शरद पवार : तेव्हा झोपा काढत होतात का? फडणवीसांना सवाल
X
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आपण बोलणार नाही पण महापालिका निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय व्हायला नको, अशी भूमिका मांडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला एक आवाहन केले आहे. देशात ओबीसींची जनगणना एकदा कराच आणि ओबीसींची संख्या किती आहे त्यानुसार त्यांना हक्क त्यांना मिळवून द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्याचवेळी शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. पाच वर्ष आपण सत्तेमध्ये होतात तेव्हा झोपले होतात का, असा सवाल पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. “इथे कोणी फुकट काही मागायला येत नाही, ज्यांचा जो हक्का आहे तो त्यांना मिळाला पाहिजे” असे सांगत शरद पवार यांनी मोदी सरकारकडे ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेची मागणी केली.
पण मागे पाच वर्षे राज्यात आणि केंद्रात तुमच्या हातात सत्ता असताना तुम्ही झोपला होतात का? त्यामुळे तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. आज भाजपचे लोक काहीही बोलत असले तरी त्यांच्या मनातली मळमळ स्पष्ट दिसत आहे. या लोकांकडून ओबीसींना न्याय मिळेल, याची कोणतीही शक्यता नाही.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 25, 2022
पण देशातील सरकारची मानसिकता वेगळी असल्याने ओबीसी जनगणनेचा निर्णय होईल असे वाटत नाही, अशीही टीका त्यांनी केली. पण त्यासाठी सर्वांनी रस्त्यावर येण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले. Rssचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी एका ठिकाणी बोलताना जातीनिहाय जनगणना आपल्याला अजिबात मान्य नाही असे सांगत, यामुळे समाजातील एकी नष्ट होण्याची भीती असल्याचे कारण सांगितल्याचा दाखला शरद पवार यांनी दिला. पण सत्य समोर आले तर वातावरण खराब का होईल असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर जातीनिहाय जनगणनेने अस्वस्थता निर्माण होईल असे कुणाला वाटले तर ही अस्वस्थता निर्माण करण्यासाठी जे करावं लागेल ते करण्यासाठी आपण मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
जातींच्या जनगणनेमुळे जर समाजात अस्वस्थता येत असेल तर त्यावर जे काही करावे लागणार असेल ते करण्याची आमची तयारी आहे. त्याशिवाय न्याय मिळणार नाही. यासाठी जागृती करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. आमची भूमिका अतिशय स्पष्ट असून जे करावे लागेल, ते करायचे आमची तयारी आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 25, 2022






