Home > Politics > शिवसेना ठाकरे गटाला दिलासा: हायकोर्टाने BMC ला खडसावले

शिवसेना ठाकरे गटाला दिलासा: हायकोर्टाने BMC ला खडसावले

शिवसेना ठाकरे गटाला दिलासा: हायकोर्टाने BMC ला खडसावले
X

तांत्रिक बाबीत अडकलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे कोर्टाने आदेश देत उद्या सकाळी ११ पर्यंत याबाबतचे पत्र लटके यांना सुपूर्त करतावेत असे आदेश दिले आहेत.

सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने पालिकेला खडसावलं असून तुमच्याकडे विशेषाधिकार असताना अशी प्रकरणं आमच्याकडे येता कामा नयेत अशा शब्दात मुंबई महानगरपालिकेला खडसावले आहे. न्यायालयाने पालिकेला राजीनामा स्वीकारणार की नाही याबद्दल २.३० वाजता भूमिका मांडण्यास सांगितलं होतं. पालिकेने भूमिका मांडल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

"एका सामान्य कर्मचाऱ्याच्या राजीनाम्याला एवढे महत्त्व का दिले जात आहे. उलट एका कर्मचाऱ्याला निवडणूक लढवायची आहे, तर तुम्ही त्याचा राजीनामा स्वीकारायला हवा. हे प्रकरण इथपर्यंत यायलाच नको होता," असेही न्यायालयाने पालिकेला सुनावले. सुनावणीदरम्यान राजकीय दबावापोटीच राजीनामा थांबवण्यात आल्याचा आरोप यावेळी ऋतुजा लटके यांच्यावतीने करण्यात आला होता. तर राजीनाम्याची योग्य प्रक्रिया अवलंबली नसल्याचा युक्तिवाद पालिकेने केला होता.

याचिका काय होती?

लटके या २००६ पासून महानगरपालिकेच्या सेवेत आहेत. परंतु पतीच्या निधनानंतर त्यांना ही पोटनिवडणूक लढवण्यासाठी ठाकरे गटातर्फे उमेदवारी देण्यात आली. त्यांचाही ही पोटनिवडणूक लढवण्याचा मानस असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर आहे. पोटनिवडणूक लढवता यावी यासाठी आपण ३ ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेकडे राजीनामा सादर केला होता. तसेच त्यासाठीच्या सर्व औपचारिकताही पूर्ण केल्या.

परंतु आजपर्यंत महानगरपालिका प्रशासनाने त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही आणि आवश्यक ते आदेश काढलेले नाहीत. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, नोकरीचा राजीनामा दिला तरच लटके या निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.

लटके यांनी त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत केली आहे. विशेष म्हणजे ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याला विलंब होत असल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून याबाबत भाजप आणि शिंदे गट राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. कोर्टाच्या आदेशाने श्रीमती लटके यांचा मार्ग मोकळा झाला असून ठाकरे गटाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

Updated : 13 Oct 2022 11:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top