मोदी सरकारमधील एका पक्षाचे राज ठाकरेंना आव्हान, मशिदींना देणार संरक्षण
X
मशिदींवरील भोंग्यांवरुन राज ठाकरे यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सरकारने मशिदींवरील भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राने देशपातळीवर धोऱण ठरवावे, अशी भूमिका मांडली आहे. यानंतर मनसेने आपण अल्टिमेटमवर ठाम असल्याचे सांगितले आहे. एकीकडे भाजपने राज ठाकरे यांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या रामदास आठवले यांच्या पक्षाने मात्र आता राज ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे.
राज ठाकरे यांनी तीन तारखेला मशीदीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन केल्यानंतर आता आरपीआय आठवले गट आक्रमक झाला आहे. राज ठाकरे यांची भूमिका चुकीची असल्याचे सांगत तीन तारखेला आरपीआयचे सर्व कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी मशिदी आहेत त्या ठिकाणी रक्षणासाठी उभे राहणार करणार असल्याची माहिती आरपीआयचे नेते विवेक कांबळे यांनी दिली आहे.
"कोणत्याही एखाद्या जातीवर हल्ले करून आपली राजकीय पोळी भाजायची हे आता चालणार नाही. बाळासाहेबांच्या काळात लोक अडाणी होते, त्यावेळी लोक घाबरत होते. त्यावेळी लोकांवर अत्याचार करून पक्ष वाढवला. आज महागाई वाढली आहे, रोजगार नाही यावर त्यांनी बोलावे लोकांची चूल पेटवायची काम त्यांनी करावे चूल विझवण्याचे काम त्यांनी करू नये." असा इशाराही कांबळे यांनी दिला आहे.