Home > Politics > 'हा अहंकाराचा पराभव आहे' ; कृषी कायदे मागे घेतल्यानंतर सामनातून केंद्र सरकारवर निशाणा

'हा अहंकाराचा पराभव आहे' ; कृषी कायदे मागे घेतल्यानंतर सामनातून केंद्र सरकारवर निशाणा

हा अहंकाराचा पराभव आहे ; कृषी कायदे मागे घेतल्यानंतर सामनातून केंद्र सरकारवर निशाणा
X

मुंबई : मोदी सरकारनं काल तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी याबाबत घोषणा केली. गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर तीन कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. अखेर या आंदोलनाला यश मिळालं. जवळपास वर्षभर केंद्र सरकारनं शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं यावरून शिवसेनेनं सामनामधून केंद्र सरकारचा समाचार घेतला. हा अहंकाराचा पराभव आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं मोदी सरकारवर निशाणा साधला.

शेतकरी लढत राहिले, शहीद झाले व शेवटी जिंकले असं सामनातून म्हटले आहे. 13 राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यातून आलेलं हे शहाणपण आहे. शेतकरी खलिस्तानवादी अतिरेकी होते तर मग पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकवले?, असा सवाल शिवसेनेनं सामनातून उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे अखेर तिन्ही कृषी कायदे मागे घेणे केंद्र सरकारला भाग पडले आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे. मागे हटणार नाही असे सांगणाऱ्यांचा अहंकार पराभूत झाला, पण आताही अंध भक्त बोलतील, ''काय हा साहेबांचा मास्टर स्ट्रोक!'', असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली पंजाब, उत्तर प्रदेश, हरयाणातील शेतकरी गाझीपूर-सिंघू बॉर्डरवर आंदोलनासाठी बसला , तेव्हा त्या आंदोलनाकडे केंद्र सरकारने संपूर्ण दुर्लक्ष केले. त्या शेतकऱ्यांचे वीज, पाणी बंद केले. दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांच्या टोळ्या पाठवल्या. तरीही शेतकरी जागचे हटले नाहीत. तेव्हा शेतकऱ्यांना खलिस्तानवादी, पाकिस्तानवादी, दहशतवादी ठरवून बदनाम केले.असा घणाघात सामनातून करण्यात आला.

लखीमपूर खिरी येथे केंद्रीय मंत्रिपुत्राने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना चिरडून मारले. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी साधा शोकही व्यक्त केला नाही. आज मात्र 'शेतकरी मरू द्या, आजन्म आंदोलन करू द्या, पण सरकार एक पाऊलही मागे हटणार नाही,' या आडमुठेपणाचा त्याग करून सरकारने कायदे मागे घेतले आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल या भीतीने मोदी सरकारने आता कृषी कायदे मागे घेतले. असा घणाघात शिवसेनेने केला.

देशातील सर्वच सार्वजनिक उपक्रम विकण्यात आले. विमानतळे व बंदरेही भांडवलदारांच्या हाती गेली. दोन-चार लोकांच्या अहंकारातून देशाची प्रतिष्ठा रसातळाला जात आहे.असं सामनात म्हटले आहे.

'महाभारत' आणि 'रामायणा'त शेवटी अहंकाराचाच पराभव झाला हे सध्याचे नकली हिंदुत्ववादी विसरले. मात्र, 13 राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यातून आलेले हे शहाणपण आहे.

''सरकारला हे तीन काळे कायदे मागे घ्यावेच लागतील, मी काय म्हणालो हे लक्षात ठेवा'' असे राहुल गांधी जानेवारीत म्हणाले होते. राहुल गांधींना 'पप्पू' म्हणून हिणवणाऱ्यांनीही हे आता लक्षात घेतले पाहिजे. असं सामनातून म्हटले आहे.

Updated : 20 Nov 2021 3:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top