#Aryankhan : NCBने भाजप नेत्याच्या नातेवाईकाला वाचवले, राष्ट्रवादीचा आरोप

Update: 2021-10-08 07:49 GMT

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर यामागे भाजपशी संबंधित लोक असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे. या आरोपानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी याप्रकरणी एनसीबी वर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. क्रूजवरील पार्टीमध्ये NCB ने छापा टाकला त्यावेळी NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आठ ते दहा लोकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली होती.

पण त्यानंतर NCB ने आठ लोकांना ताब्यात घेऊन अटक केल्याची कोर्टाला माहिती दिली. आता याच कारवाईवर नवाब मलिक यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्या दिवशी रात्री दहा लोकांना अटक करण्यात आली होती. पण त्यातील दोघांना नंतर सोडून देण्यात आले. सोडून देण्यात आलेल्यांमध्ये भाजपच्या एका

हायप्रोफाइल नेत्याचा मेव्हणा असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलेला आहे.

" समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट दिली होती की, 8 ते 10 लोकांना पकडले आहे. त्यावेळी मी प्रश्न विचारले होते एक अधिकारी संपूर्ण कारवाई करतोय तो असे अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो. जर 10 लोकांना पकडले असेल तर कदाचित 2 लोकांना सोडलं असेल. आता हे खरं असल्याचं समोर आले आहे. जे दोघे सोडण्यात आले त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा होता. त्याबाबत उद्या मी खुलासा करणार आहे. त्या दोन जणांना आणण्यात आले होत आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले आहे. हे जाणीवपूर्वक करण्यात आलं आहे. सगळा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आले आहे का, " नवाब मलिक यांनी विचारला आहे

"भाजपचा कोण नेता आहे, त्याचं नाव उद्या आपण घोषित करणार आहे, आज इतकंच सांगेल की तो हायप्रोफाईल नेता आहे. त्यानेच सगळं गॉसिप केलं आहे." असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

Similar News