Home > Politics > लॉकडाऊनमुळे केंद्र आणि राज्य सरकारची दुकानदारी जोरात, राज ठाकरे यांचा टोला

लॉकडाऊनमुळे केंद्र आणि राज्य सरकारची दुकानदारी जोरात, राज ठाकरे यांचा टोला

लॉकडाऊनमुळे केंद्र आणि राज्य सरकारची दुकानदारी जोरात, राज ठाकरे यांचा टोला
X

"लॉकडाऊन लावून सरकारचं बरं चाललं आहे. मोर्चे नाही, आंदोलने नाहीत, कोणतीही झंझट नाही. दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं, या शब्दात राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे. पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीआधी पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांवर टीका केली.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना जनगणनेसाठी निवडणूका स्थगित करण्यास आपला पाठिंबा आहे सरकारलाच आता निवडणुका नको आहेत का, तेही तपासले पाहिजे असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. पुणे महानगरपालिकेच्या तयारीसाठी मनसे तयारीला लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या सर्व मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होत आहेत. या महिन्यातील राज ठाकरे यांचा पुण्याचा 8 वा दौरा आहे.

राज ठाकरे यांनी येथील 8 विधानसभा मतदारसंघातील शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवण्यावर सर्व पक्षांचं एकमत झालं आहे. त्यावर तुमचं मत काय?, असा सवाल राज यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. "निवडणुका स्थगित ठेवल्या पाहिजे. पण काम पटकन होणार असेल तर स्थगिती मान्य आहे. सरकारच्या फायद्याचं असेल म्हणून आता निवडणुका घेतल्या जात नसतील. यात काही काळंबेरं असेल तर तेही समजून घ्यायला पाहिजे. सरकारलाच या निवडणुका नको आहेत आता. कारण नंतर सरकारच महापालिका चालवणार. कारण त्यावर प्रशासक नेमणार आणि सरकारच सर्व काम बघणार. हे सर्व उद्योगधंदे चालू आहेत. नुसता ओबीसींचा विषय पुढे करून सरकार काही साध्य करतेय असं नको. पण जनगणना वगैरे झाल्यावर निवडणुका घ्यायला काही हरकत नाही," असं राज म्हणाले. सरकारकडे यंत्रणा आहे. त्यामुळे मनात आणलं इम्पिरिकल डेटा किंवा जनगणना हे सर्व होऊ शकतं. ती काही कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

"गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत?"

यावेळी त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्यावरही मनसेची भूमिका स्पष्ट केली. सरकारचे त्या त्या पक्षाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तिकडे गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवाला गर्दी चालत नाही. नियम असेल तर तो सर्वांना सारखा हवा. तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमाला गर्दी चालणार. फक्त गणेशोत्सवाला नको. ही कोणती पद्धत?, असा सवाल करतानाच गणेशोत्सव कसा साजरा करायचा की नाही हे मंडळं ठरवतील. गणेशोत्सव मंडळांशी बोलून चर्चा करू, असं ते म्हणाले. हे कुठपर्यंत चालणार? या लॉकडाऊनमुळे जे चाललं ते बरं चाललं असं सर्व सरकारला वाटतंय. आंदोलने नाही, मोर्चे नाही, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचे नाही, रस्त्यावर कुणी उतरायचे नाही. काही झंझटच नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकाने चालवा. बरं चाललंय सरकारांचं. केवळ कोरोनाची भीती दाखवली जात आहे. तिसरी चौथ्या लाटेची भीती दाखवली जात आहे. भीती दाखवून सरकार सर्व करत असेल तर हे कुठपर्यंत चालणार?, असा सवालही त्यांनी केला. लहान मुलांचं लसीकरण पूर्ण झालं नसेल तर शाळा कशा उघडणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Updated : 5 Sep 2021 6:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top