Home > Fact Check > fact check : आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्यावर आरक्षण रद्द करा असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते का?

fact check : आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्यावर आरक्षण रद्द करा असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते का?

ज्या दिवशी कुणी आदिवासी महिला भारताच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती पदावर पोहोचेल त्यानंतर देशात आरक्षण रद्द केलं पाहिजे असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होत. असा मजकूर व्हायरल होतोय. पण खरच बाबासाहेब असं म्हणाले होते का? जाणून घेण्यासाठी वाचा.

fact check : आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्यावर आरक्षण रद्द करा असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते का?
X

एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या. या निवडणुकीत यूपीए चे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या त्यांनी पराभव केला. सोमवारी सकाळी त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती पदाची शपथ घेणाऱ्या त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला ठरल्या. गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर कुठल्याही महत्वपूर्ण घटनेबद्दल काही संदेश किंवा फोटो व्हायरल होतात.





सद्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंसह काही माहिती व्हायरल होत आहे. ज्यात बाबासाहेबांच्या फोटोखली एक मजकूर हिंदीमध्ये लिहिला आहे तो असा, "जिस दिन कोई आदिवासी महिला भारत के सर्वोच्च पद राष्ट्रपति तक पहुंच जाएगी। देश में आरक्षण खत्म कर दिया जाना चाहिए। " डॉ. भीमराव रामजी अंबेडकर"

ज्याचा मराठीत अर्थ पाहिला तर तो असा होतो, "ज्या दिवशी कुणी आदिवासी महिला भारताच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती पदावर पोहोचेल त्यानंतर देशात आरक्षण बंद केलं पाहिजे असं डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होत. दुसऱ्या बाजूला त्याच फोटोत नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचा फोटो आहे आणि त्याखाली त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

पण प्रश्न असा आहे की खरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते का? किंवा असं लिखाण त्यांनी केलं होतं का? हेच जाणून घेण्यासाठी आम्ही आंबेडकरी साहित्याचे संपादक तसेच ज्येष्ठ अभ्यासक प्रा. हरी नरके यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी ते म्हणाले, "डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणून फिरवले जाणारे हे विधान बनावट, काल्पनिक नी खोटे आहे. बाबासाहेबांनी असे कधीही म्हटलेले वा लिहिलेले नाही. बाबासाहेबांच्या लेखन आणि भाषणे खंड १ते २२ मध्ये हे विधान नाही. अशी विधाने देताना त्याचे संदर्भ, म्हणजे पुस्तकाचे नाव, पृष्ठ क्रमांक द्यायचे असतात.ते इथे दिलेले नाही. कारण ते बनावट आहे. बाबासाहेबांच्या नावे अशी फेक विधाने अफवा व कुजबुज गँगच्या आयटी सेलकडून सतत फिरवली जातात. यामागे बुद्धिभेद करण्याचे दुष्ट मानस असते." प्रा. हरी नरके हे बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या ग्रंथ मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक राहिले आहेत.

याशिवाय बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आम्ही संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले की "जो मजकूर त्या फोटोवर व्हायरल होतोय तो साफ खोटा आहे. असं काहीही बाबासाहेब आंबेडकर म्हणालेले नाहीत."






यासह ज्येष्ठ इतिहासकार राम पूनियानी यांच्याशी देखील आम्ही या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले की, " असं नाहीये कारण जेव्हा आरक्षण आलं होत ते फक्त 10 वर्षासाठीच त्याची तरतूद करण्यात आली होती. बाबासाहेबांचा संबंध त्यामुळे मी सांगू इच्छितो की त्यांनी आरक्षण 10 वर्षानंतर रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्यावर आरक्षण रद्द करा असं बाबासाहेबांनी म्हणणं शक्यच नाही."





आंबेडकरी साहित्याचे संपादक प्रा. हरी नरके, खुद्द बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर आणि ज्येष्ठ इतिहासकार राम पूनियानी या सगळ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि द्रौपदी मुर्मू यांच्या फोटोसोबत व्हायरल होत असलेला मजकूर खोटा असल्याचे म्हटल आहे.

Updated : 25 July 2022 2:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top