Home > Politics > मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्राला दीर्घकाळ लक्षात राहतील आणि निधी मिळाला नाही, हा फुटीर आमदारांचा रडीचा डाव आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

शिवसेनेचे फुटीर आमदार हे अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आता दोष देत असले तरी त्यांच्या मतदारसंघाला किती पैसे मिळाले, याची आकडेवारी पाहिली की सत्य लक्षात येईल. सर्वाधिक निधी एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात दिला असून एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याला १२ हजार कोटींचा निधी दिला गेला असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना शिवसेनेच्या आमदारांना केवळ सहा टक्के निधी मिळाला होता. ९४ टक्के निधी भाजपने घेतला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने शिवसेनेच्या आमदारांना कधीही निधी कमी पडू दिला नाही, असे सांगत जयंत पाटील यांनी फुटीर आमदारांच्या मतदारसंघांसाठी किती निधी दिला याची यादीच वाचून दाखवली. पण ज्यांना जायचेच आहे, त्यांनी जाताना रडीचा डाव खेळला, हेच यातून दिसून येते, असाही आरोप जयंत पाटील यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर "सरकार येते आणि जाते. पण सरकार घालविण्याची ही जी पद्धत आहे ती महाराष्ट्राला भूषणावह नाही," अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी लोकांशी संवाद साधून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. एक सरळ, चांगला, लोकांची काळजी घेणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला होता. आज त्यांनी पायउतार होताना घटक पक्षांचे आणि सर्वांचेच आभार मानले. कोरोना काळात एक मुख्यमंत्री किती चांगले काम करु शकतो, याचा आदर्श उद्धव ठाकरे यांनी देशासमोर ठेवला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या दीर्घकाळ लक्षात राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Updated : 30 Jun 2022 3:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top