सरकारला जाग कधी येणार ? एकनाथ खडसे उखडले

Update: 2019-06-19 08:10 GMT

 

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधानसभेत सरकारला घरचा आहेर दिला. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात कुपोषणाने सर्वात जास्त बालके मृत्यू पावली, आता तरी सरकारला जाग येणार की नाही? असा खडा सवाल त्यांनी केला.

प्रश्नोत्तराच्या तासात आदिवासी विभागाच्या अनुदानित आश्रमशाळेच्या शिक्षकांच्या विविध मागण्यांचा संदर्भात योगेश घोलप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सभागृहात विरोधीपक्षाचे सदस्य आक्रमक झाले होते. त्या प्रश्नांना नव्याने पदभार स्वीकारलेले आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे उत्तरे देत होते. उईके यांनी नव्याने पदभार स्वीकारल्यामुळे आणि सभागृहात उत्तर देण्याची पहिलीच वेळ असल्याने ते धोरणात्मक आश्वासन द्यायला थोडे कचरले. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे खडसे यांनी विरोधी सदस्यांच्या सुरात सूर मिसळत मंत्री महोदयाना त्यांच्या शैलीत धारेवर धरले.

निर्णय घेण्यात आला आहे फक्त अंमलबजावणी होत नाही, ते किती दिवसात करणार तेव्हढेच सांगा असे ते म्हणाले. त्यावर उईके यांनी तांत्रिक माहितीचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यावर खडसे संतापले आणि आदिवासींच्या प्रश्नावर सरकार गंभीर होऊन निर्णय घेतले पाहिजेत असे सांगताना कुपोषणाच्या मुद्द्याला हात घातला. त्यामुळे खडसे विरोधीपक्ष नेते असताना जो पवित्रा घ्यायचे त्याची आठवण पुन्हा एकदा सभागृहाला झाली.

Similar News