Home > Politics > भारत देश तुमची मालमत्ता नाही, उध्दव ठाकरे यांचा मोदींवर निशाणा

भारत देश तुमची मालमत्ता नाही, उध्दव ठाकरे यांचा मोदींवर निशाणा

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना संघराज्य पध्दती नष्ट होत असून देश गुलामगिरीकडे जात असल्याचं म्हणत मोदींवर निशाणा साधला.

भारत देश तुमची मालमत्ता नाही, उध्दव ठाकरे यांचा मोदींवर निशाणा
X


देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देश गुलामगिरीकडे जात असल्याची टीका करत उध्दव ठाकरे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते मार्मिकच्या 62 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले की, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. पण स्वातंत्र्य म्हणजे काय? जिथं मुक्तपणे मत मांडता येतं. त्याला स्वातंत्र्य म्हणतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशात सरकार असलेल्या पक्षाचे अध्यक्ष देशात प्रादेशिक पक्षांना संपवणार असल्याचे म्हटले. मग जर प्रादेशिक पक्ष संपवायचे असतील तर देशातील संघराज्य पध्दती त्यांना मान्य नाही का? असा सवाल ठाकरे यांनी केला.

पुढे ठाकरे म्हणाले की, देश तुमची मालमत्ता नाही. मात्र सध्या देश गुलामगिरीकडे जात असल्याची टीकाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

राज्यात महिनाभरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रीमंडळाचा विस्तार केला. मात्र या घटनेला पाच दिवस उलटून गेल्यानंतरही मंत्र्यांचं खातेवाटप करण्यात आलं नाही. त्यावरून उध्दव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्र सोडले. ते मार्मिक साप्ताहिकाच्या 62 व्या वर्धापन दिनी बोलत होते.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, देशात महागाई वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे आहे, राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, पण मंत्री कुठं आहेत? असा सवाल करत सध्या सगळे मंत्री बिनखात्याचे आहेत. त्यामुळे हाच शिंदे-फडणवीस सरकारचा आझादी का अमृत महोत्सव आहे का? असा सवाल उध्दव ठाकरे यांनी यावेळी केला.

उध्दव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आज मार्मिकला ६२ वर्ष झाली आणि माझं वय पण ६२ आहे. तसंच मार्मिक अजूनही चिरतरूण आहेत. त्यामुळे मार्मिक आणि शिवसेना हे तरुणांचे आकर्षण आहे. त्याबरोबरच व्यंगचित्र काय करु शकते? याचे उदाहरण शिवसेना आहे. मार्मिकने शिवसेनेची बीजं पेरली, अस्वस्थ मन हेरल आणि शिवसेना जन्मली नंतर सामनाचा जन्म झाला, अशी माहिती उध्दव ठाकरे यांनी दिली.

शिवसेना नसती तर मुंबईत मराठी माणसांचं आणि देशात हिंदूंच काय झालं असतं? असा सवाल यावेळी उध्दव ठाकरे यांनी केला. तसंच मराठी माणसांवर अन्याय होत असताना त्यावर वाचा फोडण्याचे काम मार्मिकने केले, असंही ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या काळात जे काम शाहीर करायचे. तेच काम सध्या व्यंगचित्रकार करतात. मात्र सध्या फटकारे मारणारे किती व्यंगचित्र आहेत? असा सवाल करत उध्दव ठाकरे यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना डिवचले.

उध्दव ठाकरे म्हणाले की, मुंबई महाराष्ट्राची झाल्यानंतर अस्वस्थ मनाला वाचा फोडण्याचं काम व्यंगचित्रकार करू शकतो. हे काम मार्मिकने केले असंही यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले.

व्यंगचित्रकार बदलतात, माणसं बदलतात, काळ बदलतो मात्र परिस्थिती तिच राहते, अशा स्वरुपाचं बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेलं व्यंगचित्र दाखवलं. तसंच स्वतःच्या जिंदाबादाने सत्ताधाऱ्यांचे कान बधीर झाले असले तरी भारतमातेची किंकाळी त्यांच्या कानावर जाईल का? असं व्यंगचित्र बाळासाहेब ठाकरे यांनी काढलं होतं. त्या व्यंगचित्रांच्या जुन्या आठवणींना ठाकरे यांनी उजाळा दिला.

घर घर तिरंगावर उध्दव ठाकरे यांचा निशाणा

उध्दव ठाकरे यांनी हर घर तिरंगा या अभियानावर टीका करताना व्हॉट्सअपवर आलेल्या व्यंगचित्रांचा दाखला दिला. त्यामध्ये एक व्यक्ती अधिकाऱ्याला माझ्याकडे तिरंगा आहे. पण घर नाही, असं म्हणतानाच्या व्यंगचित्राचा दाखला दिला..

भाजपच्या नव्या प्रदेशाध्यांवर थेट हल्ला

उध्दव ठाकरे यांनी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावात कितीही कुळं असु द्या. मग ते 52 असो की 152. त्यांची कितीही कुळं आली तरी शिवसेना संपणार नसल्याचे वक्तव्य करत उध्दव ठाकरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्ला चढवला.

राज्यात महागाई आहे, बेरोजगारी आहे, काही भागात अतिवृष्टी आहे. मात्र यानंतरही राज्याला मंत्र्यांचे खातेवाटप झाले नाही. मंत्री खात्याविना आहेत. त्यामुळे ते आझाद आहे. हाच मंत्र्यांचा आझादी का अमृत महोत्सव आहे का? असा सवाल ठाकरे यांनी केला.

व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांचं उदाहरण देत हिटलर लंडनवर बाँबफेक करत असताना लो व्यंगचित्र काढायचे. त्यामुळे हिटलर त्रस्त झाले होते. ते बाँबने लोक घायाळ होत नसतील त्यापेक्षा अधिक हिटलर डेव्हिड लो यांच्या व्यंगचित्राने घायाळ होत असायचा, असा संदर्भ ठाकरे यांनी दिला.


शिवसेना रस्त्यावर पडलेली वस्तू नाही

उध्दव ठाकरे म्हणाले की, शिवसेना ही रस्त्यावर पडलेली वस्तू नाही. जी कुणीही उचलून नेऊ शकतो, असं म्हणत एकनाथ शिंदे यांना ठाकरे यांनी टोला लगावला.

Updated : 13 Aug 2022 3:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top