राज ठाकरे यांनी बोलावलेला कार्यकर्ता मेळावा तूर्तास रद्द
X
राज्यात झालेल्या सत्ता बदलाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा १३ जुलै रोजी बोलावला होता. ऑपरेशन नंतर राज ठाकरे पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. त्यामुळे या मेळाव्याबाबत उत्सुकता होती. पण आता राज ठाकरे यांनी तूर्तास हा मेळावा पुढे ढकलला असल्याचे जाहीर केले आहे.
राज ठाकरे यांनी एक पत्रच सोशल मीडियाद्वारे कार्यकर्त्यांना पाठवले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की,
"आपण वास्तविक उद्या एक मेळावा आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं दिसत आहे. जनजीवन तर विस्कळीत आहेच, परंतु अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे.
अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच, थोडा पावसाचा अंदाज घेऊन, तुम्हा सर्वांना कळवली जाईलच.
दरम्यान, तुम्ही स्वतःची तर काळजी घ्या परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. मुख्यतः नदीकाठाला जिथे लोक रहात आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. सांगली कोल्हापूरकडचा आत्ता आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना? काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकते. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुद्ध पाणी, अंथरूण-पांघरूण (सर्वत्र ओल असते) पुरवावं लागेल. मुख्यतः वृध्द, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुले ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडे उन्मळून पडतात, ती नंतर पुन्हा लावावी लागतील. अशा खूप गोष्टी आहेत.
एक लक्षात घ्या की अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असे काहीही करू नका,
अर्थात, अस काही होऊ नये, कुठलंही नैसर्गिक संकट येऊ नये, हीच आपली इच्छा आहे, फक्त सतर्कतेसाठी सांगितलं.






