यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण होऊनही रेल्वेमध्ये नोकरी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारला प्रांजल पाटीलनं तिच्या बुद्धिमत्तेनं चांगलीच चपराक दिली आहे. नुकत्याच झालेल्या यूपीएससी परिक्षेत प्रांजल पुन्हा एकदा पास झाली आहे. यंदा तिनं १२४ वा रँक मिळवला आहे. प्रांजलला नोकरी नाकारणाऱ्या सरकारला प्रांजलनं आता चांगलंच आव्हान दिलंय.
मुंबईतल्या उल्हासनगरमध्ये राहणारी प्रांजल पाटील याआधी 2016 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण झाली होती. त्यावेळी तिला 773 वा रँक मिऴाला होता. त्यानंतर तिला रेल्वे विभागात नोकरीचे पत्र देण्यात आले होते. मात्र, रेल्वेनं केवळ प्रांजल अंध असल्यामुळे तिला नोकरी नाकारली. केंद्रतील आणि राज्यातील लोकप्रतिनिधींकडे दाद मागूनही तिला न्याय मिळाला नव्हता. तेव्हा प्रांजलनं सोशल मीडियाचा आधार घेत आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर जाग आलेल्या केंद्र सरकारने कनिष्ठ स्तराचा टपाल विभाग देत प्रांजलची पुन्हा चेष्ठा केली होती. मात्र, आता प्रांजलने पुन्हा आपल्या बुद्धीची चुणूक दाखवून दिली आहे.