राज्यापालांच्या टोपीचा रंग आणि...शरद पवार यांचा टोला
X
मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोक काढले तर मुंबई महत्त्व संपून जाईल, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. विविध राजकीय पक्षांच्या लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. "मी त्याच्या फार खोलात जात नाही, कारण राज्यपालांच्या डोक्यावर जी टोपी आहे, त्या टोपीचा रंग आणि त्यांचे अंत:करण त्याच्यात काही फारसा फरक नाही. मुंबई आणि महाराष्ट्र बाकी जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या लोकांना घेऊन जाणारे राज्य आहे. इथे जी मुंबईची प्रगती झाली ती सर्वसामान्य माणसाच्या कष्टातून झाली, घामातून झाली. असे असताना अशा प्रकारची विधान करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल काय बोलायचे हे सांगणे कठीण झालंय. याआधीही एकदा महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल भयानक स्टेटमेंट त्यांनी केलं. आताही त्यांनी वेगळ्या पद्धतीने पुनरावृत्ती केली.", अशी टीका टीव्ही नाईनशी बोलताना शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली.
एकीकडे शरद पवार यांनी राज्यपालांचा निषेध केला आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसने यावर राज्यपालांविरोधात जोडेमारो आंदोलन सुरू केले आहे. एवढेच नाही तर हे जोडे राज्यपालांना भेट म्हणून पाठवले जाणार आहेत, असेही राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आणि विरोधक त्याचे राजकारण करत आहेत, असे स्पष्टीकरण राज्यपालांतर्फे देण्यात आले आहे.






