Home > Politics > काँग्रेसशिवाय आघाडीची चर्चा, काँग्रेस राष्ट्रवादीवर नाराज?

काँग्रेसशिवाय आघाडीची चर्चा, काँग्रेस राष्ट्रवादीवर नाराज?

काँग्रेसशिवाय आघाडीची चर्चा, काँग्रेस राष्ट्रवादीवर नाराज?
X

"काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही." अलीकडे काँग्रेसबाबत काही मंडळींना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमिवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली."

काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्य़ा भाषणातील हा व्हिडिओ शेअर केला आहे अशोक चव्हाण यांनी....ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी भाजपविरोधी आघाडीची घोषणा केली, त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी युपीए अस्तित्वात नसल्याचे सांगत काँग्रेसला धक्का दिला. पण यानंतर काँग्रेस नेते चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस उंटासारखी तिरकी चाल करत नाही, असा टोला राष्ट्रवादीला लगावला आहे.

ममता बॅनर्जी काय म्हटल्या होत्या?

प.बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मुंबईत शरद पवार यांच्या भेटीनंतर एक मोठे वक्तव्य केले. संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच UPA आता अस्तित्वात नाही, असे वक्तव्य ममता यांनी केले आहे. भाजपला पर्याय देण्यासाठी आघाडीची गरज असल्याचे सांगत शरद पवार यांनी ही भेट त्यासंदर्भातच होती असे स्पष्ट केले. यानंतर पत्रकारांनी शरद पवार UPAचे नेतृत्व करणार का, असा सवाल विचारला. त्यावर "UPA काय आहे, आता UPAच नाही त्यामुळे आम्ही एकत्र बसून ठरवू" असे उत्तर ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. म्हणजे भाजपविरोधातला सशक्त पर्याय काँग्रेस शिवाय असेल का असा प्रश्न विचारल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, "शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांना लढायचे आहे त्यांनी सशक्त पर्याय दिला पाहिजे. जर कुणाला लढायचे नसेल तर काय करणार? प्रत्येकाने लढले पाहिजे असे आम्हाला वाटते."

दरम्यान शरद पवार यांनी सशक्त नेतृत्वाची गरज व्यक्त केली. समविचारी पक्षांनी राष्ट्रीय पातळीवर एकत्र येऊन लढले पाहिजे, तसेच सामूहिक नेतृत्व निर्माण केले पाहिजे, असे सांगितले. काँग्रेसशिवाय आघाडी असेल का या प्रश्नावर शरद पवारांनी ज्यांचा भाजपला विरोध आहे, त्यांनी आमच्यासोबत यावे, कुणालाही बाहेर ठेवण्याचा प्रश्नच नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

या घडामोडींनंतर काँग्रेसला वगळून तिसरी आघाडी झाली तर त्याचा फायदा भाजपला होईल, अशी टीका काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी केली. तर काँग्रेसशिवाय भाजपविरोधातील आघाडी सक्षम होऊ शकत नाही, असे काँग्रेसचे नेते, मल्लिकार्जुन खर्गे आणि कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. पण आता या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सरकारवर काही परिणाम होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Updated : 3 Dec 2021 6:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top