.

पडताळणी

मॅक्स महाराष्ट्रने नितीन गडकरी यांनी केलेल्या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी सुरूवातीला राष्ट्रीय महामार्ग (NH-53) या रस्त्यावरील मुर्तीजापुर ते लोणी दरम्यानचे अंतर गुगल मॅपवर तपासले. तर गुगल मॅपनुसार हे अंतर 49.2 किलोमीटर इतके दाखवण्यात आले आहे. तर लोणी-अकोला- मुर्तीजापुर या रस्त्याने हे अंतर 48.7 किलोमीटर इतके आहे.





नितीन गडकरी यांनी दावा केल्याप्रमाणे हे अंतर 75 किलोमीटर इतके आहे. ज्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचा दावा केला जात आहे. त्याप्रमाणे हा रस्ता सिंगल लेन 75 किलोमीटर असल्याचे म्हटले आहे. मात्र लोणी ते मुर्तीजापुर या रस्त्या 48.2 किलोमीटर अंतराचा असेल तर सिंगल लेन रस्ता 75 किलोमीटर होऊ शकतो का? याची मॅक्स महाराष्ट्रने पडताळणी केली.

जर 100 किलोमीटर रस्ता 4 लेन मध्ये केला तर नितीन गडकरी यांच्या दाव्याप्रमाणे 400 किलोमीटर इतक्या अंतराचा होईल.

त्यानुसार 48.2×4 हे अंतर 192.8 किलोमीटर इतके होते.

निष्कर्ष

सदर पडताळणीत आढळून आलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग (NH-53) नुसार लोणी ते मुर्तीजापुर रस्त्या 75 किलोमीटर नसून 48.2 किलोमीटर इतका आहे. तर नितीन गडकरी यांनी दावा केल्याप्रमाणे हा रस्ता 4 लेनमध्ये मोजला तर 192.8 किलोमीटर इतके अंतर होते. त्यामुळे या रस्त्याविषयी नितीन गडकरी यांनी केलेला दावा अवास्तव असल्याचे दिसून येत आहे. मात्र या रस्त्याच्या कामाच्या वेगाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला असल्याचे प्रमाणपत्र सादर केले असले तरी त्यात दावा केल्याप्रमाणे या रस्त्याचे अंतर चुकीचे आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्यासह रोहित पवार आणि भाजपचे नेते खोटी माहिती पसरवत असल्याचे दिसून आले आहे.

Updated : 18 Jun 2022 2:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top