महाराष्ट्रानंतर इतर ३ राज्यांमध्ये ऑपरेशन लोटस?
X
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. यामागे भाजप असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राज्यपालांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले.
एवढे सगळे झाले असले तरी भाजपने मात्र मुख्यमंत्र्यांचे आरोप फेटाळले आहेत. हा वाद शिवसेनेचा पक्षांतर्गत वाद आहे. त्याच्याशी भाजपचा संबंध नाही, असा दावा राज्यातील भाजप नेते करत आहेत. पण आता भाजपच्या या नेत्यांना पश्चिम बंगालमधील एका बड्या नेत्याने खोटे ठरवले आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षामागे भाजप आहे, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले, तसेच यापुढे कोणकोणती राज्य भाजपच्या निशाण्यावर आहेत, याचीही माहिती त्यांनी भरसभेत जाहीर केली आहे.
राज्यांमधील विरोधी पक्षांची सरकार पाडून तिथे आपले सरकार बनवण्याची परंपरा भाजप यापुढच्या काळात आणखी आक्रमकपणे राबवणार असल्याचे या नेत्याने जाहीरपणे सांगितले आहे. याआधी बिहार, गोवा यासारख्या राज्यांमध्ये भाजपने अशाच प्रकारे विरोधकांची सरकारं बरखास्त करुन सत्ता स्थापन केली होती. भाजपचे पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी कुचबिहार इथल्या जाहीरसभेत एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. “आता फक्त महाराष्ट्रात घडले आहे. पुढचा नंबर झारखंडचा आहे. त्यानंतर राजस्थान आणि त्यानंतर पश्चिम बंगाल सरकार टार्गेटवर असेल” असे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे.
“Only just #Maharashtra has happened now. Next would be #Jharkhand, then #Rajasthan and then after that it will be #Bengal. Same fate awaiting them” says #BJP LOP #SuvenduAdhikari at a public meeting in Coochbehar. This comes amidst the ongoing #MaharashtraPoliticalCrisis pic.twitter.com/SMH7iaKpXz
— Tamal Saha (@Tamal0401) June 29, 2022
एकूणच विरोधी पक्षांची राज्य सरकार पाडण्याचे भाजपचे ऑपरेशन लोटस पुढच्या काळात आणखी आक्रमकपणे राबवले जाणार आहे, असेच नियोजन असल्याचे या नेत्याच्या वक्तव्यावरुन दिसते आहे. पण राज्यातील भाजप नेते या सत्तानाट्यामागे नसल्याचे सांगत असताना सुवेंदू अधिकारी यांच्या या दाव्याने भाजपच्या नेत्यांनाच खोटे पाडले आहे.






