Home > Politics > प्रचार सभा, रोड शो होणार का? आज होणार फैसला

प्रचार सभा, रोड शो होणार का? आज होणार फैसला

प्रचार सभा, रोड शो होणार का? आज होणार फैसला
X

देशात पाच राज्यांच्या निवडणुकींची घोषणा केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देशात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, पंजाब या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. कोरोनामुळे राजकीय पक्षांना फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रचार करावा लागत आहे. निवडणूक आयोगाने कोरोनामुळे रोड शो, प्रचार सभा यांच्यावर बंदी घातली आहे.

निवडणूक आयोगाने या पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा करतांना प्रचार सभा, रोड शो यासंदर्भात 15 जानेवारीला म्हणजे आज परिस्थितीचा आढावा घेऊन परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं होतं. त्यावर आज निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता आहे.

काय आहे राजकीय पक्षांची स्थिती...

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ १४ मे २०२२ रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत १४ मे पूर्वी विधानसभा आणि नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये झाल्या. भाजप ३१२ जागा जिंकून सत्तेवर आला. सपा ४७, बसप १९ आणि कॅांग्रेसला ७ जागा मिळाल्या.

भाजपचे योगी आदित्यनाथ यांनी १९ मार्च २०१७ रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सीएम योगी हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.

उत्तराखंडः

७० जागांच्या उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ २३ मार्च रोजी संपत आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ५७ जागा जिंकून प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले, तर विरोधी काँग्रेसला केवळ ११ जागा मिळाल्या. त्रिवेंद्रसिंग रावत मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना चार वर्षांतच काढत भाजपने पहिल्यांदा तीरथसिंग रावत आणि त्यानंतर काही महिन्यांनी पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री केले.

पंजाब

पंजाब विधानसभेचा कार्यकाळ २७ मार्च २०२२ रोजी संपत आहे. ११७ जागा असलेल्या पंजाबमधील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ७७ जागा जिंकून दहा वर्षानंतर सत्तेत परतली, तर शिरोमणी अकाली दल-भाजप युती केवळ १८ जागांवर राहीले. आम आदमी पार्टी २० जागा जिंकून प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री झाले, पण चार वर्षांनंतर काँग्रेसने कॅप्टन अमरिंदरच्या जागी चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केले. पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला ५९ जागांचा आकडा गाठावा लागेल.

मणिपूर

ईशान्येकडील ६० जागांचे राज्य असलेल्या मणिपूरच्या विधानसभेचा कार्यकाळ १९ मार्च २०२२ रोजी संपत आहे. त्यापूर्वी राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. २०१७ च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत, भाजप २४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. १७ आमदारांसह काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष ठरला. भाजपने एनपीपी, एलजेपी आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आणि एन बिरेंदर सिंग राज्याचे मुख्यमंत्री झाले.

गोवा

४० जागांच्या गोवा विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्च रोजी संपत आहे. राज्यातील शेवटच्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये झाल्या होत्या. १५ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, पण त्यांना सरकार स्थापन करता आले नाही. भाजपने १३ जागा जिंकल्या आणि MGP, GFP आणि दोन अपक्ष आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात यश मिळवले. मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले, परंतु १७ मार्च २०१९ रोजी मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले.

Updated : 15 Jan 2022 5:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top