Home > Fact Check > Fact Check: "नेहरूंनी माझ्या पाठीत वार केला" असं JRD TATA यांनी खरंच म्हटलं होतं का?

Fact Check: "नेहरूंनी माझ्या पाठीत वार केला" असं JRD TATA यांनी खरंच म्हटलं होतं का?

टाटा कंपनीने एअर इंडिया पुन्हा एकदा विकत घेतली. मात्र, या दरम्यान सोशल मीडियावर पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबाबत आणि जेआरडी टाटा यांच्याबाबत अनेक दावे केले जात आहेत. काय आहे या दाव्यांची सत्यता वाचा...

Fact Check: नेहरूंनी माझ्या पाठीत वार केला असं JRD TATA यांनी खरंच म्हटलं होतं का?
X

टाटा कंपनीने एअर इंडिया खरेदी करण्यासाठी 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली. Air India ही विमानसेवा 1932 मध्ये JRD टाटा यांनी स्थापन केली होती. त्यावेळी ही विमानसेवा 'टाटा एअर सर्व्हिसेस' म्हणून ओळखली जात होती. दरम्यान, भारत सरकारने 1953 मध्ये एअर कॉर्पोरेशन कायदा पास केला होता. टाटा सन्सकडून भागभांडवल विकत घेतले. मात्र, टाटा 1977 पर्यंत अध्यक्ष राहिले. 11 ऑक्टोबर 2021 रोजी Tata Group द्वारे नियंत्रित कंपनी Tales Private Limited ने Air India आणि Air India Express साठी बोली लावली आणि त्यांनी Air India ची खरेदी केली.

दरम्यान हे सगळं होण्यापुर्वीच सोशल मीडियावर एअर इंडिया टाटाकडे परत जाईल अशी अटकळ लावली जात असताना आनंद रंगनाथन यांनी एक ट्विट केलं आहे. आनंद रंगनाथन यांच्या मते, जेआरडी टाटा म्हणाले, "माझे स्वतःचे मित्र नेहरूंनी माझ्या पाठीवर वार केला. या संदर्भात योग्य सुनावणी न घेता एवढं महत्वाचं पाऊल उचलले गेले. याबद्दल मी फक्त माझे दुःख व्यक्त करू शकतो."

त्यांच्या या ट्विटला सुमारे 30 हजार लोकांनी लाईक्स आणि 8 हजार लोकांनी रीट्वीट्स केले आहे. आनंद रंगनाथन यांनी याअगोदर सुद्धा भ्रामक माहिती शेअर केलेली आहे.

आनंद रंगनाथन यांचं हे ट्विट द इकॉनॉमिक टाइम्स, आज तक, ईस्ट मोजो आणि बिझनेस टुडे यासारख्या विविध माध्यमांच्या रिपोर्टमध्ये दिसून आलं.

काय आहे सत्य...

आनंद रंगनाथन यांनी आपल्या ट्विटमध्ये, जेआरडी टाटांबद्दल जो काही हवाला दिला. त्याचा कोणताही सार्वजनिक संदर्भ नाही. मात्र, असं दिसून आलं की दोन वेगवेगळ्या वाक्यांना एकत्र करून हे ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटमधील वाक्यांपैकी फक्त एक वाक्य जेआरडी टाटा यांच्याशी जोडलं जाऊ शकतं.

2014 च्या ब्लॉगवरून घेतलेलं पहिले विधान...

गुगलवर कीवर्ड सर्च केल्यावर असं दिसून आलं की, हा दावा 2014 पासून केला जात आहे.

'SRajah Iyer's Blog' नावाच्या ब्लॉगवर हे वाक्य आढळलं. ब्लॉगमध्ये अनेक दावे करण्यात आले आहेत. तसेच लेखनात अनेक चुका देखील आहेत. मात्र, आम्ही केवळ या विधानाच्या सत्यतेवर लक्ष केंद्रित केलं.

या ब्लॉगनुसार,

"जवाहरलाल नेहरूंनी 1953 मध्ये टाटा एअरलाइन्सचे राष्ट्रीयीकरण केले होते. जेआरडींना हे सहन होत नव्हतं. तेव्हा त्यांनी त्याच्या डायरीत लिहिलं, "माझ्या स्वतःच्या जवळच्या मित्राने माझ्या पाठीत वार केला." आणि जखमेवर मीठ चोळत नेहरूंनी जगजीवन राम नावाच्या विदूषकामार्फत या राष्ट्रीयीकरणाची माहिती दिली. जर एअरलाइन्स टाटाच्या अखत्यारीत असत्या तर काय झाले असते हे इतिहासाला माहीत आहे..."

ब्लॉगच्या लेखकानुसार जेआरडी टाटा यांच्या डायरीतुन हा संदर्भ लिहिलेला आहे.

दरम्यान, हे लक्षात घ्यायला हवं की, योग्य वाक्प्रचार 'stabbed me in the back' असा आहे. रंगनाथन यांच्या ट्विटमध्ये हीच व्याकरणाची चूक आढळून आली आहे. मात्र, हा कोट बनावट असल्याचं सिद्ध झालं नसलं तरी शंका निर्माण होते. जेआरडी टाटा यांच्या लेखनाशी परिचित असलेल्या कोणालाही अशी चूक होण्याची शक्यता नगण्य आहे. हे माहित असेल.


दिवंगत लेखक रुसी एम. लाला यांनी जेआरडी टाटांबद्दल टाटा चरित्र आणि इतर पुस्तकांच्या स्वरूपात विस्तृत लेखन केलेल आहे. रुसी एम. लाला 1974 मध्ये टाटा समूहात सामील झाले आणि 2003 मध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्टचे संचालक म्हणून निवृत्त झाले. शिवाय, उपलब्ध साहित्याद्वारे असं दिसून येतं की, टाटा आणि लाला खूप जवळचे मित्र होते.

दरम्यान, 2000 साली रुसी लाला यांनी 'The Joy of Achievement: Conversations with JRD Tata' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात टाटा यांनी त्यांच्या "वैयक्तिक डायरी" मधून एक विनोद वाचला. असा डायरीचा उल्लेख आहे.


मात्र, संपुर्ण टाटांच्या जीवनाचा विचार केला तर त्यांच्या डायरीचा संदर्भ असलेला हा एकमेव प्रसंग आहे. तसेच, या पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना, स्वत: जेआरडी टाटा यांनी आपण कोणतीही डायरी ठेवत नव्हतो. असं स्पष्टपणे म्हटलं आहे.


याशिवाय, जेआरडी टाटा यांचे चरित्र 'बियॉन्ड द लास्ट ब्लू माउंटेन: ए लाइफ ऑफ़ जेआरडी टाटा' मध्ये सुद्धा ते कोणतीही डायरी वापरत नसल्याचं स्पष्ट होतं.


दुसरं वाक्य...

टाटांनी तत्कालीन पंतप्रधान नेहरूंना पाठवलेल्या 1952 च्या टेलिग्राममध्ये हे विधान पाहिलं जाऊ शकतं. यावेळी ते हवाई वाहतूक उद्योगात होत असलेल्या बदलांबाबत आपले मनोगत व्यक्त करत होते. खरं तर, नेहरूंनी टाटा यांना पत्र लिहून टाटा एअरलाइन्सच्या राष्ट्रीयीकरणाबाबत आपले मत व्यक्त केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून टाटा यांनी हा टेलिग्राम पाठवला, ज्यातून हे दुसरं वाक्य घेतलं गेलं आहे.


पत्रात जेआरडी टाटा यांनी नेहरूंना सांगितले की, त्यांना जगजीवन राम यांच्याकडून धोरणांमध्ये झालेल्या बदलाची माहिती मिळाली. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. कारण २०१४ मध्ये लिहिलेल्या त्या ब्लॉगमध्ये जगजीवन राम यांचाही उल्लेख आहे. टाटा आणि जगजीवन राम यांचे संबंध चांगले नव्हते. यावरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न ब्लॉगमध्ये करण्यात आला आहे.


1952 च्या एका टेलिग्राममध्ये जेआरडी टाटा यांनी विमान कंपन्यांच्या राष्ट्रीयीकरणाची बातमी ज्या प्रकारे आली. त्याबद्दल कोणताही राग व्यक्त केलेला नाही. जगजीवन राम 1952 ते 1956 पर्यंत केंद्रीय दळणवळण मंत्री होते. मात्र, टाटा यांच्या आत्मचरित्राच्या आधारे असे म्हणता येईल की, टाटा आणि जगजीवन राम यांचे चांगले संबंध होते. रुसी एम. लाला यांनी असं लिहिलं आहे की, "जेआरडी हे जगजीवन राम यांच्या कार्यपद्धतीवर खूप प्रभावित होते. जगजीवन रामा यांचं कोणतंही काम मागे राहिलेल नाही. तसेच, त्यांना जगजीवन रामांबद्दल सर्व काही माहीत होतं.' असा उल्लेख करण्यात आलं आहे.

टाटा एअरलाइन्स, राष्ट्रीयीकरण आणि पंतप्रधान नेहरूंबद्दल जेआरडी टाटा यांचे विचार...

ज्येष्ठ पत्रकार राजीव मेहरोत्रा यांनी 1987 मध्ये जेआरडी टाटा यांची एक मुलाखत घेतली होती. त्यावेळी ती दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. 1987 ची ही मुलाखत टाटा सन्सच्या वेबसाइटवर आणि मेहरोत्रा च्या यूट्यूब चॅनेलवर देखील उपलब्ध आहे.

या मुलाखतीत (जवळजवळ 3 मिनिटांवर) राजीव मेहरोत्रा यांनी विचारलं,

"तुम्ही स्वतःच मूल्यांकन कसं करता?" टाटा यांनी उत्तर दिलं - "माझ्या अंदाजानुसार, मी स्वतःला खूप खालच्या पातळीवर समजतो. मात्र, माझ्यासाठी गोष्टी अतिशयोक्तीपूर्ण आहेत. मला वाटत नाही की, मला मिळालेल्या मैत्रीला मी पात्र आहे .. मैत्री नाही… मैत्री हा चुकीचा शब्द आहे. कौतुक, आदर जो मला दिला जातो. शेवटी, मी माझ्या आयुष्यात जे काही केले आहे, कदाचित, वैयक्तिकरित्या एका छोट्या मेल एअरलाइनमधून एअर इंडिया बनवण्याशिवाय काहीही केलेलं नाही.. मी कधीही पूर्णपणे नवीन काही तरी स्वतः तयार केलं नाही. मला हे पद वारशाने मिळालं आहे..." मात्र, हे अगदी स्पष्ट आहे की ते टाटा एअरलाइन्सशी भावनिकरित्या जोडलेले आहेत.

एअरवेजच्या राष्ट्रीयीकरणाबद्दल त्यांचं मत चांगल्या पद्धतीने नोंदवलं गेलं आहे. ते त्यांच्या बाजूने नव्हते. मात्र, रुसी एम. लाला यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, "मागे वळून पाहताना, जेआरडी टाटा यांना असं वाटतं की, परिस्थिती अशी झाली होती की, एअरवेजच्या राष्ट्रीयीकरणाला टाळता येणार नाही. मात्र, काही वर्षांनंतर खासगी उद्योजकांकडून चालवल्या जाणाऱ्या या उद्योगाबाबत सरकारचा काय दृष्टिकोन होता, हे त्यांनी सांगितलं आहे."

जेआरडीच्या यांच्या आत्मचरित्रावरून एक बाब स्पष्टे होते. ती म्हणजे, जेआरडी टाटा नेहरूंना वयाच्या 20 व्या वर्षापासून ओळखत होते. त्यावेळी नेहरूंचे वय 36 वर्षे होते. नेहरूंविषयी त्यांचं प्रेम आणि आदर त्यांच्या चरित्रात अनेक वेळा नमूद केला गेला होता. परस्पर स्नेह असूनही, दोघेही अनेक विषयांवर एकमेकांशी असहमत असायचे. आगामी काळात समाजवाद आणि अर्थशास्त्र भारतासाठी कसे फायदेशीर ठरेल? या विषयावर दोघांचे अनेकदा वेगवेगळे मत होते.

निष्कर्ष:

एकूणच, आनंद रंगनाथन यांनी दिवंगत जेआरडी टाटा यांच्या नावाने एक दिशाभूल करणारं ट्वीट केलं आहे. जे अनेक माध्यमांनी पडताळणीशिवाय प्रकाशित केलं आहे. जेआरडी टाटा राष्ट्रीयीकरणाच्या बाजूने नव्हते. मात्र, टाटा एअरलाइन्सच्या राष्ट्रीयीकरणानंतर त्यांनी "नेहरूंनी माझ्या पाठीत वार केला" असं म्हटल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.

या संदर्भात Alt news ने Fact check केलं आहे.


Updated : 14 Nov 2021 12:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top