Home > Politics > आगामी निवडणूकीत एमआयएमला राज्यात कितपत संधी? समीकरणे जुळणार का?

आगामी निवडणूकीत एमआयएमला राज्यात कितपत संधी? समीकरणे जुळणार का?

महाराष्ट्रात एमआयएम ( MIM ) कोणाशी आघाडी करणार हा प्रश्न आजही कायम आहे. याअगोदर एमआयएम ने प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाशी युती केली होती. मात्र ही युती राज्याच्या राजकारणाक काही करिष्मा करु शकली नाही. आता आगामी निवडणूकीसाठी काय रणनिती एमआयएम आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आगामी निवडणूकीत एमआयएमला राज्यात कितपत संधी? समीकरणे जुळणार का?
X

दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये एमआयएमचे ( MIM ) अधिवेशन पार पडले. या अधिवेशनादरम्यान राज्यातील आगामी निवडणूकीत एमआयएम आपली ताकत आजमावण्याच्या तयारीत आहे. राज्यात जवळपास १४ ते १६ टक्के मुस्लीम मतदार आहेत. त्यांचा अंदाज घेण्यासाठी एमआयएम ने हे अधिवेशन भरवले होते. एमआयएमचे राज्यात एक खासदार आणि दोन आमदार आहेत. तर काही शहरात नगरसेवक आहेत. या आकड्यांच्या बळावर राज्यात आपली जागा शोधण्याचा प्रयत्न करताना दिसून येते आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत एमआयएमने राज्यात विधानसभेच्या ४४ जागा लढवल्या होत्या. त्यात पूर्वीच्या दोन जागा जाऊन नव्या दोन जागा मिळवल्या. आता महाराष्ट्रात एमआयएम कोणाशी आघाडी करणार हा खरा प्रश्न आहे. आता नविन मित्रांच्या शोधात एमआयएम असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील राजकारणात दोन आघाड्यांभोवतीच सध्या केंद्रीत झाले आहे. अशा वेळी ही कोण कोंडी फोडणार, यावर अनेक राजकीय गणिते अवलंबून आहेत.

एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी ( Asaduddin Owaisi ) हे हैद्राबादचे खासदार आहे. पक्षाचा आणि त्यांचा फक्त हैद्राबादमध्ये प्रभाव आहे. हैद्राबादमधील मुस्लीम भागावर एमआयएमची पकड असल्याचे दिसून येते. इतर पक्षाप्रमाणे या पक्षातून सुद्धा अनेकजण बाहेर पडले पण त्याचा पक्षावर कोणताही परिणाम झाला नाही. हैद्राबादमध्ये एमआयएमचे ५ ते ६ आमदार दरवेळी निवडून येतात. येथील महापालिकेवर त्यांची सत्ता आहे. फक्त हैद्राबादपुरता मर्यादीत असणारा हा पक्ष देशभरात पसरवण्याचे काम ओवेसे सातत्याने करताना दिसून येतात. मात्र त्यांना अद्यापही यश आलेले नाही.

एमआयएम जी मते घेतो त्यामुळे भाजपला याचा नेहमी फायदा होते, असा आरोप या पक्षावर नेहमी होत आला आहे. मात्र हा आरोप नेहमी एमआयएम फेटाळून लावतो. बिहारमध्ये २०२० च्या विधानसभा निवडणूकीत एमआयएमने दीड टक्के मते घेत पाच जाग्यांवर विजय मिळवला आहे. त्याचे सर्व विजयी उमेदवार हे मुस्लिम भागातील आहेत. मात्र उत्तरप्रदेशमध्ये एमआयएमला विधानसभा निवडणूकीत यश संपादन करता आले नाही. बिहारमध्ये एमआयएमच्या पाचपैकी चार आमदारांनी राजदची वाट धरल्याचे पाहायला मिळाले.

देशाच्या राजकारणात उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्राचा वरचश्मा असल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्रातून ४८ खासदार उत्तरप्रदेशनंतर ( Uttar Pradesh ) लोकसभेत निवडून जातात. त्यामुळे एमआयएमचे लक्ष महाराष्ट्रावर केंद्रीत झाले आहे. सध्या धुळे आणि मालेगामधून एमआयएमचे आमदार निवडून गेले आहेत. तसेच नांदेडमध्ये एमआयएमच्या उमेदवाराचा विजय थोडक्यात हुकला होता. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना झटका देण्यात एमआयएम यश मिळाले आणि कधी पत्रकारितेच्या क्षेत्रात असणाऱ्या इम्तियाज जलील हे थेट लोकसभेत पोहचले. त्यांची लोकसभेत प्रश्न मांडण्याची हातोटी कमाल आहे. त्याच्या जोरावर जलील यांची कामगिरी लक्षवेधी ठरत आहे. देशात भाजपला पराभूत करणाऱ्या प्रभावी पक्षासोबत आम्ही कधीही युती करण्यास तयार असल्याचे जलील यांनी सांगितले आहे.

राज्यात एमआयएमला आपले बस्तान बांधण्यासाठी दोन आघाड्यावर काम करावे लागणार आहे. अल्पसंख्यांक मतदार हा प्रामुख्याने काँग्रेसकडे (Congress) झुकलेला आहे. त्याला आपल्याकडे खेचणे आणि त्याला आपल्याकडे मतदानासाठी वळवून घेणे जिकरीचे काम आहे. त्यामुळे आगामी काळात एमआयएमची राज्यातील वाटचाल ही खडतर आणि आव्हानात्मक असणार आहे. एमआयएमने काही संस्थात्मक काम महाराष्ट्रात उभे केल्यास मते मिळू शकतील, असे तज्ञांचे मत आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात विस्ताराची एमआयएमची महत्त्वाकांक्षा असली तरी, संभाव्य आघाडी आणि मित्र पक्षाच्या जोरावर एमआयएम मुसंडी मारण्याची तयारी करत आहे. लोकसभा निवडणूकीला आता फक्त वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे एमआयएमला आपल्या पक्षाची राज्यातील ध्येय-धोरणे ठरवणे गरजेचे आहे.

गेल्या काही वर्षात राज्यात मुस्लीम मतदारांचे चित्र बदललेले पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून ( Shiv Sena) गेल्या वेळच्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत अल्पसंख्यांक समाजाचे नगरसेवक विजयी झाले होते. दिवसेंदिवस काँग्रेस राज्यासह देशात कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे मुस्लीम मतदारराजा भाजपाला पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाकडे आशेने बघत आहे. मुस्लीम समाजाची मोठ्या प्रमाणातील मते ही ठाकरे गटाली मिळतील अशी आशा आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत (Mumbai Municipal Corporation Election) एमआयएमला मतांसाठी संघर्ष करावा लागणार आहे. दोन दिवसांपूर्वी एमआयएमचे मुंबईत अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाच्या माध्यमातून एमआयएम आपला पक्ष मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरात हातपाय पसरण्याचे काम करत आहे. एमआयएम पक्षाचे निवडणूक चिन्ह हे पतंग ( Patang ) असल्यामुळे हा पतंग राज्यात किती उंच भरारी घेणार हे येणार काळच ठरवेल.

Updated : 1 March 2023 11:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top