उल्हासनगरमधील मलंगगड परिसरात काही तरुण तरुणींना गुंडांनी मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. केवळ तोकडे कपडे घातल्याचे कारण देत मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरूण आणि दोन तरुणींना 6 ते 8 गुंडांनी बेदम मारहाण केली, अशी तक्रार पीडितांनी केली आहे. त्या गुंडांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंग केल्याचाही आरोप या तरुणींनी केला आहे. ही घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी स्वत:ची सुटका करून घेत नेवाळी पोलीस चौकी गाठली. मात्र पोलिसानी त्यांना मेडिकल चाचणी करण्यास सांगितले. तसेच इथे तक्रार घेता येणार नाही तुम्ही हिल लाईनला जा, असे सांगत परत पाठवले, अशीही तक्रार या पीडित तरुणींनी केली आहे.
पोलीस दखल घेत नसल्याने यातील पीडित तरुणीने सोशल मिडीयावरून या घटनेला वाचा फोडली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंद करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. या घटनेनंतर मलंग गड परिसर सर्वसामान्यांसाठी नाहीच का? तरुणींनी नेमका कोणता पेहराव करावा हे ठरविण्याचा अधिकार यांना दिला कोणी? असा सवाल उपस्थित करत अशा समाज कंटकावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी होऊ लागली आहे.