Home > Politics > शरद पवार – विविध मार्गांनी फडणवीस यांनी माणसं आपलीशी केली

शरद पवार – विविध मार्गांनी फडणवीस यांनी माणसं आपलीशी केली

शरद पवार – विविध मार्गांनी फडणवीस यांनी माणसं आपलीशी केली
X

राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालाकडे राज्य तसेच देशाचं लक्ष होतं. मध्यरात्री झालेल्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने निश्चित केलेले संजय पवार यांचा भाजपचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे. भाजपचे तीन सदस्य निवडून आले असून, महाविकास आघाडीचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. पुण्यात माध्यमांशी संवाद साधत शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्या.

'भाजपच्या एकाही मताचा धक्का महाविकास आघाडीला बसलेला नाही आणि मला धक्का बसेल असा हा निकाल नाही .प्रत्येक उमेदवाराच्या मतांच्या संख्येनुसार राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या कोट्यामध्ये काही फरक पडलेला नाही. एक मत प्रफ्फुल पटेल यांना जादा पडले आहे आणि ते कुठून आलं आहे हे मला ठाऊक आहे . ते महाविकास आघाडीचं नाही' . असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.

भाजपच्या विजयावर बोलताना शरद पवार यांनी सांगितले की राज्यसभेच्या शिवसेनेने लढवलेल्या सहाव्या जागेसाठी मतांची संख्या कमी होती. तिथेच फरक वाढत होता पण आम्ही धाडसाने प्रयत्न केला. तसे अपक्षांची संख्या भाजपकडे जास्त होती आमच्याकडे कमी होती पण दोघांना पुरेल इतकी नव्हती. त्यामुळे भाजपने आम्हाला पाठिंबा देणारे जे इच्छुक असतील त्यांना आपल्याकडे वळवण्यात यश संपादन केलं आहे ,त्यामुळे विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आहे हे मान्य केलं पाहिजे.

निवडणूक आयोगाला पत्र लिहून महाविकास आघाडीच्या तीन मतदारांची मते बाद करण्याची मागणी भाजपने केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने रात्री उशीरा मतमोजणीस सुरुवात केली. याबाबतही शरद पवार बोलले आहेत "रात्री जी हरकत घेण्यात आली रडीचा खेळ होता. राज्यसभेच्या निर्मितीच्या नियमानुसार मतदाराने पक्षाच्या नेतृत्वाला मत दाखवायचे असते. त्यामुळे जर कोणी नाना पटोले आणि जयंत पाटील यांना मत दाखवले तर यामध्ये बेकायदेशीर काही नाही. याबाबत निवडणुक आयोगाने निर्णय दिला. पण निकाल येण्यासाठी चार तास उशीर झाला," असे शरद पवार म्हणाले.

सरकारच्या स्थिरतेवर याचा परिणाम होतो का विचारले असता "अपक्ष आमदारांमध्ये या गमती झालेल्या आहेत, सरकार चालवण्यासाठी जे बहुमत हवं आहे त्याला धक्का लागलेला नाही, ते अधिकचे मत शिवसेनेला जाणार नव्हते. विरोधकांच्या कोट्यातील ते मत असून त्यांनी मला सांगूनच राष्ट्रवादीला दिले. मी शब्द टाकला तर पाळणारे तिथे अनेक लोक आहेत, पण मी त्याच्यात पडलो नाही," असे शरद पवार म्हणाले आहेत.

Updated : 11 Jun 2022 12:17 PM IST
Next Story
Share it
Top