Home > Election 2020 > भाजपात इनकमिंगची दहशत !!!

भाजपात इनकमिंगची दहशत !!!

भाजपात इनकमिंगची दहशत !!!
X

२०१९च्या निवडणुका या समजण्या पलिकडे आहेत अशी चर्चा सर्वत्र सूरू आहे. लोकसभा निवडणुकांच्या काळात भाजपमध्ये नेते मंडळींच इनकमिंग सुरु झालं ते थांबायचं नावच घेत नाही. भाजपची ही मेगाभरती चांगलीच गाजली. सत्तेच्या हव्यासापोटी मोठया प्रमाणात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दिग्गज नेते मंडळीनी सत्ताधारी पक्षात उडया घेतल्या. त्यामुळे राष्ट्रवादीचा बुरुज ढासळला. एका मागे एक नेते साथ सोडून जाऊ लागले म्हणुन खुद्द शरद पवार प्रचारासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्राच्या या निवडणुकांना वेगळा रंग आला आहे.

पाहुयात मेगाभरती पुर्वी कोणत्या पक्षाचे किती आमदार होते.

- भाजपा- १२२

- शिवसेना- ६३

- राष्ट्रवादी काँग्रेस- ४२

- काँग्रेस- ४१

- बहुजन विकास आघाडी- ३

- भारतीय शेतकरी संघटना आणि पक्ष- ३

- अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमी- २

- भारिप बहुजन महासंघ- १

आता आपण पाहुयात की, कोणी-कोणी घडयाळाची टिक-टिक सोडून भाजपचं कमळ हातात घेतलं...

विखे पिता-पुत्र यांनी काँग्रेसला राम राम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, आमदार वैभव पिचड, आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार संदीप नाईक, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, काँग्रेसचे माजी आमदार कालिदास कोळंबकर, नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे माजी महापौर संदीप नाईक यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या प्रवेश सोहळ्यात राजकीय नेत्यांबरोबरच महात्मा फुले यांच्या वारस नीता होले आणि माजी पोलीस अधिकारी साहेबराव पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला कारण रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सुद्धा भाजप प्रवेश केला. दिल्लीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थित उदयनराजे यांनी पक्षप्रवेश केला. काही पदाधिकाऱ्यांनीही साथ सोडली. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडलं आहे.

सध्या भाजप मध्ये गर्दीच गर्दी झाली आहे. कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त झालेत. त्यामुळे भाजपच्या जुन्या निष्ठावंत नेत्यांमध्ये आता धाकधुक वाढली असुन मेगाभरतीचा पहिला फटका अहमदनगरचे भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांना बसला. नवनिर्वाचित ङाॕ. सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी दिली ते निवङून ही आले मात्र निवडणूकी दरम्यान गांधी समर्थक आक्रमक झाले होते.

तर इकडे नवी मुंबईत भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांचा पत्ता नेते गणेश नाईक यांच्या पक्ष प्रवेशामुळे कट झाला. जालन्यात रावसाहेब दानवे यांना सुद्धा या मेगाभरतीची धास्ती भरली आहे. दानवे म्हणात की, या मेगाभरतीमुळे आम्हीच बाहेर पडतोय की काय यांची भिती वाटतं आहे. अदभुत पक्षप्रवेशामुळे पुण्यात जागा ८ आणि इच्छुक उमेदवार १३० अशी परिस्थिती निर्माण झालीय. भाजपने अजुनही प्रवेशासाठी दारं खुली ठेवली म्हणुन भाजपचे अनेक नेते नाराज आहेत. केद्रींय मंत्री नितीन गडकरी यांनीही आयारामांवर खोचक टोला लगावला. "ज्याप्रमाणे जहाज बुडताना आधी उंदीर बाहेर पडतात त्याचप्रमाणे सत्ता बदलली की अनेकजण पक्ष बदलतात. परंतु ही गोष्ट योग्य नाही असे लोक कधीच इतिहास घडवू शकतं नाही.”

तर काही निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी तर बंडाचीच भाषा केलीय. रक्ताचं पाणी करुन पक्ष मोठा केला. नवीन येणाऱ्या लोकांच खपवून घेणार नाही असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

या मेगाभरतीवर असंख्य चर्चा झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मेगाभरतीवर विनोद करत आमचं सरकार येणार आहे कारण गेलेली माणसं ही राष्ट्रवादीचीच आहेत. आमचा पक्ष भ्रष्टाचारी आहे तर पक्षप्रवेश झाल्यानंतर ही नेते मंडळी वाॕशिग मशिन मध्ये धुतली जातात का? असा सवाल उपस्थित केला आहे.

या मेगाभरतीचा फायदा-तोटा कुणाला?

‘ही’ भरती काँग्रेस-राष्ट्रवादीची गळती मानली तरी भाजपसाठी एवढे नेते समाधानी ठेवणं मोठं दिव्यच आहे. अतंर्गत गटबाजी चव्हाटयावर येऊ लागली आणि काही नाराज पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशही केला. इनकमिंगमुळे तिकीटासाठी राबणाऱ्यांचे हात मात्र रिकामेच राहतील. राष्ट्रवादी आता नवा चेहरा फॉर्म्युला वापरत आहेत. याच उदाहरण खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि व्याख्याते अमोल मिटकरी अनेक प्रसिद्ध मंडळींची नाव राष्ट्रवादीत घेतली जात आहेत.

भाजपाला मिळणार का घरचा आहेर?

भाजपात येणाऱ्यांची संख्या वाढली म्हणून जे आहेत त्यांना डावललं जातं आहे असं भाजपाचे मंडळी सांगतात. नवीन येणाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं म्हणुन अनेक निष्ठावंत नाराज आहेत. त्यांनी बंड केला तर भाजपाला मोठा फटका बसु शकतो. अचानक पक्षातंर करणारे नेते मंडळी हे जुन्यांपेक्षा अधिक प्रिय कसे होतात असा सवाल भाजपमधुन केला जातोय.

जसा २०१९च्या लोकसभेचा निकाल अनाकलनिय होता तसाच काहीसा प्रकार पक्षांतराबाबत घडतं आहे. निम्मी राष्ट्रवादी भाजपात गेल्याने भाजपा राष्ट्रवादीमय झाला आहे. आता मतदारांचा चिन्हांचा गोंधळ झाला नाही म्हणजे बरं !

Updated : 26 Sep 2019 4:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top