abp माझा चे गणेश अथर्वशीर्ष पठण, माध्यमांना हे शोभतं का ?

Update: 2021-09-10 12:45 GMT

एबीपी माझा या वाहिनीच्या वृत्तनिवेदकांनी गणेश चतुर्थीच्या पुर्वसंध्येला अथर्वशीर्ष पठण केलं. ज्याचे वाहिनीने थेट प्रक्षेपण केले. या प्रकारामुळे नेटकऱ्यांनी आता एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना ट्रोल केलं आहे.

ट्विटर युझर वैभव कोकाट यांनी वाहिनीवर टीका करत, "जसे एका धर्माचा सण आल्यावर मंत्रपठण ABPचे ANCHOR करतात तसेच मुस्लिम धर्माचा सण असल्यावर नमाज पठण करतील का? ख्रिश्चन धर्म सण असल्यावर सांताक्लॉज बनतील का? त्याचे LIVE टेलिकास्ट करतील काय? कि फक्त एकाच धर्माचे प्रेक्षक आहेत ABP चे? @rajivkhandekar संपादक म्हणून आपल्याला काही लाज?", असे म्हटले आहे.

याशिवाय पेशाने वकील असलेल्या अमिता चाटे म्हणतात, "धर्म निरपेक्ष संकल्पनेला तडा आहे... धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ सर्व धर्म समभाव.. एवढं च नाही तर अश्या platform वरून..‌कोणत्याच धर्मा च सर्मथन,प्रसार..ई. कोणतेही कृत्य करता येत नाही...!!"

एका वृत्तवाहिनीने अशाप्रकारे मंत्रपठण करणं हे योग्य़ आहे की अयोग्य याबाबत आम्ही ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्याशी संवाद साधला असता,

"महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सर्वधर्मीय साजरे करतात. त्यामुळे एबीपी असो किंवा इतर कोणतेही माध्यम ; त्यांची कृती जर एखाद्या धर्माशी निगडीत असेल, तर त्याचे भांडवल करण्याचा नैतिक अधिकार प्रत्येकालाच आहे. एबीपीने जर गणेशोत्सवाचं निमित्त करून काही केलं असेल तर त्याला काही फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं मला माझ्या व्यापक दृष्टीकोनातून वाटतं. परंतू जर त्यांची कृती सातत्याने जातीयवादाकडे झुकणारी असेल तर त्यावर टीका करायला आपण आहोतच."


याशिवाय या विषयावर आम्ही ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर यांच्याशी बातचित केली असता,

" घटनेमध्ये सर्वधर्म समभावाचा उल्लेख असल्याने, पब्लिक ब्रॉडकास्टर्सनी कोणत्याही एकाच धर्माच्या प्रार्थना किंवा सण, उत्सव दाखवणं हे मला योग्य वाटत नाही. आपल्या संविधानामध्ये प्रत्येक जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या लोकांना समान नागरीकत्व दिलेलं आहे. खाजगी ब्रॉडकास्टर्स म्हणुन कोणत्याही एका धर्माचे स्त्रोत्र सादर करणं हे संविधानाच्या सर्वसमावेशक तत्वाला छेद दिल्यासारखं होईल. यामुळे जर देशातील बहुसंख्यांक धर्म कोणता विसरून सर्वधर्मीय सण साजरे करा असा जर आक्षेप घेतला जात असेल तर रे काही फार चुकीचं आहे असं काही म्हणता येत नाही." असं ते म्हणाले.

अथर्वशीर्ष पठण करणं हा त्या वाहिनीचा वैयक्तिक मुद्दा आहे. परंतू एका जबाबदार माध्यमसमुहाने एका विशिष्ट धर्माकडे आपला कल जाहीररीत्या दाखवणं हे कितपत योग्य आहे? हा महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित होतो. 

Tags:    

Similar News