मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?
X
शिवसेनेतील बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. या सरकारला आता जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे. पण या एक महिन्यात अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे सध्या केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच मंत्री असल्याने तेच कारभार पाहत आहे.
पण मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यावर मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी लवकरच होईल एवढेच उत्तर दिले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडणार का, अशी चर्चा असताना आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ३ ऑगस्टच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल हे आपण खात्रीने सांगतो, असे सत्तार यांनी म्हटले आहे.
"तीन तारखेच्या आत गॅरेंटीने सांगतो मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, याला कोणतीही कायद्याची अडचण नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या कमी व्हाव्यात यासाठी ३ तारखेच्या आत कधीही मंत्रीमंडळ विस्तार होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार लांबला असल्याने विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तर दुसरीकडे खातेवाटपावरुन मतभेद असल्याने विस्तार लांबला असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी ही माहिती दिल्याने लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.






