Home > Politics > Explained: कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक कशी पार पडते? कोण होणार अध्यक्ष?

Explained: कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक कशी पार पडते? कोण होणार अध्यक्ष?

कॉंग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत मोठा वाद? काय आहे वाद? कोण असतात मतदार, कॉग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूकीचा इतिहास काय सांगतो वाचा स्पेशल रिपोर्ट

Explained:  कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक कशी पार पडते? कोण होणार अध्यक्ष?
X

देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची 17 ऑक्टोबरला निवडणूक आहे. गेल्या 40 वर्षात आत्तापर्यंत 2 वेळेस कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक झाली आहे.

1197 ची निवडणूक...

1997 मध्ये सीताराम केसरी यांनी शरद पवार आणि राजेश पायलट यांचा पराभव केला होता. या निवडणूकीत सीताराम केसरी यांना ६,२२४, तर शरद पवार यांना ८८2 तर राजेश पायलट यांना ३५४ मतं मिळाली होती.

2000 ची निवडणूक

मागील निवडणूक 2000 साली झाली होती. तेव्हा सोनिया गांधी यांच्या विरोधात जितेंद्र प्रसाद यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत सोनिया गांधी यांनी जितेंद्र पसाद यांना हरवलं होतं.

सोनिया गांधी यांनी 7 हजार 448 मत मिळाली होती. जितेंद्र प्रसाद यांना 94 मतं मिळाली होती.

तेव्हापासून म्हणजे गेल्या 24 वर्षापासून कॉंग्रेसचं अध्यक्ष गांधी घराण्याकडेच आहे. गेल्या 24 वर्षापासून राहुल गांधी आणि सोनिया गांधीच अध्यक्ष आहेत.

सोनिया गांधी 1998 ते 2017

राहुल गांधी 2017 ते 2019

सोनिया गांधी 2019 ते आत्तापर्यंत...

त्यामुळं कॉंग्रेसला गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त कोणीही अध्यक्ष गेल्या 24 वर्षात मिळालेला नाही. यावेळेस गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त व्यक्ती कॉंग्रेसचा अध्यक्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

2019 च्या झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी कॉंग्रेस पक्षाचा हात सोडत कॉंग्रेसला राम राम ठोकला आहे. सातत्याने राहुल गांधी यांनी पक्षाचं अध्यक्ष पद स्वीकारावं म्हणून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आग्रह धरत आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत कॉंग्रेस नेते पक्षाला राम राम करत आहे. त्यामुळं आत्ता होणाऱ्या निवडणूकीत कोण अध्यक्ष होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

कधी होणार निवडणूक?

निवडणुकीची अधिसूचना - 22 सप्टेंबर

उमेदवारी अर्ज भरणे - 24 ते 30 सप्टेंबर

अर्जांची छाननी -1 ऑक्टोबर

अर्ज माघारी घेण्याची मुदत - 8 ऑक्टोबर

मतदान - 17 ऑक्टोबर

मतमोजणी - 19 ऑक्टोबर

दरम्यान निवडणूकीपुर्वी कॉंग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत पारदर्शकपणे व्हावी. यासाठी कॉंग्रेसमधील नेते प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक अशाच पद्धतीने होते. असा दावा कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला आहे. त्यामुळं कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक कशी पार पडते आणि कोणत्या नेत्याने काय दावा केला आहे. हे आता आपण जाणून घेणार आहोत.

कॉंग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत मतदान करणाऱ्या मतदारांची यादी सार्वजनिक करण्याची मागणी मनिष तिवारी यांनी केली आहे. 'मतदार यादी जाहीर केल्याशिवाय निवडणूक निष्पक्ष कशी होणार? क्लबच्या निवडणुकीतही असे होत नाही!' मनिष तिवारी यांच्या मागणी अगोदर 28 ऑगस्टला कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी कोणीही अर्ज दाखल करू शकतो. ही लोकशाही फक्त आमच्या पक्षात आहे.

असं ट्वीट केलं होतं. त्यानंतर 31 ऑगस्टला मनिष तिवारी यांनी मतदार यादी मागितली आहे. त्यामुळं कॉंग्रेस पक्षातील निवडणूकीबाबत अनेक लोकांना ही निवडणूक कशी पार पडते हे समजून घेणं गरजेचं आहे. कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक समजून घेण्यासाठी कॉंग्रेस पक्षाची रचना समजून घेणं गरजेचं आहे.

ब्लॉक कमेटी

जिल्हा/ शहर कॉंग्रेस समिती

प्रदेश कॉंग्रेस समिती या समितीला PCC असं म्हणतात

कॉग्रेस वर्किंग कमेटी CWC

ऑल इंडिया कॉंग्रेस कमेटी या समितीला AICC असं संबोधलं जातं...

या सर्व समितीमध्ये सर्वात खालच्या स्तरामध्ये ब्लॉक समिती आहे. त्यानंतर जिल्हा समिती किंवा शहर समिती... नंतर प्रदेश कॉंग्रेस समिती या तीनही समित्या राज्यस्तरावरील समित्या आहेत. कॉंग्रेस वर्किग कमिटी (समिती) आणि ऑल इंडिया कॉंग्रेस कमेटी (समिती) या दोन समिती राष्ट्रीय स्तरावर काम करते.

प्रत्येक पक्षाचं एक संविधान असतं. त्या प्रमाणे कॉंग्रेस पक्षाचं देखील एक संविधान आहे. कॉंग्रेस पक्षाच्या संविधान अनुच्छेद क्रमांक 11नुसार सर्वात खालच्या स्तरावरील ब्लॉक कमिटीतील सदस्य गोपनिय पद्धतीने आपले प्रतिनिधी पीसीसी मध्ये पाठवतात. म्हणजेच प्रदेश स्तरावर पाठवतात. हे सर्व निवडून आलेले उमेदवार प्रदेश कॉंग्रेस समितीचे सदस्य असतात. या सर्व निवडून आलेल्या उमेदवारांना डेलिगेट असं म्हणतात. सध्या कॉंग्रेस प्रदेशचे साधारण 9 हजारांपेक्षा अधिक सदस्य (डेलिगेट) आहेत. या सर्व सदस्यांना डेलिगेट म्हणतात...

प्रदेश कॉंग्रेस समितीमधून निवडून आलेले सदस्य कॉंग्रेस संविधानाच्या अनुच्छेद 13 नुसार त्यांच्यातील 1/8 सदस्य प्रपोशनल रिप्रजेंटेशन सिस्टम च्या सिंगल ट्रांसफरेबल वोट च्या मदतीने आपले प्रतिनिधी ऑल इंडिया कॉंग्रेस समितीवर AICC वर पाठवतात. सध्या AICC चे 1500 सदस्य आहे. यामध्ये पूर्ण देशभरातील राज्याचे प्रतिनिधी असतात. कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे AICC चे प्रमुख असतात.

कॉंग्रेस वर्किंग कमिटी कशी तयार होते?

ऑल इंडिया कॉंग्रेस समिती AICC आणि प्रदेश कॉंग्रेस समिती PCC यामधील सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे कॉंग्रेस वर्किंग कमिटी...

या समितीत 25 सदस्य असतात. कॉंग्रेस वर्किंग समितीचे प्रमुख हे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असतात. CWC मध्ये 25 सदस्य असतात. या पैकी 1 अध्यक्ष तर 1 पदेन सदस्य असतो. पदेन सदस्य म्हणजे अध्यक्ष पद ही स्थायी स्वरुपाचं नसतं. त्यामुळं एका अस्थायी सदस्याची नेमणूक केली जाते त्याला पदेन सदस्य म्हणतात... उर्वरित 23 सदस्यापैकी 12 जागांवर AICC चे सदस्य प्रतिनिधी निवडून देतात आणि उर्वरित 11 जागा काँग्रेस अध्यक्ष नामनिर्देशित करत असतात. गेल्या अनेक वर्षापासून या 12 सदस्यांच्या देखील निवडणूका झालेल्या नाहीत. कॉंग्रेस अध्यक्षच या 12 सदस्यांची नेमणूक करत आल्या आहेत. त्यामुळं कॉंग्रेसमधील जी 23 गट या निवडणूका घेण्याची मागणी सातत्याने करत आहे. या सदस्यांची भूमिका कॉंग्रेस वर्किग कमिटीत महत्त्वाची असते.

निवडणूकीची घोषणा कोण करते?

CWC म्हणजेच काँग्रेस कार्यकारिणी काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूकीची घोषणा करते. CWC कॉंग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी एक बॉडी तयार ही काँग्रेसची सर्वोच्च कार्यकारी संस्था आहे. ही निवडणूक आयोगाप्रमाणे काम करते. ही कॉंग्रेस पक्षातील एक महत्त्वाचा भाग आहे. हीच बॉडी निवडणुकीची तारीख, अर्ज दाखल करण्याची तारीख, अर्ज परत घेण्याची तारीख, उमेदवारांची नाव जाहीर करते. कॉंग्रेसच्या निवडणूक समितीमध्ये 3 ते 5 सदस्य असतात. सध्या काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक कोण लढू शकते?

काँग्रेस संविधानाच्या कलम 18 नुसार प्रदेश कॉंग्रेसच्या 10 सदस्यांनी अध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी सदर कॉंग्रेसच्या सदस्याची शिफारस करायला हवी.

कॉंग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत कोण मतदान करते?

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व प्रदेश काँग्रेसच्या सदस्यांना मतदान करण्याचा हक्क असतो. यांना डेलिगेट म्हणतात. हे सर्व डेलिगट कॉंग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाग घेत असतात.

मतदान कसे पार पडते?

निवडणूकीला एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास मतदान पार पडते. या उमेदवारांना प्रदेश कॉंग्रेस समितीचे सदस्य प्रपोशनल रिप्रजेंटेशन सिस्टम च्या सिंगल ट्रांसफेरेबल वोट नुसार बॅलेट पेपर वर प्राधान्य क्रमांका प्रमाणे मतदान करतात.

दोन उमेदवार असल्यास ज्याला पहिल्या पसंतीचे 50% पेक्षा जास्त मते मिळाली आहेत. तो विजेता होईल. दोनपेक्षा जास्त उमेदवार असल्यास, विजयी कोटा त्यानुसार कमी होईल आणि ज्याला त्या कोट्याइतकीच मते मिळतात. तो उमेदवार निवडणूक जिंकतो.

निवडणूकीतील वाद काय?

कॉंग्रेस नेते मनिष तिवारी यांनी जे लोक कॉंग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत मतदान करणार आहेत. त्या सदस्यांची म्हणजेच प्रदेश कॉंग्रेस समितीच्या सदस्यांची नाव मागितली आहेत. ज्यांना डेलिगट असं म्हणतात. या डेलिगट ची नाव कॉंग्रेस च्या अधिकृत वेबसाइटवर www.inc.in प्रसिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हे नाव प्रसिद्ध केले तर काय होईल...

गेल्या काही वर्षात कॉंग्रेसमध्ये मोठी खद खद पाहायला मिळत आहे. त्यामुळं अनेक नेते गांधी कुटुंबाच्या विरोधात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं गांधी घराण्याव्यतिरिक्त कोणीही किंवा त्यांच्या जवळच्या उमेदवाराने निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केल्यास तांत्रिक कारण देऊन त्यांचा अर्ज अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

...कसा रद्द होऊ शकतो अर्ज?

या संदर्भात अशी शंका उपस्थित केली जात आहे की, कॉंग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी ज्या उमेदवाराला अर्ज करायचा आहे. त्या उमेदवाराला 10 प्रदेश कॉंग्रेस समितीच्या सदस्यांनी नामनिर्देशीत करायला हवं. मात्र, गेल्या काही वर्षात सर्व प्रदेश कॉंग्रेस समितीच्या सदस्यांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळं नामनिर्देशीत केलेल्या सदस्यांपैकी एखादा सदस्य प्रदेश कॉंग्रेस समितीचा सदस्य नसल्याचं कारण देऊन अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

या सर्व प्रकरणावर काँग्रेस नेते आणि कॉंग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कॉंग्रेसच्या नेत्यांनी प्रदेश कॉंग्रेस समितीच्या सदस्यांची यादी मागितल्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत अशा प्रकारे कधीही यादी जाहीर करण्यात आली नाही. असं कारण सांगितलं आहे.

कोण होणार अध्यक्ष?

राहुल गांधी अध्यक्षपद न स्वीकारण्यावर ठाम असल्याचे पक्षाच्या गोटातून सांगितले जात आहे. मात्र, पक्षाध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्या नावाचा आग्रह काँग्रेसच्या बहुतेक नेत्यांनी धरला आहे. तरीही राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचेही नाव या पदासाठी आघाडीवर आहे. स्वत: गेहलोत यांनी मात्र, गेल्या तीन दिवसांत दोन वेळा राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान पक्षाध्यक्षपदासाठी राहुल हेच अव्वल व एकमेव पर्याय आहेत अशी भलामण काँग्रेस नेते करीत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शशी थरूर यांची नाव उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.

जम्मू-काश्मीरमधील पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांच्या पाठोपाठ तेलंगणामधील काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते एम. ए. खान यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या दोन्ही नेत्यांनी पक्ष सोडताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांची विचारसरणी अत्यंत वेगळी आहे. ती विचारसरणी पक्षातल्या ब्लॉक पातळीपासून बूथ पातळीपर्यंत कुणाशीच जुळत नाही, असं खान यांनी म्हटलं होतं. तर राहुल गांधी अपरिपक्व आणि बालिश आहेत, असा शाब्दिक हल्ला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या नाराजी पत्रात गुलाम नबी आझाद यांनी केला होता. त्यामुळे आता अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Updated : 1 Sep 2022 12:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top