Home > Politics > #RajThackeray : केतकी चितळेच्या विरोधात 'राजगर्जना'

#RajThackeray : केतकी चितळेच्या विरोधात 'राजगर्जना'

#RajThackeray : केतकी चितळेच्या विरोधात राजगर्जना
X

कुणीतरी केतकी चितळे नावाच्या व्यक्तीने खालच्या पातळीवर शरद पवारांवर केलेली टीका घाणेरड्या पातळीची असून ही मानसिक विकृती आहे ती वेळीच रोखा,असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केले आहे.

राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट आणि पत्र:

कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा! कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असे नाव टाकले आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.

महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुध्द तीनं किंवा त्या भावेनं हे लिहिण साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुद्धीही आपण ओळखतो.





तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत. आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरडया पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असे लिहिण ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे. तिला वेळीच आवर घालायला पाहिजे.

चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरूषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही हा राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा!

पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरु आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजल असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरण गरजेच आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्यसरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा.

आपला नम्र

राज ठाकरे

Updated : 14 May 2022 11:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top